Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगवसंतदादा - खऱ्या अर्थाने सहकार सम्राट

वसंतदादा – खऱ्या अर्थाने सहकार सम्राट

प्रभा राव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करताना दादांना काहीही न विचारणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी नवे मुख्यमंत्री नियुक्त करताना मात्र दादांचा शब्द अंतिम राहील असे जाहीर केले आणि स्वत: राजीव गांधींनीच त्याबाबत दादांकडे विचारणा केली. त्यावर ‘मराठवाडय़ातील नेते आणि आपले कट्टर समर्थक शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यास आपली कसलीही हरकत राहणार नाही, उलट त्यांना लागेल ते सर्व सहकार्यही आपण देऊ’, असे राजीव गांधी यांच्याकडे स्पष्ट केले आणि राजीवजींनीही दादांचा शब्द प्रमाण मानून निलंगेकर यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले.

निलंगेकर मुख्यमंत्री झाले पण ते साधे आमदारही नव्हते, त्यामुळे त्यांची नियुक्ती वादात सापडली. अखेर निलंगा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले त्यांचे चिरंजीव दिलीप पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि तेथून निवडणूक लढवून शिवाजीराव विधानसभेवर निवडून यावे असा उपाय दादांनीच काढला आणि निलंगेकरांना मुख्यमंत्री बनवून मगच त्यांनी राजस्थानला प्रयाण केले. लौकिकार्थाने वसंतदादांचे महाराष्ट्रातील सत्तेचे राजकारण इथेच संपले. त्यानंतरही ते अधूनमधून आपण शेतकरी संघटनेची स्थापना करणार असल्याच्या घोषणा करायचे पण त्याला फारसा अर्थ नव्हता. दादामध्ये ती ताकदच उरली नव्हती, हे खेदाने नमूद करावे लागेल.

- Advertisement -

सत्तेच्या राजकारणाची दादांना फारशी हौस कधीच नव्हती. काँग्रेसच्या संघटनाबांधणीवरच प्रारंभीच्या काळात त्यांनी आपले सारे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे दादांच्या संपर्कात येणारी व्यक्ती त्यांच्यामुळे त्यांची आणि काँग्रेसची होऊन जात असे. राजकारणात कुणाला कधी अंगावर घ्यायचे आणि कुणाला पाठ दाखवायची याचे आडाखे दादांच्या डोक्यात तयार असत. यशवंतराव चव्हाण यांनी सातत्याने बेरजेचे राजकारण केले तर संघटनकौशल्य हा दादांचा सर्वात मोठा गुण होता. राजकारणाला अनेक पदर असतात. त्यात किंचितसे मतभेदही असतात, त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लावण्याचे काही प्रसंगही दादांवर आले. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघात (सध्याचा इस्लामपूर) जनता पक्षातर्फे मातब्बर नेते राजारामबापू पाटील मैदानात उतरले तेव्हा तत्कालिन रेड्डी काँग्रेसतर्फे अनेक वर्षे बापूंचे पट्टशिष्य असलेल्या विलासराव शिंदे यांना बापूंच्या विरोधात रिंगणात उतरविण्याची खेळी दादा खेळले. त्या निवडणुकीत विलासरावांचे डिपॉझिटही जप्त होईल अशी भविष्यवाणी अनेक राजकीय पंडितांनी वर्तविली असताना दादांनी इस्लामपुरात जाऊन फक्त कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि ‘काहीही करा पण बापू विधानसभेत दिसता कामा नयेत हे लक्षात ठेवा’, असा आदेशच वाळवा तालुक्यातील काँग्रेसजनांना दिला. तालुक्यातील नेत्यांनीही मग बापूंच्या पराभवासाठी जंग जंग पछाडले, आपल्या इस्टेटीही पणाला लावल्या आणि बापूंचा पराभव घडवून आणून विलासरावांच्या विजयाची भेट दादांना दिली. दुसरा प्रसंग सांगता येईल तो १९८० सालच्या लोकसभा निवडणुकीचा. त्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध आपली पत्नी शालिनीताई पाटील यांना लढवून त्यांच्या विजयासाठी दादांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली. अर्थात यशवंतरावांचे आव्हान स्वीकारणे अवघड आहे याची कल्पना स्वत: दादांनाही होती आणि घडलेही तसेच. शालिनीताईंचा पराभव करून यशवंतराव निवडून आले, पण त्यांना नेहमी मिळणारे मताधिक्य विचार करायला लावण्याइतपत खाली आणण्यात दादा यशस्वी झाले. त्यामुळेच असेल पण, ‘हा माझा पराभवच आहे’ अशी कबुली खुद्द यशवंतरावांनाही द्यावी लागील होती. दादांचे संघटनकौशल्य असे वादातीत होते. सहकार क्षेत्रात तर दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. भारतातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना त्यांनी सांगली जिल्ह्य़ात माधवनगर परिसरात उभारला. या कारखान्याच्या उभारणीसाठी या नेत्याने अक्षरश: मैलोन्मैल भटकंती केली. शेताच्या वावरातील बांधावर उभे राहून उसाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. केवळ साखर कारखाने उभारून थांबू नका तर त्या जोडीने पूरक उद्योगांचीही स्थापना करा हा दादांचा आग्रह असे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आजूबाजूलाच सहकारी बँका, पतसंस्था, छोटे-मोठे दूधसंघ यांची उभारणी झाल्याचे अनेक ठिकाणी हमखास पाहायला मिळायचे. त्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हायचा. या कर्जातून मोठमोठय़ा जर्सी गायी- म्हशी शेतकऱ्यांच्या दारात झुलताना दिसू लागल्या. त्यातून झालेली दूधनिर्मिती सहकारी दूध संघाकडून खरेदी केली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा खेळू लागला आणि ग्रामीण महाराष्ट्रात स्वत:ची अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच निर्माण झाली. दादांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून प्रोत्साहन घेऊन मग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली. पूर्वी कोणत्याही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मुंबई प्रदेश काँग्रेसकडे हात पसरावे लागत. सहकाराच्या जोरावर दादांनी महाराष्ट्र काँग्रेसलाही आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवून टाकले.

दादा स्वत: फारसे शिकलेले नव्हते, पण १९८३ साली मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीची आमूलाग्र क्रांती घडवून आणली. महाराष्ट्रातील मुलांना अन्य कोणत्याही राज्यात जाऊन उच्च शिक्षणासाठी हात पसरावे लागू नयेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. आज कर्नाटक, तामिळनाडूपासून पंजाबपर्यंत अनेक राज्यांतील विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकताना पाहिले की वसंतदादा हे नाव अभिमानाने मिरवावे असेच प्रत्येक मराठी माणसाला वाटेल.
नेते आणि कार्यकर्ते, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी मंडळी आणि सर्वसामान्य जनता यांच्या मनात वंसतदादांबद्दल घरातील ज्येष्ठ कर्त्यां पुरुषाइतकीच श्रद्धा होती. ‘दादा’ नावाचे हे प्रेमळ पर्व १ मार्च १९८९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले आणि उभ्या महाराष्ट्राचा खंदा आधारच हरपला.

- Advertisment -

ताज्या बातम्या