Friday, April 26, 2024
Homeब्लॉगस्पंदन : हिंदी सिनेदुनियेतला देव माणूस : मोहम्मद रफी

स्पंदन : हिंदी सिनेदुनियेतला देव माणूस : मोहम्मद रफी

३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफीने जगाला अलविदा केलं. या वर्षी त्यांची ४१ वी पुण्यतिथी होती. रुपेरी पडद्यावर दिलीपकुमार –राज कपूर -देव आनंद या त्रिकुटाने अधिराज्य गाजवलं तद्वतच पार्श्वगायनाच्या क्षेत्रात रफी-किशोर-मुकेश यांनी श्रोत्यांना अनमोल गाण्यांचा खजिना बहाल केला आहे.

रफीच्या आधी कुंदनलाल सैगल, पंकज मलिक, जी. एम दुर्रानी, सी.एच. आत्मा यांनी काही काळ गाजवला होता. सैगल तर पुरुष पार्श्वगायकीचा आद्य पुरुष समजला जातो. रेडीओ सिलोनवर सकाळी साडेसात ते आठ या वेळेत जुन्या चित्रपट गीतांचा कार्यकम प्रसारित व्हायचा. या कार्यक्रमाची सांगता सैगलच्याच गाण्याने व्हायची. हा शिरस्ता शेवटपर्यंत कायम होता. रफी-मुकेश-किशोर हे तिन्ही गायक सैगलचे भक्त नि चाहते होते. त्यांनी आरंभीची काही गाणी सैगलच्याच शैलीत गायली आहेत. पुढे या तिघांनी आपापली स्वतंत्र शैली विकसित करून ओळख प्रस्थापित केली. खरं म्हणजे हे तीन गायक केवळ गायक नव्हते तर त्यांनी आपलं ‘स्कूल’ निर्माण केलं. हे तिघेही खऱ्या अर्थाने आम जनतेचे गायक बनले. तर याच गायकांचे समकालीन अजून तीन गायक हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवून होते. तलत मेहमूद-मन्ना डे- हेमंतकुमार. रफी-मुकेश-किशोर पब्लिकचे (mass) गायक होते तर तलत-मन्ना-हेमंतदा अभिजन (class) वर्गात जास्त लोकप्रिय होते. रफी-मुकेश-किशोर यांच्या शैलीत गाणारे अनेक गायक हिंदी सिनेदुनियेत आलेत. काही लोकप्रिय झाले. काही विस्मरणात गेले. पण तलत-मन्नादा-हेमंतदा यांच्या आवाजाशी नाते सांगणारे गायक मात्र आले नाहीत.

- Advertisement -

पार्श्वगायक म्हणून कारकीर्द लक्षणीय

मूळचा पाकिस्तानचा असलेला अदनान सामी नावाचा गायक हेमंतकुमारच्या आवाजाची आठवण करून देतो. पण ही गोष्ट फार कमी लोकांच्या लक्षात आली आहे. मखमली स्वरांचा तलत तर केवळ अतुलनीय नि अलौकिक देणगी लाभलेला अभिजात गायक होता. ‘एक तलत, बाकी सब गलत’ असं एकेकाळी त्याच्याविषयी बोललं जायचं. विशेषतः गझल गायकीचा तलत अनभिषिक्त सम्राट होता. गुलाम अली, मेहंदी हसन हे दिग्गज गझल गायक सुद्धा त्याच्या गायकीने प्रभावित होऊन त्याला आपला आदर्श समजतात. रफी हयात असतानाच त्यांच्या आवाजाला पर्याय म्हणून अनेक गायकांना पुढे (pramote) करण्यात आलं. पण महेंद्र कपूरचा अपवाद वगळता इतरांना जम बसवता आला नाही. महेंद्र कपूर यांनी bollywood मध्ये बऱ्यापैकी आपलं बस्तान बसवलं. शिवाय त्यांनी स्वत:ला हिंदी पुरतेच मर्यादित न ठेवता मराठीसह इतरही प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायलीत.मराठीत तर ते आपल्या दादा कोंडके यांचा पडद्यावरचा हुकमी आवाज बनले होते. महेंद्र कपूर यांनाही वेगवेगळ्या प्रकारची गाणी संधी मिळाली. निरनिराळ्या संगीतकारांकडे ते गायले. विविध अभिनेत्यांना पडद्यावर उसना आवाज त्यांनी दिला. एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय आहे, यात शंकाच नाही.

दोन सोलो गाणी गाजली

रफीच्या निधनाच्या सात वर्षांपूर्वीच गायक अन्वरला १९७३ मध्ये ‘मेरे गरीब नवाज’ या चित्रपटात गायची संधी मिळाली. त्याचं या चित्रपटातलं ‘कसमे हम अपने जान की…’ हे गाणं ऐकून रफी खूप खुश झाले होते. त्यांनी तर सांगून टाकलं की, अन्वर त्यांच्यानंतर त्यांची जागा घेईल म्हणून ! पण दुर्दैवाने हा चित्रपट फ्लॉप झाल्याने याची गाणीही लोकांपर्यंत फारशी पोहचली नाहीत. विनोदवीर मेहमूद आणि संगीतकार राजेश रोशन यांनी ‘जनता हवलदार’ या चित्रपटासाठी अन्वरला पाचारण केलं. तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना हा या चित्रपटाचा नायक होता. त्याच्यावर चित्रित झालेली ‘‘तेरी आंखो की चाहत में…’’ आणि ‘’हमसे का भूल हुई…’’ ही त्याची दोन सोलो गाणी खूप गाजली. अन्वरला लता आणि आशासह इतरही अनेक गायिकांसमवेत गाणी गायची संधी मिळाली. शिवाय खय्याम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी, अन्नू मलिक सारख्या आघाडीच्या संगीतकारांची गाणी त्याने गायली आहेत. त्याची सोहनी मेरी सोहनी…(सोहनी महिवाल), जिंदगी इम्तिहान लेती हैं…(नसीब), ये प्यार था या कुछ और था…(प्रेमरोग), नजर से फुल चूनती है नजर…(आहिस्ता-आहिस्ता ), मोहब्बत अब तिजारत बन गई है…(अर्पण), रब ने बनाया मुझे तेरे लिये…(हीर-रांझा), हाथो कि चंद लकिरो का…(विधाता), मेरे खयालोके रहगुजर से… (ये इश्क नही आसान), मौसम-मौसम लव्हली मौसम…( थोडीसी बेवफाई), एक पल हसना जो चाहा…( बहार आने तक ), कहां जाते हो रुक जाओ…(दुल्हा बिकता है), कोई परदेसी आया परदेस मे… (हम है लाजवाब), कुर्बानी कुर्बानी अल्ला को प्यारी है…(कुर्बानी) अशी अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. तसेच २००४ मध्ये त्याने स्वत: संगीतबद्ध केलेला नि गायलेला ‘मेरी आशिकी से पहले’ हा अल्बम काढला. यातली गाणी मोहम्मद रफीची आठवण करून देणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मुझे पिने का शौक नही…

अभिनेता सनी देओलचा पहिला चित्रपट ‘बेताब’ १९८३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सनी-अमृता सिंग या जोडीने हिंदी सिनेदुनियेत पदार्पण केलं. त्याचबरोबर अजून एका व्यक्तीचा हा पहिला लोकप्रिय सिनेमा ठरला. गायक शब्बीरकुमार याचा. यातली सर्व गाणी शब्बीरकुमार-लताने गायली होती. जब हम जवा होंगे, तेरी तस्वीर मिल गई, बादल यू गरजता है, अपने दिल से बडी दुश्मनी थी, तुमने दी आवाज… ही सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली नि शब्बीरकुमार हे नाव घराघरांत पोहचलं. खरं म्हणजे त्याने मनमोहन देसाई- अमिताभ बच्चनच्या ‘कुली’ या चित्रपटातील गाणी आधी ध्वनीमुद्रीत केली होती. पण अमिताभला चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातामुळे ‘कुली’ उशिरा प्रदर्शित झाला. यातली अक्सिडेंट हो गया, सारी दुनिया का बोझ हम उठाते है, मुबारक हो तुमको हज का महिना, जवानी कि रेल कही, हमका इश्क हुआ, लंबूजी लंबूजी, मुझे पिने का शौक नही… ही गाणी फार लोकप्रिय झाली होती.

याद तेरी आएगी…

शब्बीरकुमार बडोद्याचा. त्याने ‘मेलडी मेकर्स’ नामक तत्कालीन लोकप्रिय ओर्केष्ट्रा मध्ये गायला सुरुवात केली. नंतर ‘एक शाम रफी के नाम’ या रफीच्या गाण्यांच्या कार्यक्रमात तो गाऊ लागला. संगीतकार उषा खन्ना यांनी १९८१ मधल्या ‘तजुर्बा’ या चित्रपटासाठी त्याला पहिल्यांदा गायची संधी दिली. लतासोबत गायलेल्या ‘शाम ये कुछ खोई-खोई…’ या ‘प्रेम तपस्या’ चित्रपटातील युगलगीताने शब्बीरकुमारने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतलं. राजीव कपूरच्या पहिल्या चित्रपटात ‘एक जान है हम’ मध्ये संगीतकार अन्नू मलिकने त्याच्याकडून चार गाणी गाऊन घेतली. याद तेरी आएगी, आसमा पे लिख दू नाम तेरा, दिल दिल है कोई, बोलो बोलो ही गाणी श्रोत्यांनी फार उचलून धरली. अन्नू मलिकचा हा पहिला सुपरहिट सिनेमा. पडद्यावर आपले काका शम्मी कपूर ची नक्कल करत राजीव कपूर ने अभिनय केला तर रफीच्या शैलीत शब्बीरकुमारने गाणी गाऊन चित्रपट प्रेक्षकांना नि श्रोत्यांना वेगळा आनंद दिला.

शब्बीरकुमारची खोऱ्याने गाणी

शब्बीरकुमारने १९८० च्या दशकांत आघाडीच्या सर्वच संगीतकारांकडे काम केलं. शिवाय सर्वच अभिनेत्यांना आपला आवाज दिला. गायक मोहम्मद अझीजचं आगमन होईपर्यंत शब्बीरकुमारने खोऱ्याने गाणी गायलीत. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्याला सर्वाधिक गाणी दिलीत. त्याची अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. वानगीदाखल प्यार किया नाही जाता (वो सात दिन ), बोल दो मीठे बोल (सोहनी महिवाल), तुमसे मिलकर ना जाने क्यू (प्यार झुकता नही), झीहाल –ए-मुश्कीन (गुलामी), जिंदगी हर कदम एक नई जंग है (मेरी जंग), हैरान हू मै आप कि जुल्फो को देखकर (जवाब हम देंगे), साजन आ जाओ (आग ही आग), सो गया ये जहा (बेताब), गोरी है कलाईया (आज का अर्जुन), सोचना क्या जो भी होगा (घायल), मिलके ना होंगे जुदा (प्यार झुकता नही ), मेरे साथी जीवनसाथी (बाझी), तू पागल प्रेमी आवारा (शोला और शबनम ), तुम याद ना आया करो (जीने नही दुंगा ), दिल बेकरार था दिल बेकरार है (तेरी मेहरबानीया),तुझे कितना प्यार करू (कुदरत का कानून) अशी अनेक गाणी सांगता येतील. शब्बीरकुमारने मराठीतही गाणी गायली आहेत. गाऊ सख्या प्रीत गाणी, सिनेमावाले, जाऊ या डबलसीट, दणादण दे दणादण, पोलीसवाल्या सायकलवाल्या, देवी ही पावली वाट मला दावली, घेऊनी टांगा सर्जा निघाला यासारखी गाणी त्याने म्हटली आहेत. यातल्या काही गाण्यांवर अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने अभिनय केला आहे.

मुन्ना अझीजही झाले लोकप्रिय

मोहम्मद रफीच्या शैलीत गाणारा आणखीन एक लोकप्रिय पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद उर्फ मुन्ना अझीज. मो. अझीज कोलकात्याचा. त्याने पहिलं पार्श्वगायन बंगाली चित्रपटासाठी केलं. हिंदीत १९८४ मध्ये आलेला ‘अंबर’ हा त्याचा पहिला चित्रपट. मनमोहन देसाई-अमिताभ बच्चन या जोडगोळीच्या ‘मर्द’ या चित्रपटातल्या ‘मर्द टांगेवाला’ या शीर्षकगीताने तो प्रकाशझोतात आला. कुमार सानूचे आगमन होईपर्यंत मो. अझीज हिंदीतला आघाडीचा पार्श्वगायक होता. शब्बीरकुमार प्रमाणेच यालाही संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सर्वात जास्त संधी दिली. जवळपास २५० पेक्षा जास्त गाणी त्यांनी त्याला दिलीत. नौशाद-ओ.पी. नय्यर ते नदीम-श्रवण,जतीन-ललित पर्यंत तत्कालीन सर्व संगीतकारांकडे त्याने गाणी गायलीहेत. दिलीपकुमार-धर्मेंद्र-अमिताभ पासून ते अनिल कपूर- गोविंदा -अजय देवगण पर्यंत सगळ्यांसाठी तो गायला आहे. यानेही लता-आशासह अनेक गायीकांसोबत गाणी गायली.

हिंदीतला क्रमांक एकचा पार्श्वगायक

तो सुरुवातीला हॉटेलमध्ये गायचा. १९८४ मध्ये तो कोलकाताहून मुंबईला आला. मर्द चित्रपटानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. १९८७ मध्ये किशोरकुमारचे निधन झाल्यानंतर मो. अझीज हिंदीतला क्रमांक एकचा पार्श्वगायक बनला. त्याच्या लोकप्रिय गाण्यांवर हा एक दृष्टीक्षेप..इक लडकी जिसका नाम मोहब्बत (आग और शोला), आते-आते तेरी याद आ गई (जान कि बाझी), प्यार से भी ज्यादा तुझे प्यार करता हू (इलाका), आवाज हमारी इसी वादी में (शूरवीर), मै तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा (त्रिदेव), तेरा बिमार मेरा दिल (चालबाज),चुपचाप तू क्यू खडी है (नरसिंहा), इक दुसरे से करते है प्यार हम (हम), तू मुझे कबूल (खुदा गवाह), दुनिया मी कितना गम है (अमृत), दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिये (कर्मा), माय नेम इज लखन (राम लखन), पतझड सावन बसंत बहार (सिंदूर), इमली का बुटा (सौदागर ), अमिरोंकि शाम गरिबोंके नाम (नाम), आप के आ जाने से (खुदगर्ज ), आज कल याद कुछ रहता नही (नगीना), छोडेंगे ना हम तेरा साथ (मरते दम तक ), प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत ), हम तुम्हे इतना प्यार करेंगे (बीस साल बाद ), मै माटी का गुड्डा (अजूबा), फुल गुलाब का (बिवी हो तो ऐसी ), सावन का महिना (आई मिलन कि रात ), तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना (खतरो के खिलाडी ), उंगली में अंगुठी अंगुठी में नगीना (राम अवतार), कहना ना तुम ये किसी से ( पती पत्नी और तवायफ), जाने दो जाने दो मुझे जाना है (शहनेशहा), खत लिखना है पर सोचती हू ( खेल), एक अंधेरा लाख सितारे (आखिर क्यू ?) २७ नोव्हेंबर २०१८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मोहम्मद अझीजचं मुंबईत निधन झालं.

मोहम्मद रफीची गाणी सोनू निगमच्या आवाजात

पाकिस्तानी गायक अताउल्ला खान याने गायलेली गाणी टी-सीरीज कंपनीने सोनू निगम नावाच्या तरुण गायकाकडून गाऊन घेतली. ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. विशेषतः मासेसमध्ये. त्याचप्रमाणे मोहम्मद रफीची गाणी सोनू निगमच्या आवाजात टी-सीरीजने श्रोत्यांना सादर केलीत. अत्यंत गोड नि लवचिक आवाजाची देण लाभलेल्या सोनूची ही सारी गाणी लोकांना खूप आवडलीत. शिवाय त्याच्या आवाजच नव्हे तर लोकं गायकीच्याही प्रेमात पडले. सोनू निगम हा मो.रफीच्या आवाजाचा आधुनिक आविष्कार म्हणून ओळखला जाऊ लागला. जाणकारांच्या मते सोनूचा आवाजात रफी आणि किशोरकुमार दोघांची झलक दिसून येते. त्याने ‘आजा मेरी जान’ या चित्रपटात ‘ओ आसमावाले’ हे गाणं गाऊन पार्श्वगायक म्हणून हिंदी सिनेजगतात पदार्पण केलं. १९९५ मध्ये त्याने दूरचित्रवाणीवर ‘सा रे ग म पा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं. हा कार्यक्रम त्याने आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने आणि सादरीकरणाच्या शैलीने एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. त्याने गायलेली अच्छा सिला दिया तुने (बेवफा सनम ), संदेसे आते है (बोर्डर ), ये दिल दिवाना (परदेस), अभी मुझ में कही (अग्निपथ), हर घडी बदल रही (कल हो ना हो ), सुरज हुआ मद्धम (कभी ख़ुशी कभी गम), तन्हाई (दिल चाहता है ), कम्बख्त इश्क (प्यार तुने क्या किया ), साथिया-साथिया (साथिया), किस है ये इंतजार (मै हू ना ), धीरे जलना (पहेली),मै अगर कहू (ओम शांती ओम), इन लम्होंके दामन में (जोधा अकबर), आल इज वेल (थ्री इडियटस), पीहू बोले (परिणीता ), बंदे में था दम ( लगे रहो मुन्नाभाई ), तेरा रंग बल्ले बल्ले (सोल्जर),मेरे हाथ में तेरा हाथ है (फना), दो पल (वीर जारा), मुझे रात दिन बस मुझे चाहती हो (संघर्ष), नगाडा नगाडा ( जब वी मेट),सतरंगी रे (दिल से ), मेरी दुनिया है (वास्तव), खामोशीया गुनगुनाने लगी (वन टू का फोर), जाने दिल में (मुझ से दोस्ती करोगे ), गीत कब सरहदे मानते है (सरहदे), प्यारसे प्यारे तुम हो सनम (दिवानगी), कही प्यार ना हो जाए (बादल), कयामत हो कयामत (तेरा जादू चल गया ), छोटी छोटी राते (तुम बिन ), पंछी नदिया पवन के झोंके, ऐसा लागता है (रेफ्युजी ), तेनु लेके (सलाम-ए-इश्क) अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारासह फिल्म फेअर पुरस्कारही त्याला मिळाला आहे. चित्रपट गाण्यांखेरीज त्याच्या अल्बम मधली गाणी देखील लोकप्रिय झाली आहेत.

टी-सीरीजच्या गुलशन कुमार यांनी अजून एका गायकाकडून रफीची गाणी गाऊन घेतली आहेत. तो म्हणजे बिपीन सचदेव. निर्माता-दिग्दर्शक सावनकुमारच्या ‘सनम बेवफा’ मध्ये त्याने गायलेली गाणी बऱ्यापैकी गाजली होती. यातलं ‘बिना ईद के ही चांद का दीदार हो गया’ हे लतासमवेत म्हटलेलं गाणं लक्षणीय आहे. देबाशिषदास गुप्ता हा टी-सीरीजने शोधलेला अजून एक रफीचा अवतार. ‘जिना तेरी गली मे’ या अल्बम (पुढे याचा नावाचा चित्रपट गुलशनकुमार यांनी काढला) मधलं देबाशिषचं ‘मिलदी नसिबा नाल मोहब्बत’ हे गाणं रफीची आठवण करून देणारं आहे. टी-सीरीजनेच रफीने गायलेल्या मराठी गाण्यांचा अल्बम देबाशिषच्या आवाजात काढला आहे. १९९० मध्ये ‘बहार आने तक’ या नावाचा एक चित्रपट आला होता. यातलं गायक मंगलसिंग व अनुराधा पौडवालने म्हटलेलं ‘काली तेरी चोटी है’ हे पंजाबी ढंगाचं गाणं तेव्हा चांगलं गाजलं होतं. हा देखील रफीच्या शैलीत गाणारा गायक. पण त्याला फारशी गाणी मिळाली नाहीत.

मोहम्मद रफी हा एकमेवाद्वितीय गायक होता. त्याच्या प्रभावाखाली गाणाऱ्या गायकांनी काही काळ त्याचा आभास निर्माण केला. पण शेवटी अभासच. त्याची सर कोणालाही आली नाही. शब्बीरकुमार या गायकाला भसाड्या आवाजाचा तर मोहम्मद अझीजला बद्धकोष्ठ झालेला गायक अशी टीका समीक्षकांनी केली होती. रफीच्या स्मृतिदिनानिमित्त त्याच्या शैलीत गायचा यत्न करणाऱ्या गायकांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप रसिकांना आवडला असेल अशी आशा आहे.

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या