Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

Blog : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 70 वी पुण्यतिथी! सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी आणंद या छोट्याशा गावी झाला.

त्यांचे वडील झव्हेरीभाई यांनी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यामुळे लहानपणीच वल्लभभाईंना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. त्यांच्या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. सरदार पटेल हुशार विद्यार्थी होते.

- Advertisement -

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बोरसाड येथे वकिली सुरू केली. एक अभ्यासू वकील म्हणून त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. पुढे ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर अहमदाबाद येथे त्यांनी वकिली सुरू केली. अल्पावधीतच एक निष्णात वकील म्हणून त्यांची कीर्ती देशभर पसरली.

वकिलीसोबत त्यांना राजकारणाचीही आवड होती. त्यामुळे त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवली. ती निवडणूक सहज जिंकली. राजकारणात आल्यावर त्यांना जनतेचे मूलभूत प्रश्न समजू लागले. 1917 साली खेडा जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला.

खरिपाचे पीक वाया गेले. पुढे उंदरांचा सुळसुळाट आणि कीटकांमुळे रब्बीचे पीकही गेले. शेतकरी हवालदिल झाले. त्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांच्या हाती 25 टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली.

नैसर्गिक आपत्ती पाहता हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शेतसार्‍यात सूट मिळावी, शेतसार्‍याची वसुली पुढे ढकलावी यासाठी त्यांनी 18 हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलेले निवेदन सरकारकडे दिले, पण सरकारने त्याची दखल न घेता शेतसारा वसुलीसाठी शेतकर्‍यांवर जप्तीचे आदेश दिले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला.

महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतसारा वसुलीविरोधात खेडा येथे सत्याग्रह चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपवले. शेतकर्‍यांचे हे आंदोलन त्यांनी अत्यंत निर्धाराने यशस्वी केले.

या आंदोलनात त्यांनी केलेल्या नेतृत्वाने महात्मा गांधी भारावून गेले. पुढे महात्मा गांधी यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नेतृत्वाप्रमाणेच त्यांचे वक्तृत्वही प्रभावी होते. आपल्या वक्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणार्‍या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशनविरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहादरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी प्रभावित केले.

इंग्रजांनी अवाजवी वाढवलेले कर न भरण्यावर जनता सहमत झाली. परिणामी ब्रिटीश व्हाइसरॉयला पराभव पत्करावा लागला. या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई जनतेत चांगलेच प्रसिद्ध झाले. बारडोलीतील लोक त्यांना ‘सरदार’ म्हणू लागले. त्यामुळे त्यांच्या नावापुढे सरदार जोडले जाऊ लागले.

1930 साली सरदार वल्लभभाईंनी सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. या कारणावरून इंग्रजांनी त्यांना अटक केली. त्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनातही वल्लभभाईंनी भाग घेतला.

त्यावेळीही त्यांना अटक झाली. 1946 झाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत-पाक फाळणीच्या चर्चेत निर्णायक भूमिका बजावली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान बनले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती आणि नभोवाणी, संस्थांनचा तसेच निर्वासितांचे प्रश्न यांसारखे महत्वाचे खाते देण्यात आले.

स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यावर सरदार पटेलांनी आपल्या दूरदर्शीपणाचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून भारतातील वेगवेगळ्या संस्थानातील राजांना भारतात विलीन होण्याची सूचना केली. बहुतांश संस्थानांनी याला सहमती दर्शवली व ते भारतात विलीन झाले, पण जुनागड, हैदराबादचा निजाम, जम्मू-काश्मीरच्या राजांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला.

सरदार पटेलांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करून या तिन्ही संस्थानांना भारतात विलीन केले. सरदार पटेल यांनी तत्कालीन 565 संस्थाने भारतात विलीन करून एकसंध भारत निर्माण केला. त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच होती. याच कामगिरीमुळे त्यांना ‘लोहपुरुष’ ही पदवी देण्यात आली.

1950 साली त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांचे स्वास्थ्य इतके बिघडले की ते अंथरुणावरुन उठण्यासदेखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरदार पटेल यांना विनम्र अभिवादन!

– श्याम ठाणेदार

- Advertisment -

ताज्या बातम्या