वाचकांचा प्रतिसाद !

वाचकांचा प्रतिसाद !

'वेळ वैऱ्याची आहे, आता सावरलेच पाहिजे'! या कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांच्या १२ एप्रिल रोजी प्रसिध्द झालेल्या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रियांपैकी एक...!

प्रति,

डॉ. वैशाली बालाजी वाले, कार्यकारी संपादक, दैनिक देशदूत,

आपला ब्लॉग वाचला. एका अत्यंत, किंबहुना, सध्याच्या काळात, एकमेव अशा, ज्वलंत प्रश्नाला हात घातल्याबद्दल अभिनंदन. करोणा चे दुसऱ्या लाटेने सगळीकडे हाहाकार माजविला आहे. अशा परिस्थितीत सरकार म्हणजे आपले लोकप्रतिनिधी, सर्व प्रकारचे माध्यमे, प्रशासन आणि एकूणच समाजातील धुरीण या सर्वांनी एकमेकास समजून घेण्याची आवश्यकता आहे.

डॉकटर आणि एकूण सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या वर्षभरातील सेवेची दखल घेत त्यांना आधार देत, त्यांचे मनोबल वाढेल असे काही तरी केले पाहिजे. समाजात स्वयंशिस्त कशी राखली जाईल हे बघितले पाहिजे. सध्या औषधांचा तुटवडा, ऑक्सिजनची टंचाई, रुग्णालयातील खाटांची अनुपलब्धता या गोष्टींना भिडण्याची गरज आहे. संपूर्ण टाळेबंदी येऊ घातली आहे. ती कमीत कमी चौदा दिवस ठेवली तरच काहीतरी परिणाम होऊ शकतो. तरीदेखील आजच्या घडीला, जेव्हा करोना चा समूह संसर्ग झपाट्याने होत आहे.

अशावेळी युद्धपातळीवर लसीकरण करण्यासाठी पावले उचलणे हा एकमेव दीर्घकालीन उपाय होऊ शकतो. तात्कालिक उपाय म्हणून , आरोग्य यंत्रणा सक्षम करणे , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ टाळणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना ( जसे की मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता) विषयी आक्रमक जनजागृती करणे, या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्या करणे आवश्यक आहे. थोडक्यात सामंजस्याची भूमिका घेऊन प्रशासनाने पुढे आले पाहिजे. कोणत्याही प्रश्र्नी , कोणताही नियम अथवा बंधने सर्वांना सारख्याच न्याय्य पद्धतीने अमलात आणली जातील असे बघावे, म्हणजे जनक्षोभ टाळता येईल.

कमीत कमी नुकसान होत या संकटातून बाहेर पडू या विचाराने सर्वांनी काम करावे. माध्यमांची देखील भूमिका यात फार महत्वाची आहे. जास्तीजास्त सकारात्मक बातम्या कश्या देता येतील यावर कटाक्षाने लक्ष द्यावे.

आभार.

डॉ राजेंद्र कुलकर्णी

अध्यक्ष, कृती समिती, आय एम ए, महाराष्ट्र राज्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com