Monday, April 29, 2024
HomeUncategorized॥ अक्षय आनंदाचा ठेवा - अक्षय्यतृतीया ॥

॥ अक्षय आनंदाचा ठेवा – अक्षय्यतृतीया ॥

अक्षय तृतीयेचा आनंद अवर्णनीय आहे… अनेक दृष्टीने अक्षय तृतियेचे महत्त्व आहे. सुख. समृद्धी. आनंद. देणारा सण आहे. काळाच्या ओघात अनेक प्रथा परंपरा कमी होत असल्याचे जाणवते. असे सणवार आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. त्याची जपणूक करणे आपले काम आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, राजस्थान, या ठिकाणी अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. ह्या वर्षी अक्षय तृतिया आज 3 मे मंगळवार रोजी आहे. ह्या वर्षी 50 वर्षानंतर शुभयोग जुळून आला आहे.

शाख शु.तृतिया म्हणजेच अक्षय तृतिया. जी साडेतीन शुभ मुहूर्त आपण मानतो,त्यातच अक्षय तृतिया हे एक पुर्ण मुहूर्त आहे. 3 मे रोजी सकाळी पाच अठरा वाजता अक्षय तृतीया तिथीला प्रारंभ होऊन चार मे सकाळी सात बत्तीस वाजे पर्यंत ही तिथी आहे. अक्षय म्हणजेच क्षय न होणारे, नाश न पावणारे. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, बसवेश्वर जयंती, नरनारायण या देवतेची जयंती, परशुराम जयंती, असते.

या दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून श्रीगणेशाने काम केले अशी आख्यायिका आहे. ह्या दिवशी दानाचेही अत्यंत महत्व आहे.अक्षय तृतियेच्या दिवशी केलेल्या दानाचेही अधिक पटीने पुण्य मिळत असते, ते चिरकाल टिकणारे असते म्हणून अनेक जण अक्षय तृतीयेस छत्री, पायातल्या वहाणा, पाण्यासाठी माठ, रांजण, रूमाल, पंचे, कापड, वस्त्र,आदींचे गरजू व्यक्तींना, वृध्दाश्रमात, गोरगरिबांचे वस्त्यात जाऊन दान करत असतात. जवस, गहू, हरभरा, दुग्धजन्य पदार्थ, जलकुंभ, सर्व प्रकारचे रस, आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूचे दान करत असतात.

- Advertisement -

अनंत फलप्राप्ती होत असते. या तिथीला केलेले दान हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे.ज्याला ज्या प्रमाणात शक्य असेल तेवढे त्यांनी जरूर करावे.सतपात्री दान करावे अशी भावना आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात. विधिवत पूजा केल्यास आपले मनोरथ पूर्ण होतात.ह्या सुमारास उन्हाच प्रमाण वाढले असते, तापमान खूप असते.म्हणून अनेक व्यापारी मंडळी, रस्तारस्यावर पाणपोई सुरु करतात. जनावरांच्या पाण्यासाठी हौद, हाळ, बांधतात. ज्या ज्या पासून पुण्यप्राप्ती होईल ते.ते करतात.कारण ते अक्षय आहे.

अक्षय तृतियेला पितरांचे स्मरण करुन श्राध्द घालण्याचीही प्रथा आहे. या सणाचे निमित्ताने मनात पितरांची स्मृती जागृत होते.त्यांचे आशिर्वाद घराला मिळतात. या दिवशी पवित्र नद्यांच्या संगमावर किंवा गंगा स्नानाचे महत्त्व आहे गंगास्नानने ती व्यक्ती पवित्र होते पापमुक्त होते असा समज आहे.अक्षय तृतिया हे नाव पडण्यामागचे कारणमदनरत्न ह्या ग्रंथात सांगितले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की…अस्यां तिथौ क्षयमुपैति ह्रतं न दत्तं । तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया.। श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या तिथीला केलेले दान, हवन, क्षयाला जात नाही. याविषयी एक कथा प्रचलित आहे. शाकल नगरीत धर्म नावाचा वाणी राहत होता. तो सर्वसामान्य लोकांसारखा नव्हता. तो सत्य वचनी होता.

देवाची ब्राह्मणाची पूजा करीत होता. एकदा एका ब्राह्मणाने त्याला अक्षय तृतीयेचे महत्त्व सांगितले. त्याला ते पटले. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याने नदीवर जाऊन स्नान करून पितरांना तर्पण करून ब्राह्मणांना दक्षिणा दिली. अशाप्रकारे प्रतिवर्षी हा उपक्रम त्याने नित्यनेमाने सुरू ठेवला होता. कोणत्याही विघ्नाची त्यांनी पर्वा केली नाही. धर्म नावाप्रमाणे धर्मासारखा जगला, वागला. त्याचे भाग्य म्हणून परमेश्वराचे स्मरण करत असताना त्याला मृत्यू आला. गत जन्माची पुण्याई नंतर पुढील जन्मी त्याला कामाला आली आणि त्याला राज्य पद मिळाले. राज्यपद मिळाल्यावरही तो गर्विष्ठ बनला नाही आणि पूर्वीप्रमाणेच आपले दानधर्माचे व्रत सुरू ठेवले. परंतु त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही आणि याचे कारण म्हणजे त्याने अक्षयतृतीयेला भरपूर दानधर्म केला होता.हा मुहूर्ताचाच दिवस असल्याने, सोने, चांदी, दागिने मौल्यवान वस्तुंची खरेदी. अनेक शुभ कामांना प्रारंभ, केला जातो. नवीन जागा व्यवसाय चे उद्घाटन नवीन वाहन खरेदी नवीन संकल्प या दिवशी सुरू केल्या जातात कोणतेही शुभ कार्य या दिवशी सुरू केल्यास ते कायमस्वरूपी टिकून राहते. या दिवशी कृषिसंस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची ही पूजा होते. शेतकरी शेतीच्या कामाला सुरूवात करतात. शेतकरी शेती कामासाठी नविन सालदाराची नेमणूक करत असत.आज ही प्रथा काहीच ग्रामीण भागात आढलून येते.काळा नुसार प्रथा बदलतात.सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अशा परिस्थितीत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणपोई काढून पुण्य पदरी पाडावे, अशी स्थिती आहे. ह्या काळात नामस्मरणालाही तेवढेच महत्व आहे.

आपल्याला प्रिय असलेल्या देवतेचे होईल तेवढे नामस्मरण करावे.विष्णुसहस्त्रनाम,लक्ष्मीची उपासना, करावी.. ह्या दिवशी केलेल्या नामस्मरणाने घरातील दोष नाहीसे होतात.आपल्याला आवडत्या देवतेचे नमस्मारण किंवा मंत्र पठाण याने पुण्य अखंड टिकून राहते . ॥ ओम नमो भगवते वासुदेवाय ॥ किंवा ॥ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥ हा जप आपण करू शकतो. स्त्रियांनी घरात चैत्र गौरीची स्थापना केली असते. ह्या शेवटच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. गौरीला सांजोरी, करंजी, शेवेचा, नैवेद्यही दाखवतात.त्या निमित्ताने महिला एकत्र येतात. आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे, देतात.

मोगर्‍याच्या फुलांचे गजरे देतात. खान्देशात अक्षय तृतीया सण फार उतत्साहात साजरा होतो. ह्या भागात आखाजी म्हणून हा ओळखला जातो. ग्रामीण भागात पत्याचे डाव रंगतात. जुगार खेळायला परवानगी असते.

तरुण,वयस्कर,सर्वच ह्यात सहभागी होतात.गल्लीत, देवळाच्या ओट्यावर, गोठयात, पारावर, जागोजागी डाव रंगललेे दिसतात.मुली माहेरवाशीण म्हणून आलेल्या असतात.त्यांच्या साठी पुरणपोळी,आंब्याचा रस, कटाची आमटी,काही ठिकाणी मांडे( म्हणजे खापरावर केलेल्या मोठ्या पुरण पोळ्या)हा बेत हमखास असतो. अक्षय तृतियेला भगवान परशुरामची जयंती असते. भगवान विष्णूचा हा सहावा अवतार, आणि अष्टचिरंजीवा पैकी एक चिरंजीव अशी त्यांची महती आहे. त्यांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी परशुरामाची मिरवणूक काढण्यात येते. आपल्या महाराष्ट्रात चिपळूण जवळ भगवान परशुरामाचे मंदिर आहे. एके वर्षी आम्ही आमच्या सदगुरु माऊली समवेत सात आठ दिवस ऋषिकेशला होतो त्यावेळी अक्षयतृतीयेला गंगा स्नान आणि स्वामी शिवानंद स्वामींचे आश्रमात महाप्रसाद घेतला होता. त्या अक्षय तृतीयेचा आनंद अवर्णनीय आहे…अनेक दृष्टीने अक्षय तृतियेचे महत्त्व आहे. सुख. समृद्धी. आनंद. देणारा सण आहे. काळाच्या ओघात अनेक प्रथा परंपरा कमी होत असल्याचे जाणवते. असे सणवार आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे.त्याची जपणूक करणे आपले काम आहे. महाराष्ट्र सह दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, राजस्थान, या ठिकाणी अक्षय तृतीया सण साजरा केला जातो.ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्व जण एक संकल्प करु . देवासमोर एक धान्याचा आणि दुसरा पाण्याने भरलेला असे कलश ठेउन सुख, समृद्धीसाठी अक्षय वरदान मागू या.ह्या वर्षी अक्षय तृतिया 3 मे मंगळवार रोजी आहे. ह्या वर्षी 50 वर्षानंतर शुभयोग जुळून आला आहे. आपण सगळे सुख,समृध्दि, आरोग्य,या साठी, भगवान विष्णू आणी लक्ष्मीदेवी कडे प्रार्थना करु या.

- Advertisment -

ताज्या बातम्या