फुकाची बडबड हवी कशाला?

मुलं म्हणजे मोठयांची प्रतिकृती नाही. त्याला स्वतःचा विचार असतो. त्याला काही सांगायचे असते. त्याला स्वतःचे मत असते पण या सर्व गोष्टींचा घर, शाळा, समाजात किती विचार केला जातो यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. मुलांनाही स्वतःच्या शिक्षणांची चिंता असते. अनेकदा मुले गावातील वाया जाणारे पाणी, रस्त्यावरची न होणारी साफसफाई, गावातील व्यसनाधिनता.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
फुकाची बडबड हवी कशाला?

घर, शाळा आणि समाजामध्ये मुलांच्या बददल नेमका काय आणि कसा विचार केला जातो? असा प्रश्न केला तर प्रत्येक जन चांगला विचार करतो असे सांगेल. पण तो विचार खरचं बोलतो तसा असतो का? युनोने जगभरातील बालकांना बालक हक्क प्रदान केले आहेत. भारत सरकारने बालकांच्या अधिकाराबाबत कायदे केले. शिक्षण हक्क कायद्यात बालकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणांचा अधिकार आणि हक्क याबददल विचार करण्यात आला.

राष्ट्राकरीता प्रत्येक मुलं म्हणजे उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहे. मुलं म्हणजे भविष्यासाठी उत्तम व जबाबदार नागरीक आहे असे म्हणून आपण त्यांच्या प्रति बोलत असतो. घरी त्याच्याबददल प्रेम, जिव्हाऴा, आपुलकी यासंदर्भाने बोलत असतो. बालकांच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी मानसशास्त्रही वेगवेगळे सिंध्दातांची मांडणी करीत खूप काही सांगत आहे. शासनाच्याही विविध योजना बालकांच्या विकासासाठी राबविल्या जातात. मात्र बालकांच्या परीस्थितीत सुधारणा होतांना दिसते का? अशा प्रश्न पडतोच. जोवर वास्तव बदलत नाही तोवर असे प्रश्न पडत राहणार.

फुकाची बडबड हवी कशाला?
मुलं हाच आरसा..

मुलं म्हणजे मोठयांची प्रतिकृती नाही. त्याला स्वतःचा विचार असतो. त्याला काही सांगायचे असते. त्याला स्वतःचे मत असते पण या सर्व गोष्टींचा घर, शाळा, समाजात किती विचार केला जातो यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. मुलांनाही स्वतःच्या शिक्षणांची चिंता असते. अनेकदा मुले गावातील वाया जाणारे पाणी, रस्त्यावरची न होणारी साफसफाई, गावातील व्यसनाधिनता. यासारखे अऩेक प्रश्न मुले घेऊन चर्चा करतात. याचे कारण त्यांना काही कळत असेत. त्यांचबरोबर त्यांना चांगली शाळा हवी. त्यांना उत्तम सुविधा हव्यात. चांगले शिक्षक हवेत. त्यांना खेळासाठी मैदाने हवीत. त्यांना उत्तम आहार हवा. अऩेक गोष्टी त्यांना हव्या असतात. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी हा त्यांचा अधिकार असतो.. पण त्यांच्या हक्क आणि अधिकाराची भाषा कायद्यात केली जात असली तरी त्यांना ते अधिकार मिळतात का? याचा विचार करण्याची गरज आहे.

मुळात आपल्याकडे मुलांना स्वतंत्र्य आस्तित्व नाही. त्यांना प्रत्येकवेळी गृहित धरले जाते. त्यांच्यासाठी जरी काही केले जाणार असेल तरी त्यांना फारसे कोणी त्यांचे मत विचारात घेत नाही. त्यांना काय कळते अशी साधारण मोठयांचा सूर असतो. घरात त्यांना कपडे घ्यायचे म्हटले तरी त्यासाठीच्या रंगाची निवडही पालकच करणार. खाऊ हवा असला तरी मोठेच निवडणार. लहान मुलांनी काय करावे? हे देखील मोठेच ठरविणार. त्यांना काय आवडते? त्यांनी कोणत्या विषयाचा अभ्यास करावा? त्यांनी कोणत्या शाखेला जावे? कोणती शाळा निवडावी? हे त्यांच्या अभिरूची, कल यापेक्षा मोठयांची प्रतिष्ठेने ठरवावे. जसे घरात मुलांना गृहित धरणे होते त्याप्रमाणे समाजातही दिसत असते. भोवतालमध्ये जसे आहे त्याच प्रमाणे सूरात सूर मिसळणे व्यवस्थेचे पण होते. बालकांना स्वतंत्र्य आस्तित्व असणे महत्वाचे आहे. त्यांना अधिकारासाठी संघर्ष करावा लागत असतो. आमचे अधिकार आम्हाला द्या असे त्यांची हाक असते. त्यांच्या अधिकाराबाबत समाज मन फारसे जागृत असल्याचे वर्तमानातही दिसत नाही.

फुकाची बडबड हवी कशाला?
आपण मुलांना गृहित का धरतो?

मुलं जेव्हा आपल्या हक्कासाठीचा प्रयत्न करत असते, त्यासाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपल्याला त्या संदर्भाने प्रश्न विचारला तर आपण त्यांना “आघाव” म्हणत दुर्लक्ष करीत असतो. एकदा शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे एक मुलगी आपल्या तीन चार मैत्रींनींना घेऊन गेली. तीने मुख्याध्यापकांकडे अगदी बिनधास्तपणे एका शिक्षकाची तक्रार केली.अमुक अमुक सर शिकवत नाही. ते फक्त वाचून दाखवितात. समजून सांगत नाही. महत्वाचे काही लिहून देत नाही. त्यांनी शिकविलेले आम्हाला कळत नाही. ही तक्रार करणारी मुलगी पाचवीच्या वर्गातील होती. म्हणजे वय अवघे 10 ते 11 असेल पण तीला नेमके काय सांगायचे होते ते ती अत्यंत बिनधास्त सांगत होती. मुख्याध्यापकांनी ऐकून घेतले आणि दुस-या दिवशी त्या सरांच्या तासाला निरिक्षणासाठी येऊन बसले.त्यांनी पाठाचे निरीक्षण केले तर, शिक्षकांनी विषयाची, घटकाची कोणतीच तयारी केलेली नव्हती. मुलींनी सांगितलेल्या घटकाप्रमाणे केवळ वाचून दाखविण्याचा प्रकार सुरू होता.

मुलींच्या वह्या तपासल्या तेव्हा वहयांमध्ये काहीच नव्हते. शेवटी मुख्याध्यापकांनीच घटकावरती शिक्षकांना दोन तीन प्रश्न विचारले तेव्हाही त्यांना सांगता आले नाही. मुलींनी केलेल्या तक्रारीत निश्चित आधार होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले. मुलांना सर्व काही कळत असते. त्यांना गृहित धरून चालणार नाही. शाळा व्यवस्थापन समितीत दोन विद्यार्थी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा शासन निर्णय आहे. त्यांचा समावेश करण्यामागची भूमिका शासनाची तीच आहे. त्यांच्या शैक्षणिक समस्यांबरोबर त्यांच्या गरजा, अपेक्षा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांची मदत व्हावी या दृष्टीने त्यांचा व्यवस्थापन समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यांचा समावेश करण्यात येऊन त्यांना अधिकार दिले आहेत असे म्हणून आपल्याला थांबता येणार नाही, तर त्यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य,त्यांनी मांडलेल्या मताचा किती गंभीर पणे विचार केला जाईल हे महत्वाचे ठरणार आहे.

फुकाची बडबड हवी कशाला?
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

समाजात बालकांच्या संदर्भाने वेगवेगळ्या पातळीवर आणि स्तरावर कितीतरी प्रमाणात मोठी माणसं व्यक्त होत असतात. बालकांच्या संदर्भाने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ हे प्रशिक्षित असते. त्यांना सेवापूर्व प्रशिक्षण ,सेवातंर्गत प्रशिक्षण दिले जाते.त्या प्रशिक्षणामध्ये बालकांच्या अधिकारा बाबत चर्चा होत असते.मात्र प्रशिक्षणांत जे शिकलो त्याचा परीणाम किती प्रमाणात दृष्टीकोन बदलण्यात होतो हा खरा प्रश्न आहे. खरेतर मुलांचे स्वातंत्र्य,अधिकार, हक्क, कर्तव्य याबाबत नागरीकांनी, मोठया माणसांनी केवळ वाचन करणे पुरेसे नाही.आपण जे वाचले आहे त्यातील अर्थ, दृष्टीकोन लक्षात घेऊऩ वर्तनात बदल घडायला हवा आहे. कुटुंब बदलाच्या संदर्भाने बालकांचा विचार नेहमीच महत्वाचा असतो. बालक हा मोठयांसाठीचा आरसा असतो.

गिजूभाई बधेका यांनी अत्यंत मार्मिक शब्दात बालकांच्या संदर्भाने किती गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, की “मुलांबददल आपण खुप वाचले. त्यांच्या अधिकारावर चर्चा केली. त्यांच्याप्रति संवेदनशील असलेल्या भावनांचे प्रकटीकरण, त्यांचे हक्क,कर्तव्य या संदर्भाने पुस्तकांचे वाचन केले म्हणजे झाले असे होत नाही. आपण मुलांच्या बाबतीत जे वाचले आहे ते वाचून जर दृष्टीकोन बदलत नसतील तर त्या वाचनाचा काहीच उपयोग नाही”. ते वाचन म्हणजे पालथ्या घडयावर पाणी असेच म्हणावे लागेल. अनेकदा मोठी माणंस बालकांच्या हक्क आणि अधिकारावरती लिहितात. त्या लिहिण्याचा विचार देखील महत्वाचा आहे. पण ते लिहितांना तितके अधिकार आणि स्वातंत्र्य दिले जाणार नसेल तर त्याचाही काही उपयोग नाही. आपण बोलतो, विचार करतो मात्र त्या प्रमाणे आपण कृती करतो का? हा खरा प्रश्न आहे. बालकांची केवळ वरवरची काळजी करून आपल्याला चालणार नाही. मुलांच्या संदर्भाने आपण मनापासून काळजी घ्यायला शिकायला हवे. त्याबाबत मोठयांनी सतत गंभीर असायला हवे.

फुकाची बडबड हवी कशाला?
तुम्ही फक्त इतकेच करा..!

बालकांच्या संदर्भाने अपेक्षा व्यक्त करतांना अशा स्वातंत्र्यात जगणा-या बालकांचे नविन ज्ञान मंदीरे उभारणार आहोत. ते ज्ञान मंदिर हे केवळ भिंतीच्या आतले शिकणे नाही तर त्या ज्ञानमंदिरात ज्ञान आणि विवेकाची स्थापना करायची आहे. ज्ञानांचे मंदिर उभे करतांना विद्यार्थ्याला अऩुभवाचे शिक्षण महत्वाचे आहे. अऩुभव मिळाला तर ज्ञानाची निर्मिती होणार आहे. ज्ञान निर्माण करण्यात विद्यार्थी यशस्वी झाला तर विवेकापर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुळात विद्यार्थ्यांना माहिती सांगून परीवर्तनाची अपेक्षा करता येत नाही. मात्र ज्ञानापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक समृध्दपणाचे अनुभव महत्वाचे आहे. अऩुभवातून शिकतांना विचार प्रक्रिया गतीमान व समृध्द होत असते. ती जितकी समृध्द होते तितका विवेकापर्यंतचा प्रवास शक्य आहे. असा ज्ञानमय व विवेकाचा प्रवास म्हणजे मुलांच्या बाबतीत नव्या युगाचा आऱंभ समजायला हवा. आपण अनेकदा नव्या युगाचा विचार करीत असलो तरी ते युग केवळ भौतिक विकासापुरते मर्यादित नाही. आपण विकासाचे चित्र निर्माण करीत असलो तरी नवे युग मात्र मुलांचे असणार आहे. खरेतर ही मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे मुलांच्या बाबतीत केवळ फुकटच्या गप्पा मारून फार काही साध्य होणार नाही. फुकटची पोपटपंची मुलांच्या हिताची नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीत जर आपल्याला प्रिती असेल तर आपण जे वाचतो, लिहिती आणि बोलतो त्या गोष्टी कृतीत आणण्याची निंतात गरज आहे. अन्यथा बालकांच्या हिताच्या गप्पांचा फारसा उपयोग नाही. त्यामुळे जे बोलते तेच करावे ही अपेक्षा काही व्यर्थ नाही.

फुकाची बडबड हवी कशाला?
घर हीच शाळा...

व्यर्थ आहे बडबड

मुलांबददल वाचले, लिहिले, विचार केला... झाले?

नाही. आपल्याला नवीन मंदिरे उभारायची आहेत.

आणि त्यात ज्ञान आणि विवेकाची स्थापना करायची आहे.

मुलांचे नवे युग सुरु झाले आहे.

फक्त बोलून फायदा नाही,

आपल्याला काहीतरी करुन दाखवायचे आहे, कृतीत आणायचे आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com