Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगकठीण आहे वाट परी...

कठीण आहे वाट परी…

पालक आणि शिक्षकंहो आपण मुलांच्या सोबत काम करीत आहोत. त्या कामात मुलं आपली सोबत करीत आहेत. ते कदाचित प्रत्यक्षपणे आपल्या सोबत कामाला हात लावत नसले, मदत करीत नसले तरी ते आपल्या सोबतच असतात. आपले मुलांवरती प्रेम असेल तर त्यांची सोबतही कामात आनंद देत असते. मुलांची सोबत म्हणजे अडचण, अडथळा नाहीच मुळी, त्यांची सोबत म्हणजे मोठयांसाठी उर्जा असतो. उत्साह असतो.

अर्थात यासाठी मुलांच्या सोबत मुलं होणे महत्वाचे असते. आपण मुलांसोबत काम करताना आपल्याला आऩंद मिळतो का? आणि तो जर मिळत नसेल तर त्या कामात कोणताही राम नाही हे लक्षात घ्यायला हवे. मुलांचा सहवास म्हणजे निखळ आऩंदाचा खळखळता झरा असतो. त्यांचा सहवास म्हणजे जीवनातील समस्या निराकरणाची जादू असते. मुलं म्हणजे निखळ आऩंद असतो. त्याच्या सोबतच्या प्रवासात आपल्या चिंता हरवून टाकतो. मुलांसोबत लहान होणे म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रवासाची दोरी लांबविणे आहे. मुले त्यांच्या सोबतच्या असलेल्या प्रत्येकाला निखळ आऩंद वाटत असतात.त्यांच्या सहवासात असाल तर आपल्याला त्रागा करावा लागत नाही. मुलांच्या सहवासात एकदा मोठयांनी लहान होऊन पाहाण्याची गरज आहे.

- Advertisement -

घर हीच शाळा…

मोठे म्हणून आपण आपल्या उपदेशाचा अधिकाराचे जतन करीत असतो.वयाने मोठे झालेल्या प्रत्येकाला काही अधिकार मिळत असतात.मोठेपणात काही एक गृहितक असते. आपण छोटयांना उपदेश करतांना जे काही सांगत आहोत ते जर त्यांना सांगणा-या माणसांत दिसले तरच सांगणा-यांचे ते ऐकत जातात. मुलं तुमच्या शब्दांतून व्यक्त होणे ऐकत नसते तर तुमचे वर्तन जे काही सांगत असते त्याचे अनुकरण करत असतात.मुले शब्दांचे नाही तर वर्तनाचा आवाज ऐकत असतात. वर्तनाचा आवाज म्हणजे मोठयांसाठी आतला आवाज असतो. मोठयांना जे पटते तेच ते स्विकारतात. त्यामुळे मोठे जसे वर्तन करतात तसेच मुले आपले वर्तन करीत असतात. त्यामुळे छोटी मुले म्हणजे मोठयांसाठी आरसा असतो.

जेव्हा मुलांसोबत काम करतांना आऩंद मिळत नाही तेव्हा त्यात मुलांचा दोष नसतो, तर दोष असतो तो मोठयांचा.मुले आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांना तुम्ही जे काही सांगाल ते अत्यंत प्रामाणिकपणे करतील यात शंका नाही. मुले कधीच कामचुकार नसतातच मुळी. मात्र ते मोठय़ांच्या सहवासात जसे जसे अधिक काळ राहू लागतात आणि त्यांच्याकडे पाहूनच ते शिकू लागतात. हळूहळू मोठय़ांचे अनुकरण करू लागतात. मुले ऐकून फार कमी शिकतात.त्या उलट ती ‘पाहूनच’ जास्त शिकत असतात.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

एकवेळ मोठी माणसं आपल्या वर्तनात प्रामाणिक असतीलच असे नाही. मात्र लहान मुले कधीच अप्रमाणिक नसतात. त्यांचे अप्रमाणिकपणा जो मोठयांना दिसतो ते वर्तन मोठयांच्या वर्तनाची सावली असतो. मोठी माणसं समाजात बरेच काही शिकतात आणि शिकवितात देखील.त्यामुळे मुलांच्या सहवासात राहायचे असेल आणि काही पेरणी करायची असेल तर मोठयांनी काळजी घ्यायला हवी असते .आपण जे बोलायचे असते तसेच वागायचेही असते हे लक्षात घ्यायला हवे. तुकोबांच्या भाषेत मुलांच्या सोबत काम करताना आणि उपदेशाचे डोस पाजताना “ बोले तैसा चाले..” या न्यायाचे वर्तन हवे.

मुलांच्या सोबत काम करताना छोट्यांपेक्षा मोठयांना अधिक प्रामाणिक राहावे लागते.याचे कारण मोठी माणसं आदर्शाची पाऊलवाट सांगत राहतात. उपदेशाचे ठोस पाजणे जगात कोणाही साठी अत्यंत सोपे काम आहे. त्यातल्या त्यात छोटी बालके म्हणजे उपदेश पाजण्यासाठीची जागा असते.त्यांच्यासाठी उपदेशाचे स्त्रोतत्र नेहमीच तयार असतात. मुलांना उपदेश करण्या इतके जगात स्वस्त असे दुसरे काही नाहीच. मात्र त्यांना कोणी उपदेश करीत असते तेव्हा ते बिचारी ऐकून घेतात .बालके आपल्या बोलण्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करीत असतात. त्यांचे आपल्या बोलण्याकडे जितके लक्ष असते त्यापेक्षा अधिक लक्ष हे आपल्या वर्तनाकडे असते हे लक्षात घ्यायला हवे.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

एकदा एक आजीबाई आपला नातू गोड खातो म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे भेटण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.त्या गांधीजींना भेटल्या.गांधीजींनी येण्याचे कारण विचारले तर त्या म्हणाल्या “ हा माझा नातू . तो खूप गोड खातो.त्याला तुम्ही काहीतरी समजून सांगा ”. एवढे ऐकल्यावर गांधी म्हणाले “ आता पुढील आठवडयात या. मग त्याला समजून सांगू ”.आजीबाई पुन्हा ठरल्याप्रमाणे पुढील आठवडयात आल्या.त्यांनी पुन्हा आपले गा-हाणे गांधीजींकडे मांडले.तेव्हा गांधीजी त्या मुलाकडे पाहत त्याला म्हणाले “ बाळा गोड खात जाऊ नये ” आणि संवाद थांबला. त्या आजीबाईंना प्रश्न पडला जर एवढेच सांगायचे होते, तर हे मागील आठवडयात पण सांगता आले असते.

मग हे आठ दिवसांनी बोलावून का बरे गांधीजींनी सांगितले?. हा प्रश्न आजीबाईंच्या मनात सतत डोकावत होता. अखेर न राहून त्यांनी गांधीजींना विचारलेच. “तुम्ही या एका वाक्याचा उपदेश करण्यासाठी आठ दिवस का घेतले?” तेव्हा गांधीजी म्हणाले “तुम्ही जेव्हा मुलाची तक्रार घेऊन आलात, तेव्हा मीच खुप गोड खात होतो. आता मी गोड खाणे कमी केले आहे . त्यामुळे मी गोड कमी खा हे सांगण्याच्या पात्रतेचा झालो आहे. म्हणून आता मी त्याला सांगतो आहे.” मुळतः कोरडे उपदेशाचा डोस कधीच कोणालाही पचनी पडत नाही. अनेकदा लोक म्हणतातही मी खूप प्रयत्न केले पण परीणाम झाला नाही.मोबाईलमध्ये सतत डोके घालून बसलेला माणूस कितीही म्हणाला मोबाईलचा उपयोग करू नको तर त्याचा परीणाम साधला जाण्याची शक्यता अजिबात नसते.आपण सांगून जेव्हा समोरच्यावरती परीणाम होत नाही तेव्हा समजावे आपला उपदेश आचरण शुन्य आणि कोरडा आहे.

आपण मुलांना गृहित का धरतो?

सर्वदूर मुले आमचे ऐकत नाही अशी तक्रार असते. पूर्वीचे मुले फार चांगली होती.ते सांगतील ते ऐकत होती मात्र सध्या असे घडत नाही. या म्हणण्यामागे मुले बिघडली असा दृष्टीकोऩ अधोरेखित होत असतो; पण पूर्वी सांगणारी माणसं आचरणाची होती हे आपण का बरं विसरतो?. आपण जेव्हा सांगण्याची पात्रता कमावतो तेव्हाच मुले ऐकत असतात. गांधीजींनी अधिकार मिळविला म्हणून मुलांने ऐकले. मग ते सांगणे कितीही साधे, सरळ असले तरी त्याचा परीणाम होत असतो. अन्यथा तुम्ही कितीही रसाळ आणि शब्दांचा फुलोरा उभा केला तरी परीणाम साधला जात नाही. मुळात सांगणा-याची प्रतिमा आणि प्रतिभा या विचाराप्रमाणे वर्तनात प्रतिबिंबीत होत असतील तरच संवाद फुलतो आणि परीणामकारक ठरतो.

जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी चळवळी उभ्या केल्या त्या सर्व नेत्यांनी ती वाट चालताना स्वतःत बदल घडविले होते. त्यामुळे आपण ज्या मार्गाने जात नाही त्यामार्गाने मुलांनी जावे असे वाटत असेल तर ती कधीच जाणार नाही. ती गेल्यासारखी कदाचीत दाखवतील आणि आपल्याला तसे वाटेलही पण तो केवळ भास असेल. त्यामुळे मुलांना फुकाचा उपदेश न करणे हेच मोठयांच्या हिताचे आहे. मुलांसाठीच्या वाटा आदर्शाच्या उभ्या करण्यापेक्षा आपल्याच वाटा आदर्शाच्या चालायला हव्यात. त्या जितक्या चालत जाऊ तितक्या प्रमाणात मागील पीढी आपल्या मागे चालत येतील. संस्कृत मध्ये म्हटले जाते महाजनः येन गतःस पंथः.मोठी माणसं ज्या वाटेने चालतात त्याच वाटेने छोटी मुले चालत असतात हे लक्षात घ्यायला हवे.

मुलं हाच आरसा..

आपण या छोटया मुलांसोबत जेव्हा काम करीत असतो तेव्हा त्यांच्या सोबत काम करणे हे मोठयांसाठी कठीण असते त्या यामुळेच. आपल्याला मुलांना वाचता यायला हवे.त्यांच्या स्वभाव ओळखणे देखील महत्वाचे असते. आपल्याला वरवर त्यांना जाणता येऊन चालणार नाही. त्यांना आपण अत्यंत आदराने वागवायला हवे. त्यांना मान दिला तर ते आपल्याला मान देतील. आपण जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे हे लक्षात घेऊन चालत राहयला हवे. मुलांशी वागताना निसर्ग नियमाचा विचार करण्याची गरज आहे.

मुलांवरती विश्वास ठेवणे आणि त्यांचेवरती प्रेम करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.मुलांवरती प्रेमाची सवय लावणे आणि त्यांच्यावरची विश्वास दृढ करणे इतके सहज आणि सोपं काम नाही.आपल्याला त्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.शेवटी मुलं समजून घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.त्यांना जाणता आले की त्यांच्या वाटा जितक्या निर्मळ होतात तितक्याच वाटा आपल्याही अधिक निर्मळ होतात.आपण त्या वाटेने जाण्यासाठी आपली वाट अधिक कठीण आहे.ती आपण चालत राहिलो तर त्यांच्याही वाटा ते चालत राहतील..म्हणून आपणच मुलांच्या वाटा समृध्द करण्याकरीता चालत राहयाला हवे आणि परीश्रम घ्यायला हवेत.त्या वाटा कठीण आहेत पण असाध्य नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे.

फुकाची बडबड हवी कशाला?

गिजूभाई म्हणतात…

योग्य परिश्रम

मुलांसोबत काम करणे अवघड आहे

मुलाचा स्वभाव ओळखणे,

त्याच्या भावना स्थिर करणे आणि त्याला मान देणे

ही गरज आहे

मुलावरचा विश्वास आणि प्रेम ह्या कठीण बाबी

त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागेल

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या