Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगअसे असावे सुंदर घर...

असे असावे सुंदर घर…

माणसं जीवनभर कष्ट करीत घाम गाळत असतात. रक्त आटवत पैसे मिळवितात आणि त्या कष्टाच्या मागे एका सुंदर घराची प्रेरणा, अपेक्षा आणि स्वप्न दडलेले असते. ते सुंदर घर वीटा, सिंमेट आणि लोखडांच्या सळायांमधून फुलते का..? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. घराच्या संदर्भाने प्रत्येकाच्या कल्पना भिन्न आहेत. पण घराचे खरे सौंदर्य हे आपल्या घरातील मुलांच्या आस्तित्वाने बहरते. त्या मुलांसाठी ते घर किती आनंद घेऊन येते आणि त्यांना आनंद देते त्यावरती ते घराचे घरपण अवंलबून असते. “घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जीव्हाळा नकोत नुसती नाती..” अशा भावना एका कविने व्यक्त केल्या आहेत.

घर महत्वाचे नाही तर घरपण महत्वाचे असते. घराच्या दिसण्याला फार काही अर्थ नसतो त्या घरात राहाणारी माणसं कोणत्या नात्याची आहे त्यापेक्षा त्या नात्यात प्रेमाचा किती गोडवा आहे हे महत्वाचे.घर किती मोठे आहे त्यापेक्षा तेथील राहाणा-या माणसांची मने किती मोठी आहेत त्याला अधिक मोल आहे. घर किती सजविले आणि रंगविले आहे त्यापेक्षा मन किती आनंदाने रंगलेले आहे आणि सृजनशीलतेने फुलले आहे याला अधिक महत्व आहे. घराला किती तोरणे आहेत याही पेक्षा मनाला किती सुंदर विचाराचे तोरण आहे हे मोलाचे नाही का ? घराला घरपण हे किती लाखांचे घर आहे यावर अवलंबून नाही तर त्यात किती लाखमोलाची माणसं प्रेमाने राहातात हे महत्वाचे आहे.

- Advertisement -

आपण काय पेरतो आहोत..?

त्यामुळे घर किती चांगली आहेत त्यावर शाळांचे भविष्य अवलंबून आहे. बालकांच्या आयुष्यातील घर हे पहिले संस्काराचे केंद्र आहे. त्यानंतरच शाळा येते.पण घरे चांगली असतील तर शाळा आपोआप सुंदर आणि देखण्या बनतील.कारण चांगल्या माणसांच्या आस्तित्वाने समाज बनतो. समाज उत्तम आस्तित्वात आल्यानंतर तेथील संस्थाही तेवढयाच चांगल्या निर्माण होतात.त्यामुळे आपल्या समाजात चांगली घरे निर्माण करण्याकरीता गिजूभाई सातत्याने मुलांच्या अधिकारा संदर्भाने बोलता आहेत.जेथे मुलांचा विचार केला जात नाही ते घर कितीही उत्तम असले तरी त्या घरात बालकांना केवळ भिंतीची सुरक्षा आहे.ते घर मुलांसाठी घर नाहीच.अशा घराला घर तरी कसे म्हणावे.

गिजूभाई म्हणतात जेथे घर आहे आणि तेथील घरातील पालक,मोठी माणसं जर प्रेमाने राहात असतील तर त्या भिंतीना आस्तित्व आहे. घरात राहाणा-या नात्यातील प्रत्येक माणंसात प्रेमाचा धागा असायला हवा. केवळ नाते आहे म्हणून एकत्र राहत असतील तर ते घर काय आणि लॉज काय यात कोणताच फरक नाही. त्यामुळे नाते आणि त्यापलिकडे प्रत्येक माणूस प्रेमाने बांधला जायला हवा.त्यांच्या फुलणा-या प्रेमाने तेथील निर्जीव असलेल्या भिंती देखील प्रेमाने ओतप्रोत जीवंत पणाचा अनुभव घेऊ शकतील. प्रेम हेच घराच्या आस्तित्वाचे राज आहे.त्यामुळे सुंदर घराची कल्पना म्हणजे काय आहे ? तर केवळ आणि केवळ व्यापक अर्थाने प्रेमाचा ओलावा असलेल्या चारभिंती म्हणजे देखील घर असते .प्रेम माणंसाला आणि त्यांच्यातील नात्याला भक्कम बांधून ठेवते.प्रेम म्हणजे संघर्षाचे आस्तित्व शुन्य करणे आहे. व्देषाला जिंकणे आहे. प्रेमाने ओतप्रोत भरलेली माणसं असतील तर घरात स्नेह देखील भरून असतो.प्रेमाचे नाते असेल तर चूकांचे आस्तित्व संपुष्टात येते. प्रेमाच्या नात्यात एकमेकाच्या उणीवांचे दर्शनच घडत नाही.प्रे म म्हणजे समर्पण असते.प्रेम म्हणजे पूर्णत्वाचा स्विकार असतो.त्यामुळे ज्या घरात पालक प्रेमाने राहातात ते सुंदर घर मानायला हवे.मुलांसाठी असे घर म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव असतो. अशा घरात मुलांना स्वातंत्र्याचा अनुभव असतो.

घर हीच शाळा…

जिथे प्रेमाचे नाते असते तिथे चुका होण्याची भिती नाही.कोणत्याही प्रकारची दहशत,भिती,तणाव नसतो.त्यामुळे अशा वातावरणात मुलांचे शिकणे उत्तम होते. प्रेम असेल तर व्देष,मत्सर,राग,लोभ यांना आस्तित्व उरत नाही. या वातावरणात मुलांना शिकण्याची मोठी संधी असते. स्वातंत्र्यात मुलांचे आकलन समृध्द होत जाते.तेथेच प्रश्न पडत जातात.जिज्ञासा फुलत जाते.तेथे ज्ञानाची प्रक्रिया घडण्यास मदत होत असते.एका अर्थाने शिकण्यासाठी प्रेमाचे घर महत्वाचे आहे.त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य मिळावे असे वाटत असेल तर घर प्रेमाच्या ओलाव्याने बांधलेले असावे.घराला सिंमेटचा ओलावा असण्यापेक्षाही प्रेमाचा ओलावा असेल तर बालकांचा माणूस म्हणून तेथे प्रवास सुरू होतो.त्यातून बालकांची वाढ आणि विकासाला पोषक वातावरण मिळते.त्यामुळे सुंदर घराची कल्पना म्हणजे सुंदर माणंसाच्या आस्तित्वाची कल्पना आहे.घरातील माणसात प्रेम असेल तर त्या घरात माणूसपण देखील एका उंचीवर असते.प्रेमाच्या घरात माणंसाचे नेहमी स्वागत असते.त्या घरात माणसांसाठी कधीच दरवाजे बंद नसतात.केवळ खोटे हास्य मुखवटयावर आणून केले जाणारे स्वागत पाहून त्या मुखवटयाच्या आत नसलेली माया दिसतेच ना.. प्रेम म्हणजे सत्याचा प्रवास असतो.त्या घरात किती माणसं आली तर गर्दी होत नाही..आणि जागा अपूर्ण पडत नाही.जेथे हसत हसत माणसांचे स्वागत होते त्या घरातील सुंदरता आपोआप फुलते.

खरेतर सुंदर घराचे जे अनेक निकष गिजूभाई सांगू पाहाता आहेत त्यामध्ये ते म्हणतात , की घरातील मुले,परीसरातील मुले जर आजूबाजूला खेळत असतील तर त्या घराची स्थिती सुंदर मानायला हवी.मुलांचा विकासात घराचे स्थान महत्वाचे आहे.त्यामुळे घर म्हणजे केवळ मुलांसाठी संरक्षणाच्या भिंती नाही तर त्या घराने मुलांचा शारीरिक,मानसिक,भावनिक विकासाची जबाबदारी घ्यायची असते.त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी किती प्रेरणा दिली जाते..? किती प्रमाणात त्यांना त्यासाठी प्रेरित केले जाते ? हेही महत्वाचे आहे.कारण प्रेमाचे आस्तित्व असलेल्या घरात बालकांचे व्यापक हित पाहीले जाते.केवळ वरवरची माया तेथे नसते.मुलं हेच त्या घराचे आस्तित्व असते.त्यामुळे त्या घरात मुलांची काळजी घेतली जाते.काळजी घेणे म्हणजे मोठयांनी काही नियम करणे आणि लादणे नाही.मुलांची काळजी म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्वाला, त्यांच्या शहाणपणाची वाट मोकळी कऱणे आहे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

मोठी माणसं जितकी स्वतःची काळजी घेतात तितकी मुलांची काळजी घेतली जात असेल तर ते घर सुंदर म्हणायला हवे. मुलांची काळजी घेणे म्हणजे केवळ अन्न, वस्त्र, निवारा, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे नाही. त्यांना हव्या त्या वस्तू आणून देणे पण नाही. त्या पलिकडे मुलांची काळजी घेणे म्हणजे मुलांच्या मनाची गरज असते त्याची काळजी घेणे असते. मुलांच्या मनाला सर्वाधिक भूक केवळ प्रेमाची असते. त्यांच्यासाठी वेळ देणे असते. मुळात प्रेम फुलवायचे असेल तर एकमेकासाठी वस्तू नाही तर वेळ द्याला लागतो. मुलांसाठी वेळ दिला तर मुलांची काळजी घेतली गेली असे म्हटले जाते. आज आपण मुलांसाठी हवे ते आणून द्यायला तयार आहोत मात्र त्यांना वेळ द्यायला तयार नाही. मुलांच्या मनाची गरजांची पूर्ती म्हणजे सुंदर घराचे आस्तित्व आहे. त्यामुळे जेथे मोठयांसारखीच लहानाची काळजी घेतली जाते ते खरे सुंदर घर असते. इतक्या सा-या गोष्टी केल्यातरी घराचे घरपण येते का ? तर त्या पलिकडे देखील बरेच काही करायला हवे असते. घराचे घरपणासाठी लहान मुलांना सन्मान मिळायला हवा. घरात मुलांना गृहित धरले जाते. त्यांना स्वतःचे विचार मांडायचे स्वातंत्र्य नाही. त्यांच्या विचाराचे स्वागत नाही. त्यांचेवरती सतत काहींना काही लादले जाते.त्यांना सतत भितीखाली ठेवले जाते.त्या भितीने मुलांचा विकास कसा होणार ? त्यामुळे सुंदर घरात मुलांचा सन्मान केला जातो.त्यांचा मान राखला जातो.मुलाना गृहित न धरणे हे सुंदर घराचे लक्षण मानायला हवे.

पालकांच्या घरात राहाणे हा मुलांचा हक्क आहे.त्यांना घरात ठेवणे म्हणजे मुलांवरती उपकार करणे नाही. त्यांचा अधिकार मान्य करणे महत्वाचे आहे. ज्या घरात मुलं कोणाच्या कृपेने राहात नसतील तर असे घर हे सुंदर घर आहे. मुलांच्या वरती आपण उपकार करतो आहोत असे न मानता जर त्यांचा स्विकार केला गेला तर ते घर सुंदर मानायला हवे.सुंदर घराची कल्पना नेमकी काय आहे हे सांगताना गिजूभाई लिहितात..

जेथे पालक प्रेमाने राहातात ते एक सुंदर घर असेल

गुलाबी मुले आजूबाजूला खेळत असतील ते एक सुंदर घर असेल

स्वतःची काळजी घेतल्या प्रमाणे जेथे पालक मुलांची काळजी घेतील ते एक सुंदर घर असेल

मोठ्याकंडून मुलांना मान मिळेल ते एक सुंदर घर असेल

आणि जेथे मुले कोणाच्या कृपेने राहात नसतील ते एक सुंदर घर असेल.

हो, तेच असेल सुंदर घर!

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या