तुम्ही फक्त इतकेच करा..!

मुलांना कधीच महागडया वस्तूंची, महाल वजा शाळांची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त आई, बाबांच्या वेळेची. त्यांना भूक असते त्यांच्या प्रेमाची.. कुशीत घेऊन त्यांना गप्पा मारणारे आई बाबा हवेत. रात्री झोपताना गोष्ट सांगणारी, अंगाई गीत म्हणणारी... शाळेत काय झाले हे विचारून त्याला ऐकणारी, त्यांच्याशी मुक्त संवाद साधत बोलणारी, ऐकूण घेणारी आणि त्यांच्या बोटाला धरून मनपसंद प्रवास करणारी प्रेमाची माणंस हवी आहेत... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
तुम्ही फक्त इतकेच करा..!

मुलाला जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी उत्तम दर्जाची शाळा हवी का..? त्याला शिकवणी लावायला हवी का..? त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे साधन साहित्य हवे का..? त्याला खेळण्यासाठी महागडी साहित्य हवे का? त्याला खूप छान छान कपडे हवे की महागडे अलंकार हवेत..? काय दिले म्हणजे त्याला यशाचे शिखर पादाक्रांत करता येईल..? आपण पालक म्हणून त्याला उंच भरारी घेता यावी याकरीता सर्व काही करत जातो. पण नेमके जे करायचे असते ते करायचे राहून जाते.

मुलांना कधीच महागडया वस्तूंची, महाल वजा शाळांची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त आई, बाबांच्या वेळेची. त्यांना भूक असते त्यांच्या प्रेमाची.. कुशीत घेऊन त्यांना गप्पा मारणारे आई बाबा हवेत. रात्री झोपताना गोष्ट सांगणारी, अंगाई गीत म्हणणारी... शाळेत काय झाले हे विचारून त्याला ऐकणारी, त्यांच्याशी मुक्त संवाद साधत बोलणारी, ऐकूण घेणारी आणि त्यांच्या बोटाला धरून मनपसंद प्रवास करणारी प्रेमाची माणंस हवी आहेत. पण हे सर्व राहून जाते आणि पैशाने जे जे मिळते ते सर्व दिले जाते. पण ते सारे पुरक असते. पुरक असलेल्या गोष्टीने केवळ पोट भरते पण त्यांने बाळस येत नाही. बालकांच्या वाढ आणि विकासाकरीता पालकांच्या क्ल़ॉलिटी टाईम अधिक गरजेचा असतो. मुलांचे शिक्षणासाठी साधनांची गर्दी नको आहे तर त्यांच्यासाठी त्यांना आईबांबाचा वेळ हवा आहे. आई बाबांचा वेळ म्हणजे मुलांसाठी पैसे खर्च करणे नव्हे तर त्यांच्या सहवासात त्यांना जीवनाचा आनंद सापडणे, जीवनाच अर्थ उलगडणे, जीवनाचा आनंद मिळेल अशा वाटांचे दर्शन घडविणे. आपण बालकांच्या संपूर्ण आयुष्यात खरचं अस कधी करतो का? जर आपण त्यांना वेळ देऊ शकत नसू आणि वाटाचे दर्शन घडवत नसू तर त्यांच्या वाटा चुकल्या असे म्हणण्याचा अधिकार देखील गमावलेला असतो हे लक्षात घ्यायला हवे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

मुळात बालकाचा विकास आणि शिक्षण उत्तम होण्याकरीता भावनिक बुध्दिमत्तेचे विकसन महत्वाचे आहे. त्याकरीता जे जे म्हणून करता येईल ते सर्व करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पालकांनीच करण्याची गरज असते. आपण मुलांना भौतिक सुविधा पुरवू शकतो.. त्याला हवे ते साधन बाजारातून आणून देऊ शकतो.. पण त्यांने त्याला खरच आनंद मिळतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. मुळात आपण काळजीपोटी बालकाला जे देत जातो ती त्याची गरज नसते. त्याची गरज असते ती निखळ आईबाबांच्या नितळ प्रेमाची आणि वेळेची. अलिकडे आपण सर्वजन पैसा कमविण्याच्या विचारात इतके गुंतले आहोत त्यात आपलाही आनंद आपण गमावलेला आहे. मुलांच्या भविष्याची चिंता करीत सारखे धावाधाव करीत आहोत.. उद्या त्याच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे.. उत्तम दर्जाची शाळा हवी.. महागडी शिकवणी वर्ग हवेत.. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असे महागडे कपडे आणि उत्तम साधने हवी आहेत. मग त्यासाठी पैसा कमवायलाच हवा ना!

कमविण्याच्या नादात आपण इतके धावतो, की मुलांसाठी वेळ कोठे तो उरतच नाही. नोकरी करत असतांना मिळणारे वेतनाचा पैसा पुरत नाही म्हणून निर्धारित वेळेनंतरही अतिरिक्त वेळ देऊन काम करत पैसे मिळविण्याचा प्रयत्न असतो. मग शनिवार, रवीवार सुटटी असली तरी त्याही वेळेत काम करण्यात स्वतःला गुंतवून ठेवणे ठिक वाटते. एक नोकरीतील पैसे पुरत नाही म्हणून अतिरिक्त पैशासाठी दुसरी नोकरी करण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा कामाच्या धावपळीत पालक सकाळी घर सोडतात तेव्हा बालक झोपलेलेच असते आणि रात्री पालक उशिरा येतात तेव्हा बालक जेवण करून झोपी गेलेले असते. पालकांची भेट तरी कधी होणार? मग असेलच एखाद्या दिवशी सुटटी तर पालकांची भेट. ही सारी धावाधाव करण्यात आपण मुलांच्या जीवनातील आंनद गमावत असतो. मुलांच्या भविष्यासाठी आपण धावाधाव करीत असलो तरी त्यांच्या भावनिक, मानसिक विकासाकरीता ज्या गोष्टी आज आवश्यक आहेत त्याबाबत दक्षता न घेतल्यांने मुलांच्या जीवन प्रवासात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

तुम्ही फक्त इतकेच करा..!
आपण मुलांना गृहित का धरतो?

आपण मुलांना वेळ न दिल्याने मुलांच्या आयुष्यातील जडणघडणीची वेळ निघून जाते. मुळात कोणतेही नाते आपल्याला पुढे न्यायचे असेल तर त्याकरीता वेळ द्यावा लागतो. नात्याची वीन घटट करण्यासाठी एकमेकाला वेळ देत एकमेकाला जाणून घेणे घडत गेले तरच नाते पक्के होते. वेळ देणे म्हणजे समग्रतेने जाणून घेणे असते. विचारांची देवाणघेवाण, अभिरूची, गरजा आणि विकासासाठी आत्मविश्वासाची पेरणी त्यातून होत असते. आई, बाबांचा स्पर्श मुलांना शिकण्यासाठी विश्वास देत असतो. स्पर्श हाही आधार असतो. त्यामुळे मुलांना जीवन प्रवास समृध्द करण्यासाठी आई बाबांच्या वेळेची निंतात गरज असते. आई बाबांची सोबत म्हणजे मुलांच्या पंखाला बळ भरणे असते.

अनेकदा पालक आपल्या स्वतःच्या विकासासाठी, आनंदासाठी विविध क्लबच्या वाटा तुटवड असतात. तेथे स्वतःचा आंनद शोधत असतात. त्यावेळी आपण मुलांच्या आणि इतरांच्या आनंदाचा विचार करतो का ? हा खरा प्रश्न आहे. आपण धावपळीत धकला तर अशा आनंदाच्या वाटा शोधत राहातो. काही प्रमाणात स्वतःसाठी वेळ देत राहातो. आपल्याला हवे असलेल्या व्यक्तीचा सहवास आपला थकवा घालवतो. आपणच आपल्या थकवा, कंटाळा जावा म्हणून प्रयत्न करतो.. आपण आनंदाच्या वाटा शोधतांना स्वातंत्र्य असते.. पण ते स्वातंत्र्य मुलांना असत नाही. त्यामुळे मुलांसाठी आईबाबांबी वेळ देण्याची गरज आहे. बालकांच्या जगण्याचा सातत्याने विचार करणारे गिजूभाई पालकांच्या डोळ्यांत अंजन घालतात. ते म्हणतात क्लबपेक्षा आपण आपली वाट बदलली तर... बरेच काही साध्य होण्याची शक्यता आहे.. त्या वाटेने मुलांचा आनंद सामावलेले आहे त्याप्रमाणेच ती वाट मुलांचे भावविश्व समृध्द करणारी आणि शैक्षणिक प्रवासासाठी शक्ती देणारी आहे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!
...तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

म्हणून बधेका म्हणतात क्लबची वाट बदलत आपणच बागेची वाट मुलांचे बोट धरून चालण्याची गरज आहे. त्यामुळे मुलेही आपल्या सोबत बागेत येतील. त्यांनाही बागेत झाडे, वेली, फुले, पाने, पक्षी, कारंजे अनुभवता येतील. खेळणी खेळता येतील. निसर्गातील रंग, आकार, चव जाणता येईल, प्राणी, पक्षी यांच्या आवाजातील विविधता अनुभवता येईल. विविध वेली, झाडाची माहिती मिळेल. भवतालमध्ये असलेल्या पक्षांचे गुंजनाचा अनुभव घेता येईल. निसर्ग वाचता वाचता तेथे य़ेणारी माणंस, मुले देखील वाचता येतील. सामाजिक जीवनाचा अनुभव घेता येईल. बागेची भेट म्हणजे बरेच काही शिकणे असेल. मोठयांसाठी ते कदाचित कंटाळवाणे असेल पण लहानासाठी पालकांचा सहवास आणि निसर्गातील आनंद महत्वाचा आहे. आपण बागेत जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षाही त्यांना भवताल मधील प्राण्याचे दर्शन घडवायला हवे. प्राणी आणि पक्षी हे बालकांचे भावविश्व असते. त्यांना त्याची ओढ असते. त्यामुळे मोठयांनी दुसरे काही ऐकविण्याऐवजी मुलांना शक्य होईल ते प्राणी, पक्षी दाखवायला हवीत. त्याच बरोबर आपल्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा, किंवा आपली गरज म्हणून वर्तमान पत्रे वाचत असतो. त्यासाठी आपण वेळ देतो..

मात्र त्याच बरोबर किंबहूना त्यापेक्षा मोठयांनी मुलांचे ऐकायला शिकण्याची गरज आहे. अनेकदा मुलांना घरात अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही, त्याचबरोबर त्यांना ऐकून घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आपण मोठे आहोत म्हणून आपलेच ऐकले पाहिजे अशी मोठयांची धारणा असते. मात्र मुलं आपल्याशी काही बोलू इच्छिते, काही सांगू पाहाते.. त्यालाही भाव भावना आहेत. त्याला स्वतःचे काही मत आहे. त्याचे अनुभव, मत सांगू पाहाते आहे. तेव्हा आपण लक्ष देऊन त्याला ऐकायला हवे. मुलांना ऐकण्यासाठी आपले कान आसूसायला हवेत. दुर्दैवाने मुलांचे ऐकणारे कान आणि त्यांची भाषा जाणून घेणारी व्यवस्था घराघरातून हरवत चालली आहे. घरात त्यांना ऐकणारे कान नाहीत त्याप्रमाणे शाळेतही ते कान नाहीत. समाजातही त्यांना ऐकून घेणारे कानांची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने मोठयांना कान असले तरी ते केवळ अवयव आहे.. मात्र त्यांच्यासाठी त्या अवयवाचा कोणताही उपयोग नाही. त्यामुळे त्यांना ऐकून घेणे म्हणजे भाषिक दृष्टया अधिक समृध्द करणे असते. त्याच बरोबर मुलांसाठी सर्वात आवडते काय असेल तर गोष्ट.. गोष्टीसाठी त्यांचे नाते आजी आजोबांशी अधिक पक्के असते. त्यांना एकमेकाची भाषा जाणता येते.

तुम्ही फक्त इतकेच करा..!
सांगा काय करायचे..?

गोष्ट म्हणजे मुलांचे मनोरंजन आहे. मात्र त्यापलिकडे मुलांचे भावविश्व समृध्द करणे देखील त्या माध्यमातून घडत असते. गोष्टीतून भाषा समृध्द होते आणि बालकांची शब्दसंपत्ती देखील वृध्दींगत होत असते. त्याच बरोबर सृजनशीलतेसाठीच्या वाटा देखील निर्माण होतात. मुलांच्या कल्पना विश्व अधिक व्यापक करणेसाठी गोष्टीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे रोज एक गोष्ट आणि किमान एक गाणे, बडबडगीत बालकाला ऐकवायला हवे. त्यातून बालक आनंद घेईल. बालक कोणत्याही परीस्थितीतील असू द्या, त्याला या गोष्टींची मोहिनी असते. त्यामुळे आपण त्या गोष्टी नियमित ऐकविण्यासाठी तयारी दाखवायला हवी. मुलांना विकसित करण्यासाठी पैसा नाही तर पैशाच्या किमंतीचा वेळ द्यायला हवा. मुलांशी सतत बोलायला हवे.. गप्पा मारायला हव्यात.. त्याच्या सोबत लहान बनत चालायला हवे.. आपणच त्याचे बोट पकडत चालू लागलो तर आपल्यालाही आनंदाच्या वाटा सापडत जातील. आपण मुलांच्यामध्ये रस घ्यायला हवा.. त्याच्या गालावरून.. डोक्यावरून... आणि पाठीवरून हात फिरवत फक्त लढ म्हणायला हवे..

त्या करीता गिजूभाई लिहितात..

तुम्ही तुमच्या क्लबमध्ये जाण्यापेक्षा मुलाला बागेत घेऊन जा.

गप्पा मारत बसण्यापेक्षा मुलाला प्राणी दाखवा.

वर्तमानपत्रात घुसण्यापेक्षा मुलांचे बोलणे ऐका.

रात्री झोपायला जाताना मुलाला गोष्ट सांगून खूष करा,

मुलांमध्ये रस घ्या

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com