<p>माय डिअर कोरोना ....</p><p>Happy birthday !!!!</p><p>जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा वाढदिवस असतो ,</p><p>साजरा पण होतो , </p><p>शुभेच्छांचा वर्षाव होतो ...</p><p>मग तुझाच का नको ? </p><p>तसे तूझे काही परिचित बांधव </p><p>चीन मध्ये डिसेंबर १९ लाच जन्माला आले </p><p>अन् त्यांनी सर्व जगातच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली,... </p>.<p>हे माहिती असूनही आमच्याकडे कसला येतोय कोरोना ?</p><p>अश्या अविर्भावात आम्ही राहिलो अन्</p><p>तू मात्र मोठ्या थाटात विमानाने पोहचलास</p><p>थेट भारतात .....</p><p>तोपर्यंत क्वारंटाईन वगैर हे शब्द आमच्या डिक्शनरीतही नव्हते ,</p><p>परदेशातून प्रवासी एअरपोर्टवर ऊतरला की लगेच घरी , जाताजाता टॅक्सीचालक , कुली , हाॅटेल कर्मचारी यांनाही बाधीत करून फिरत राहिला ,</p><p>अन् २९ मार्च २०२० चा तो दिवस ....</p><p>रात्री ९ वाजता मला नासिकहून फोन आला</p><p>डाॅक्टर तुमच्या लासलगावात जिल्ह्यातील पहिला पेशंट सापडला ....</p><p>सिव्हिलला अॅडमिट आहे ...</p><p>रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलेत ...</p><p>काळजी घ्या ....</p><p>अन् सुरू झाली चर्चा ,,,,</p><p>तो कोणाकडे गेला होता ?</p><p>बेकरीवाला होता ....</p><p>खूप ठिकाणी फिरला</p><p>मग काय ...</p><p>प्रशासनाची जोरदार धावपळ ...</p><p>बॅरीकेटस ... रस्ताबंदी ....</p><p>परिसरातील लोकांनी गावात कुणी येऊ नये म्हणून रस्तेच खोदून टाकण्यास सुरवात केली ..</p><p>जिल्हाधिकार्यांची भेट ..</p> .<p>पोलिसांवर मोठी जबाबदारी ...</p><p>कुटुंबातील सर्वांनाच काॅरंटाईन करण्याचे आदेश ...</p><p>भारत बंद असूनही आपला दवाखाना सुरू ठेवणार्या फॅमिली डाॅक्टर व पॅथाॅलाॅजीस्ट यांच्या संपर्कात तो आल्याने त्यांच्याबद्दलही जोरदार चर्चा ....</p><p>तोपर्यत परिसरात ही बातमी पोहचली...</p><p>मग सुरू झाल्या अफवा..</p><p>यांना ऊचलले !!</p><p>( हा शब्द ऊच्चारणार्याला सलाम )</p><p>लगेच काळजीपूर्वक फोन ,</p><p>डाॅक्टर मी तुमच्याकडे कधी आलो होतो ?</p><p>तो तुमच्याकडे कधी आला होता का ?</p><p>मला त्रास होऊ शकतो का ?</p><p>या विवंचनेत मात्र तुम्ही कसे आहात ?</p><p>हे मात्र विचारण्याची साधी तसदीही घेत नसत ..</p><p>नंतर दुसर्या दिवशी आमच्या डाॅक्टर्संना मिळालेली वर्तणूक नक्कीच दुर्देंवी होती ,</p><p>क्लेशकारक होती .</p><p>शेवटी आमचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना अक्षरक्ष: प्रशासन व मंत्रीमहोदयांपर्यंत धाव घ्यावी लागली ..</p><p>त्यानंतरही जे डाॅक्टर रूग्णसेवा करत असतांना पाॅझिटिव्ह झाले त्यांच्याबाबत तर अतिशय वाईट प्रचार करण्यात आला ...</p><p>तरीही लासलगावातील एकही डाॅक्टर रूग्णसेवेपासून हटला नाही हे मात्र अभिमानास्पद !,,</p><p>पण</p><p>यापेक्षाही वाईट परिस्थिती झाली ती सामान्य नागरिकाची ,लाॅकडाऊन मुळे ...</p><p>गजबजलेले रस्ते शांत झाले ,</p><p>आशियातील सर्वात मोठे मार्केट पुकारण्याचे</p><p>थांबले ,</p><p>रेल्वे , बसेस , खाजगी गाड्यांची चाके थांबली ,</p><p>शाळा , काॅलेजेस ओस पडली .</p><p>व्यापार , दुकांनाना कुलूप लागले ....</p><p>अन् सुरू झाला दुखदायक प्रवास मजुरांचा ..</p><p>घराकडे परतण्याची धडपड , प्रवासाची</p><p>साधणे नाहीत .अक्षरश: पायी चालत मैलोमैल प्रवास करत कदाचित फाळणीनंतर प्रथमच ही वाईट वेळ भारतीयांवर आली ..</p><p>पोटाला काही नव्हतेच पण जीव वाचावा म्हणून असंख्य मजूर शहराकडून गावाकडे असा उलट प्रवास करू लागली ..</p><p>त्यातच काही मजूरांचा रेल्वे ट्रॅकवर झोपल्याने अपघाती मृत्यू चटका लावून गेला ...</p><p>अशातच काही गावांनी केलेली गावबंदी त्यांच अजून खच्चीकरण करून गेली ...</p><p>रोजंदारीवर जगणारा स्थानिक मजूर , नोकरदार कोलमडला.</p><p>आजपर्यंत स्वकष्टावर जगत कुणापुढेही हात न पसरणारा स्वाभिमानी , लढवय्या</p><p>पण कुटुंबाला काय खाऊ घालायचे या काळजीने पछाडला ...</p><p>पण इथही दिसली माणुसकी ...</p><p>अनेक संस्था , मित्रमंडळी , सामाजिक कार्यंकर्त्याच्या रूपाने देव अवतरला ..</p><p>तुझ्याच नावाने कोरोना मदत निधी ऊभारून अन्नछत्र सुरू झाली , मदतकेंद्र ऊघडली</p><p>अन् अनेक मानवीय स्वभावाचे ऊदात्त संस्कृतीचे दर्शन झाले ..</p><p>यावेळी मात्र महाराष्ट्राला लाभले एक संवेदनशील मुख्यमंत्री मा . ऊद्ववजी ठाकरे ,</p><p>दूरदर्शनवर थेट भेटत जणू काही आपल्या घरातीलच एखादी व्यक्ति आपली काळजी घेतेय , संवाद साधतेय ..</p><p>असा भास प्रत्येकाला झाला ...</p><p>एकतर शतकातील पहिलीच नवीन महामारी ,</p><p>जागतिक आरोग्य संघटनेचे रोज बदलणारे ठोकताळे ,</p><p>यामुळे थोडी गोंधळमय परिस्थिती निर्माण झाली ...</p><p>तरीही</p><p>डाॅक्टर , पॅरामेडिको व कर्मचारी घेतलेल्या अफाट मेहनतीने तुझ्यावर बरीच पकड घेता आली ...</p><p>बाबा कोरोना</p><p>तू मात्र छान वावरत होतास ,</p><p>एका शहराकडून दूसरीकडे,</p><p>सुरवातीला मेट्रो सिटित तू मनसोक्त रमलास , अगदी मुंबई पुण्यात सर्वच हाॅस्पिटल , जंबो कोविड सेंटर तू फूल्ल करत होतास मग</p><p>तूला वेध लागले ,</p><p>ग्रामिण भागातले ..खेड्याकडचे ...</p><p>तिकडे तू शिरकाव केलास . अलगदपणे ...</p><p>कोरोना थोतांड आहे ,</p><p>काही नाही हो !</p><p>झोल आहे !</p><p>अस म्हणणार्यांच्या घरातच किंवा आजूबाजूला मृत्युतांडव अनुभवले तेव्हा कुठे लोकांना जाग आली ,</p><p>तोपर्यंत तू बाळसे धरून सशक्त झाला होतास ..</p><p>मास्क ,स्वच्छ हात व फिजिकल डिस्टंस एवढी साधी त्रिसूत्री असतांना मात्र आपल्याच नादात राहिल्याने , न पाळल्याने अनेक जण बाधीत झालेत व रूग्णालयात भरती झालेत ..</p><p>अनेकांची आर्थिक गणिते तू कोलमडीस आणलीत ,</p><p>काही गोष्टी मात्र तू चांगल्या शिकवल्यास ..</p><p>कुटुंबात रहाणं , साध जगण , निसर्गाच्या जवळ घेऊन गेलास ,</p><p>पण कोरोना ,</p><p>माणसाला मात्र सामाजिक अंतर ठेवायला सांगितलं हे मात्र वाईट केलं</p><p>सहज एखाद्याची गळाभेट दूरच पण एकमेकाच्या सुखदुखातही जवळ जाणं , टाळायला लागण,</p><p>मदत करायला घाबरायला लावलंस ..</p><p>एव्हाना तू सात - आठ महिण्यांचा झालास , रांगायला लागलास ...थोडा शांतही झालास</p><p>आम्हालाही वाटल २०२१ आता मजेत जाणार ,</p><p>लोकांनी बंधन झिटकारली ..</p><p>मास्क बाजूला टाकले ,</p><p>व्यवहाराची लगबग सुरू झाली</p><p>लग्न सुरू झाले , पंगती झडू लागल्या</p><p>, बाजार खुलला ...</p><p>कालाय तस्मै नम: अस म्हणतं</p><p>अगदी महिन्यात तुझा विसरही पडला ...</p><p>अन्</p><p>मी पुन्हा येईन ...</p><p>अस सांगत परत आलास</p><p>अगदी नव्या जोम्याने आलास ,</p><p>मात्र पहिल्यापेणाही जोरात ,,</p><p>आज परिस्थिती पुन्हा चिघळतेय ,</p><p>सोशल मेडियामुळे अफवा पसरतात</p><p>लस घेऊ नका , साईड ईफेक्ट असतात ,</p><p>पेशंट सांगूनही टेस्ट करत नाहीत , अन् केलीच तर रिपोर्टस पाॅझिटिव्ह येऊनही घरी थांबत नाहीत ,</p><p>यामुळे तू अजून फोफावतोस .</p><p>हर्ड इम्युनिटीच्या नावाखाली अनेक जण बरे पण होतायेत पण काही वयोवृंद्ध यात बळी पडतायेत ,,</p><p>प्रशासन तरी काय करणार ??</p><p>तेही जिवाच्या आकांताने नियंत्रण करतायेत ,</p><p>डाॅक्टरांना मात्र थकून चालणार नाही ..</p><p>अवितरत काम करावच लागणार आहे ...</p><p>आज तुझा वाढदिवस आलाय ...</p><p>खर तर तुझ</p><p>श्राद्ध घालायच स्वप्न पहायच ?</p><p>कि अजून वर्षोनुवर्ष किती वाढदिवस साजरे करायचे ?</p><p>हे मात्र सामान्य नागरिकांच्याच हातात आहे ....</p><p>शेवटी एवढच म्हणावस वाटत ....</p><p>दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥</p><p>डाॅ विलास कांगणे</p><p>लासलगाव ( नाशिक )</p><p>9822514091</p>