Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगधवल यशापलीकडे...

धवल यशापलीकडे…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे. यंदा भारताने एकूण 61 पदके पटकावली असून त्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंवर कौतुक वर्षाव करताना क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंगा ध्वज जेव्हा फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतात. ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पदक जिंकण्याचा मुहूर्त वेटलिफ्टिर खेळाडूंनी लावला. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाने झालेली सुरुवात ही शेवटच्या दिवशी हॉकीतील रौप्यपदकावर येऊन थांबली. वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रातील सांगली शहराचा संकेत सरगरने देशाला पहिले पदक जिंकून दिले. त्याचवेळी मीराबाई चानूने पहिले सुवर्ण पटकावले. यानंतर देशातील सर्वच कुस्तीपटूंनी पदक जिंकून इतिहास घडवला. बॉक्सिंग आणि बॅडमिंटननेदेखील कमाल केली. अ‍ॅथलेटिक्स आणि लॉन बॉलमध्येदेखील खेळाडूंची चांगली कामगिरी राहिली. पॅरा अ‍ॅथलिटनेदेखील अनेक पदक जिंकून दिले. यंदा नेमबाजीचा सहभाग केला गेला नाही. अन्यथा पदकांची संख्या वाढली असती. मीराबाई चानू, महिला लॉन बॉल टीम, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहीया, विनेश फोगाट, नवीन कुमार, नीतू घनघस, अमित पंघाल, अ‍ॅल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरत श्रीजा, पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्त्विक-चिराग यांच्यासारख्या स्टार खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. प्रथमच सामील केलेल्या महिला क्रिकेट संघानेदेखील रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. महिला हॉकी संघानेदेखील 16 वर्षांनंतर पदक जिंकले. दुसरीकडे स्टार बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हिमा दास, दुती चंद, सीमा अंतील, मनप्रीत आणि मिनका बत्रासारख्या खेळाडूंनी निराशा केली.

भारतीय अ‍ॅथलिट हे 1934 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सामील झाले. या स्पर्धेत केवळ पुरुषांच्या 74 किलो वजन गटात फ्रीस्टाईल प्रकारात कुस्तीपटू रशिद अन्वरने पहिले कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 24 वर्षांनंतर 1958 मध्ये ‘फ्लांईंग सिख’ मिल्खा सिंग यांनी देशाला पहिले सुवर्ण जिंकून दिले. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कृष्णा पुनियाने 2010 मध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. अशी किमया करणारी कृष्णा पुनिया ही मिल्खा सिंगनंतर दुसरी आणि पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या प्रकारात 52 वर्षांच्या खंडानंतर देशाला सुवर्ण मिळाले. भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 564 पदके जिंकली आहेत. यात 203 सुवर्ण, 190 रौप्य आणि 171 कांस्यपदकांचा समावेश आहे. पंधरा पदके जिंकून जसपाल राणा हा राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वात यशस्वी अ‍ॅथलिट राहिला आहे. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सर्वात दर्जेदार कामगिरी राहिली. त्यात 101 पदकांत 39 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्यपदके जिंकून दुसरे स्थान पटकावले. 2014 मध्ये 64 पदकांंसह भारताने पाचवे आणि 2018 मध्ये 66 पदकांसह तिसरे स्थान मिळवले होते.

- Advertisement -

लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देश होत असताना क्रीडा क्षेत्रात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, चीन, जपान, रशिया आणि अमेरिकेसारख्या खेळाडूंसारखी कामगिरी का करत नसेल? भारतीय खेळाडू याहून अधिक चांगली छाप पाडू शकतात; परंतु राजकारण, लालफितीचा कारभार, क्रीडा संघटनांची मनमानी, योग्य प्रशिक्षणाचा अभाव, प्रशिक्षक आणि संघ यांच्यातील बेबनाव, व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव, खेळाडूंवर अनावश्यक दबाव, प्रत्येक ठिकाणी चांगले स्टेडियम नसणे यांसारखी असंख्य कारणे भारताला पदकांपासून दूर ठेवतात.

खेळाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे. माजी खेळाडू आणि चांगली रणनीती आखणार्‍या लोकांना प्रशिक्षक म्हणून नेमणे गरजेचे आहे. फिजिओथेरेपिस्टदेखील चांगले असावेत. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या करणे, सर्वसमावेशक क्रीडा धोरण आखणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक गावात आणि शाळेत क्रीडाविषयक धोरण राबवले पाहिजे. प्रशिक्षकाचा संघ आणि खेळाडू यांच्यात चांगला समन्वय असावा. खेळासाठी केंद्रच नाही तर राज्यांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे हरियानात क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, त्याप्रमाणे अन्य राज्यांनीदेखील त्याचे अनुकरण कररायला हवे. हरियानात शालेयस्तरापासून खेळाडू तयार करण्यावर भर दिला जात आहे. तेथे ब्लॉक पातळीवरच प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. गावागावांत स्टेडियम उभारले जात आहेत. चांगल्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जात आहे. केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरणदेखील क्रीडा प्रकारावर भर देणारे आहे. अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेले मणिपूर राज्याचे उदाहरण घेता येईल. स्टार बॉक्सर मेरी कोमपासून सुरू झालेला पदक जिंकण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. मेरी कोमननंतर देशाला पदक जिंकून देणारे मीराबाई चानू, एल. सरिता देवी, सुशीला चानू, देवेंद्र सिंह यांसारखे तब्बल 19 खेळाडू तयार झाले आहेत. मणिपूरमध्ये क्रीडा संस्कृती वाढली आहे.

देशात खेळांसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्यास खेळाचा विकास होईल. राज्य सरकारांनी क्रीडा, प्रशिक्षक, खेळाडूंवर लक्ष देणे गरजेचे आहे. देशातील मोठे उद्योगपती खेळाडू आणि स्टेडियमना दत्तक घेऊन त्यांचे कल्याण करू शकतात. केंद्र सरकारनेदेखील क्रीडा बजेट वाढवणे गरजेचे आहे. यानुसार खेळाडूंना चांगला आहार, चांगले प्रशिक्षक आणि चांगले वातावरण लाभेल. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आपल्या खेळाडूंचा दबदबा जगात वाढेल आणि आपले खेळाडू सर्वाधिक पदके खेचून आणतील. कॉमनवेल्थ गेम्स ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी तिसरी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कॉमनवेल्थचे आयोजन ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान होते. त्यामुळे ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये व्हिक्टोरिया येथे होत आहे. यात भारताची क्रमवारी अव्वल राहील, अशी अपेक्षा करूया.

नितीन कुलकर्णी,

क्रीडा अभ्यासक

- Advertisment -

ताज्या बातम्या