1969 पूर्वी व नंतर जन्मलेल्यांना जन्मनोंदीची शेवटची संधी

14 मे नंतर वंचित राहिलेल्यांना नोंद करता येणार नाही !

शासनाने जन्म नोंदीत नांव दाखल करण्याची अखेरची संधी पालिकामार्फत उपलब्ध करुन दिली असून सन 1969 पूर्वी अथवा नंतर जन्मलेल्या परंतु जन्म नोंदणीत नावाची नोंद नसलेल्या नागरिकांना आपल्या नावानिशी जन्म नोंदणी करता येणार आहे.

याबाबत राज्याचे जन्म मृत्यू उपमुख्य निबंधकांनी अध्यादेश जारी केला असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शहादा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.राहूल वाघ यांनी केले आहे. 14 मे 2020 नंतर वंचित राहिलेल्यांना जन्म नोंदीत नांव दाखल करता येणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्वीच्या काळात रुग्णालयात जन्य होऊनही नागरिकांनी जन्म दाखले घेतलेले नसतील अथवा मिळाले नसतील, यामुळे नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करुन जन्म दाखले मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ज्या नागरिकांची जन्माची नोंद ही 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे . तसेच ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षांचा कालावधी लोटला आहे . अशा सुर्व नागरिकांना जन्म नोंदणीत बालकाचे नाव दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही मुदत फक्त 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असून त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत बाळाचे नांव दाखल करण्याच्या कालावधी वाढवून मिळणार नाही, अशा सूचना शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसूचनेव्दारे जाहीर केले आहे.

नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, यापैकी कोणत्याही एका पुराव्यासह जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज सादर करावा, जन्म नोंदीत नाव समाविष्ट झाल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com