Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधवटपौर्णिमा

वटपौर्णिमा

सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली.

तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.

- Advertisement -

वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

वटसावित्री तीन दिवसांचे व्रत

तीन दिवसांचा व्रतारंभ पौर्णिमेच्या दोन दिवस आधी केला जातो. या व्रताचे तीनही दिवस संपूर्ण दिवस उपास करावा, असे शास्त्र सांगते. मात्र, ज्यांना संपूर्ण तीन दिवस उपास करायला जमणार नाही, त्यांनी दिवसभर उपास करून रात्री सोडावा. तीन दिवसांच्या व्रतामध्ये दररोज वडाच्या झाडाची षोडशोपचार पूजा करावी. मात्र, दररोज वडाचे पूजन करणे शक्य नसल्यास घरी नित्य-पूजा, जप, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. तिसर्‍या दिवशी सकाळी नित्यकर्म, स्नान, देवाची नित्य प्रार्थना, तुलसीपूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे.

वटसावित्री पूजन

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तुप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजा झाल्यानंतर,

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी।

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात।

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ॥

अशी सावित्रीची प्रार्थना करावी. यानंतर,

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ॥

असे म्हणून नामस्मरण करावे.

वटसावित्रीची कहाणी

पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहीत राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवर्‍याबरोबर सासू सासर्‍याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले.

यमराज आणि सावित्री

सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासर्‍यांचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या