
तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमचीं धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमची पती किंवा पत्नी याच्याप्रती नाही. तुमची सर्वात सखोल आसक्ती तुमचे विचार आणि तुमच्या भावनांशी आहे - नेहेमीच. नाही, मला माझी पत्नी प्रिय आहे, माझे मूल मला प्रिय आहे. जेव्हा तुमची पत्नी, तुमचे मूल किंवा तुमच्या भोवतालच्या परिस्थिती खरोखर तुमचे विचार, विचारसरणी आणि भावनां विरुद्ध जातात, तेव्हा हे सर्वकाही कोसळतं. फक्त तुमचे स्वतःचे विचार आणि भावनाच तग धरून राहतात.
खरं पाहता, आयुष्यात हेच तुम्ही जमवलेलं आहे - तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे भावना व्यक्त करण्याचे मार्ग, तुमच्या कल्पना, तुमच्या विचारसरणी, तुमच्या धारणा आणि मान्यता, आणि मग हे सारं तुमच्या भोवतालच्या इतर गोष्टींना चिकटून वाढत जाते. म्हणून हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमचे घर किंवा तुमचा बँक बॅलन्स नव्हे. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याच्या रिती, तुमची विचारसरणी - तुमचे व्यक्तिमत्व, हेच तुम्ही खरोखर गोळा करून ठेवले आहे आणि हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमची पत्नी, तुमची मुले किंवा यासारख्या गोष्टींचा त्याग करण्याची गरज नाही.
माझ्या जवळ एक कल्पना आहे याचा अर्थ, हा काही बोध किंवा वास्तविकता नव्हे, ही मात्र केवळ एक विशिष्ट प्रकारची कल्पना आहे. विचारधारा म्हणजे एक संघटीत कल्पना. ही कल्पनाच तुम्हाला वास्तविकतेपासून अलग करत आहे.
या क्षणी, जर तुम्ही येथे बसलात आणि जी गोष्ट याठिकाणी नाहीये तिची कल्पना करू लागलात, तर ती तुम्हाला तुमच्या भोवतालच्या याक्षणीच्या वास्तविकतेपासून अलग करते. आणि ही कल्पना जेव्हा मोठ्या प्रमाणावर संघटीत केली जाते, तेव्हा ती तुम्हाला पूर्णतः वास्तविकतेपासून विभक्त करते. तुमचा वास्तविकतेसोबत कोणताही संपर्क उरणार नाही, कारण ते संघटीत संयोजनच इतके आकर्षक असते. कल्पना फार आकर्षक आहे. जेव्हा ती मोठ्या प्रमाणात संघटीत केली जाते, तेव्हा ती खूपच आकर्षक बनते. एकदा का तुम्ही तुमची ओळख कल्पनेसोबत जोडली, की ती तुम्हाला वास्तविकतेपासून पूर्णतः विभक्त करते. तुम्हाला वास्तविकतेपासून जर दूर केले गेले, तर खरोखर तुम्ही एक अर्थपूर्ण जीवन जगू शकाल का? खर्या अर्थाने तुम्ही वास्तविक जीवन जगू शकाल का? तुम्ही जीवन अनुभवू शकाल का? जीवन जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते जसे आहे तसे जाणून घेणे. ज्या क्षणी तुमचे मन एखाद्या विचारधारेने विकृत होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या विचारसरणीच्या समजुतीतूनच पाहायला लागता.
एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.