बहिण-भावाच्या नात्याचे अतूट बंधन रक्षाबंधन!

रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. यादिवशी बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणार्‍या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे.

रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये कजरी-पौर्णिमा, पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर, सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे. त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे.

रक्षाबंधनचं धार्मिक महत्त्व

महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठीही हा सण खास असतो. वरूण राजाची आराधना करत त्याला या दिवशी पूजण्यात येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो.या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोक वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव त्याकाळी साजरे करत होते. तर शिक्षण घेण्यासाठी सुरूवात करण्यासाठी हा शुभमुहूर्त काढण्यात येत असे. अध्ययनासाठी आरंभ, शौर्याचे प्रतीक म्हणजे श्रावणी असा अर्थ होतो. हेदेखील या सणाचे धार्मिक महत्त्व आहे.

रक्षाबंधनाच्या पौराणिक कथा

रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरूवात नक्की कधीपासून आणि कशी झाली, याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही. पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा वृत्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची अर्थात इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधला. या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.

दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसर्‍या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला. आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले.

देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले.त्यांना चिंता वाटू लागली . त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला, त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळी राजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले? त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळी राजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले. त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण- भावाचे नाते जपणारा असा हा सण साजरा केला जातो.

राखीपौर्णिमेचा इतिहास

राखीचा खूपच जुना इतिहास आहे. आपण याची पौराणिक कथा तर जाणून घेतलीच आहे. तर इतिहासात याचे अनेक दाखले देण्यात येतात. महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन त्याने दौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.

इतिहासातील दुसरे उदाहरण सांगायचे झाले तर चित्तौढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशाह हुमायूनला राखी बांधली होती. राखी बांधल्यानंतर राजा हुमायूनने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली असे सांगण्यात येते.

रक्षाबंधनाचे शास्त्र

राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *