Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधपावित्र्य व मांगल्याचे प्रतीक : तुळस

पावित्र्य व मांगल्याचे प्रतीक : तुळस

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक. शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.

आयुर्वेदातही तुळशीला, तुळशीच्या पानांना आणि तुळशीच्या बियांना महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतात सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक वैविध्य जितके आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जैवविविधता आपल्याला आढळून येते. यासह फळांच्या, फुलांच्या, झाडांच्या विविध जाती, प्रकारही आपल्याला आढळतात. तसेच तुळशीचे काही प्रकार आढळून येतात. एक, दोन नव्हे तर तब्बल 10 प्रकार तुळशीचे सांगितले गेले आहेत. जाणून घेऊया…

- Advertisement -

रोगप्रतिकारक शक्ती- पुराणातील काही संदर्भांनुसार, ज्या घरांमध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी तुळसपूजन केले जाते, त्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते, अशी मान्यता आहे. त्या कुटुंबांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुळशी वृदांवनामुळे आजूबाजूचे वातावरण पवित्र राहते. नकारात्मकतेला थारा राहत नाही. तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात. आरोग्याला उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचे लक्षण मानले गेले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

तुळशीच्या मंजिरीचे महत्त्व

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते।

तद्गृहं नोपसर्पन्ति कदाचित् यमकिंकराः॥

हा श्लोक स्कंद पुराणातील आहे. याचा अर्थ असा की, ज्या घरात नियमित तुळशीचे पूजन केले जाते, त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. शास्त्रात तुळशीच्या मंजिरीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगण्यात आले आहे. तुळशीच्या मंजिरी वाहिल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात, असे सांगितले जाते. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहेत.

तुळशीची मंजिरी नियमितपणे विष्णूला अर्पण केल्यास त्या व्यक्तींना मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. तुळशीवरील मंजिरी भगवानचरणी अर्पण करावी, असे शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. तुळशीवरील मंजिरी काढली नाही, तर तुळशीची वाढ खुंटते. त्यामुळे ती काढून टाकणे आवश्यक असते, असे सांगितले जाते. तुळशीच्या बिया अत्यंत आरोग्यदायी असतात. तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून त्यानंतर दुधात मिसळून त्याचे सेवन करावे, असे सांगितले जाते.

हे आहेत तुळशीचे 10 प्रकार- तुळसीचे एखाद-दोन प्रकारच आपल्याला माहिती असतात. मात्र, तुळशीचे अनेक प्रकार असल्याचे आढळून येते. सर्वसाधारण तुळशीसह श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, श्वेत तुळस, भू तुळस, राम तुळस, नील तुळस, रक्त तुळस, वन तुळस आणि ज्ञान तुळस हे काही तुळशीचे मुख्य प्रकार आहे. तुळशीच्या या प्रत्येक प्रकारचे गुणधर्म अगदी वेगवेगळे आणि विशेष आहे. याशिवाय तुळशीच्या नावावरूनही वेगळेपण लक्षात येते. तुळशीच्या पानांचे नियमितपणे केलेले सेवन कान, कफ, ज्वर, खोकला आणि हृदयरोग यांसारख्या आजार, विकारांवर अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले जाते.

तुळशीचे पान किती दिवस ताजे राहते ?- एखाद्या रोपट्याचे, झाडाचे पान तोडल्यास ते काही तासांनंतर सुकून जाते. मात्र, तुळशीचे पान सात दिवसांपर्यंत सुकत नाही किंवा शिळवट होत नाही, असे सांगितले जाते. एखाद्या प्रसंगी तुळशीचे ताजे पान नसल्यास त्यावर गंगाजळ शिंपडून ते पुन्हा वापरता येऊ शकते, असेही सांगितले गेले आहे. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत, असे मानले जाते. त्याचप्रमाणे एकादशीला. एकादशी व्रताचा संकल्प केलेल्यांनी द्वादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, असे शास्त्र सांगते.

- Advertisment -

ताज्या बातम्या