Friday, May 10, 2024
Homeभविष्यवेधनिश्चयी, क्रोधी...मात्र प्रतिभावान !

निश्चयी, क्रोधी…मात्र प्रतिभावान !

ममता बॅनर्जी (ममता बंधोपाध्याय) यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी झाला. इतिहास विषयात पदवी घेतल्यानंतर कोलकाता विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त झाली. त्यांना कलिंग इंस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वरकडून मानद डॉक्टरेटही मिळाली. कोलकाता विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले आहे.

1970 च्या दशकातच ममता बॅनर्जी यांचा आपली राजकीय प्रवास काँग्रेस पक्षातून सुरू झाला. 1980 मधे त्या पश्चिम बंगालच्या महिला काँग्रेस सरचिटणीस होत्या. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ कम्युनिस्ट राजकारणी सोमनाथ चटर्जी यांना पराभूत करून भारतातील युवा होण्याचा मान पटकावला. त्या भारतीय युवा काँग्रेसच्या सरचिटणीसही झाल्या.

- Advertisement -

1998 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. नव्या पक्षाचे त्या अध्यक्ष झाल्या. कोलकाता दक्षिण मतदार संघात त्या स्थायिक झाल्यानंतर 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी कोलकाता दक्षिणची जागा कायम राखली

1991 मध्ये पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांनी ममता यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास, युवा कार्य व क्रीडा आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री म्हणून संधी दिली. 1997 मध्ये बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर 1999 मध्ये त्या भाजपाप्रणित नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) सरकारमध्ये सामील झाल्या. त्यांना रेल्वे मंत्रीपद मिळाले. 2001 च्या सुरुवातीला तहलकाच्या ऑपरेशन वेस्ट एन्डचा पर्दाफाश झाल्यानंतर सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांविरूद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा निषेध करण्यासाठी ममता यांनी एनडीएच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पश्चिम बंगालच्या 2001 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाशी युती केली.

जानेवारी 2004 मध्ये त्या एनडीएमध्येे परत आल्या. मे 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना कोळसा आणि खाण मंत्रीपद दिले गेले. त्या पश्चिम बंगालमधून लोकसभेची जागा जिंकणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या एकमेव सदस्या होत्या. नोव्हेंबर 2006 मध्ये बॅनर्जी यांनी प्रस्तावित टाटा मोटर्स कार प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढून सिंगूर येथील जमीन अधिक्रमण थांबवले.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) बरोबर युती केली. युतीने 26 जागा जिंकल्या. केंद्रीय मंत्रीमंडळात बॅनर्जी यांना रेल्वेमंत्री पद मिळाले. 2016 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक दोन तृतीयांश बहुमताने जिंकली. त्या पुन्हा बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून निवडल्या गेल्या.

त्यांच्या कार्यकाळात शारदा समूहाचा आर्थिक घोटाळा आणि गुलाब व्हॅलीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला.

आपल्या अनेक निर्णयांमुळे त्या वादग्रस्त ठरल्या. मात्र त्यांनी डाव्या पक्षानंतर पश्चिम बंगालवर एकछत्री अंमल केला, हे देखिल तेवढेच महत्त्वाचे. सडेतोड भुमिकांसाठी त्यांची भारतीय राजकारणातील ओळख आजही कायम आहे. गरिबांसाठी थेट रस्त्यावर उतरणार्‍या नेत्या म्हणून आजही त्या काम करताना दिसतात. सध्या बंगालमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आपल्या स्पर्धक राजकारणार्‍यांना नमोहरण करण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रीय राजकारणार विरोधाचा आवाज म्हणूनही आज त्या अग्रभागी आहेत.

रवी रेषेने प्रदान केली कीर्ती…मजबूत अंगठा गाजवतो अधिकार

कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी संचित, कर्म व त्याला प्रयत्नांची जोड लागते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असे कधी होत नाही. हस्त सामुद्रिक शास्त्रात प्रयत्न व नित्य कष्टाने भाग्य बदलता येते हे अधोलीखीत आहे. मात्र प्रत्येक प्रयत्न निष्ठा पूर्वक व काळजी पूर्वक केले, त्यात हुशारीने सावधानता बाळगली तर व्यक्तीच्या प्रयत्नांना यश लाभते. हे यश तुमचे संचित व भाग्य किती शुभ फलदायी आहे, त्यावर तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे प्रमाणात यश अवलंबून असते. एखाद्याला यश सहज मिळेल ते दुसर्‍याला कदाचित मिळणार नाही किंवा थोड्या प्रमाणात यशाची प्राप्ती होईल.

राजकारणात किंवा कुठल्याही व्यवसायात तुमच्याकडे असलेली निर्णय क्षमता व संधी साधूपणा कामाला येतो. लोक खुर्चीच्या सत्तेच्या दबावाखाली राहतात. तुमची आर्थिक व राजकीय ताकद किती? यावर तुमच्या मागे येणार्‍या लोकांची संख्या अवलंबून असते.

ममता दीदींनी हे केव्हाच ओळखले होते. त्यांच्या हातावरील बुध ग्रहाने व विशेषतः डाव्या हाताच्या वाकड्या करंगळीच्या वेळो वेळी आपल्या सोयीसाठी, लाभासाठी पक्षबदल, केंद्रातील सत्तेत सहभागी होण्यासाठी व मंत्रीपदाच्या लाभासाठी नियमित राजकीय तडजोड केली. डाव्या हातावरील मस्तक रेषा सरळ मंगळ ग्रहाकडे गेली आहे. त्यामुळेे असे लोक अतिशय हिशोबी असतात. दुसर्‍यांच्या भावनांची फार दखल घेत नाही.

दोन्ही हातावरील हृदय रेषेचा उगम गुरु व शनीच्या बोटाच्या मध्यभागापासून झाला आहे. त्यामुळे असे लोक अत्यंत व्यवहारी दुसर्‍याचा उपयोग पायरी प्रमाणे करणारे असतात. थोडक्यात हृदय रेषा गुरु व शनी बोटांच्या पेर्‍यात असता, असा स्वभाव व मानसिकता असते.

मी म्हणते तेच खरे करण्याची मानसिकता असते. असे लोक दुसर्‍याचे बिलकुल ऐकून घेत नाही. त्यांचे स्वयं निर्णय असतात.

आयुष्य रेषेच्या सोबत असलेली मंगळ रेषा लांब मनगटापर्यंत आहे. या मंगळ रेषेमुळे शारीरिक क्षमता खूप वाढलेली आहे. असे लोक न थकता एका दिवसात 18-18 तास काम करू शकतात. या मंगळ रेषेमुळे क्रोधाचे प्रमाण जास्त असते. अशा लोकांना आत्यंतिक क्रोध येत असतो.

उजव्या हातावरील रवी रेषा रवी ग्रहावर त्रिशुलात्मक झाली आहे. हि रवी रेषा मान सन्मान व दूरपर्यंत कीर्ती प्रदान करते. रवी रेषा त्रिशुलात्मक आकाराची असल्यानी ‘त्रिशूल’ चिन्हाचा कारकत्वाचा लाभ झाला आहे. यामधे बुध व रवीच्या संगमामुळे यांचे वक्तृत्व प्रतिभावान व भुरळ पाडणारे असते.त्यामुळे यांचे अनुयायी संमोहित राहतात. त्या जे बोलतात, वागतात ते सत्यच आहे अशी जनमानसाची भावना राहते.

हातावरील अंगठे मजबूत व लांब आहेत. त्यामुळे यांचे स्वतःचे स्वतंत्र तत्वज्ञान असते. ते दुसर्‍याच्या गळी उतरविण्यात हे तरबेज असतात. यांना सत्ता आवडते. अधिकार गाजवायला आवडतात. आपल्या अधिपत्या खाली सर्व गोष्टी राहाव्यात असा यांचा कायम प्रयत्न असतो.

दोनही हातावरील चन्द्र ग्रह शुक्र ग्रहापेक्षा मनगटाकडे अधिक सरकलेला आहे. त्यामुळे आत्यंतिक हुशारी प्रदान झाली आहे.

दोन्ही हातावर स्पष्ट आडव्या रेषा गेलेल्या नाहीत. त्यामुळे आयुष्यातील अडथळ्यांचे प्रमाण सौम्य आहे.

एकंदरीत दोनही हातावर भाग्यकारक गोष्टी असल्यामुळे भाग्याची साथ उत्तम राहिली आहे, प्रयत्नांना दिव्य यश लाभले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या