Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधरामायण आणि महाभारतातील १० साम्य

रामायण आणि महाभारतातील १० साम्य

रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ प्राचीन इतिहास, संस्कृती, परंपरांच्या मैलाचा दगड ठरलेल्या आहेत. वास्तविक पाहता रामायण आणि महाभारताला हजारो वर्षे उलटली आहेत. मात्र, तरीही या दोन्हींबाबतची अवीट गोडी अद्यापही कायम आहे. रामायण आणि महाभारताचा कालखंडही वेगवेगळा आहे. दोन युगांचे अंतर दोन्हींमध्ये आहे. तरीही दोन युगांमधील सर्वश्रेष्ठ घटना म्हणून आजही त्यांकडे पाहिले जाते. वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले असून, महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले आहे. रामायण कालखंडात श्रीविष्णूंचा सातवा रामावतार झाला आणि महाभारताच्या कालखंडात श्रीविष्णूंनी आठवा कृष्णावतार धारण केला. मर्यादेचा आदर्श म्हणजे श्रीराम, तर मुत्सद्देगिरीचा कळस म्हणजे श्रीकृष्ण. एकाने स्वतः शस्त्र हातात घेऊन पराक्रमाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. तर दुसर्‍याने स्वतः सर्व शक्तिमान असूनही शस्त्र हातात न धरता महाभारत घडवता आणि जिंकता येऊ शकते, याचा वस्तूपाठ घालून दिला, भगवद्गीतेचे अमृतज्ञान ब्रह्मांडाला दिले. रामायण आणि महाभारत यांच्यात अनेक गोष्टींत भिन्नता आहे. मात्र, या दोन्हींमध्ये अनेक बाबतीत साम्यही आढळते. या दोन्ही महत्तम ग्रंथांमध्ये नेमकी कोणती साम्य आहेत? जाणून घेऊया…

रामायण आणि महाभारताचे नायक

- Advertisement -

रामायणातील नायक प्रभू श्रीराम असे तर महाभारतातील नायक पाच पांडव होय. महाभारतात पांडवांना नायक म्हणावे लागेल. कारण संपूर्ण महाभारत त्यांचाच भोवती रचले गेल्याचे दिसते. श्रीकृष्ण त्यांचे सहकारी होते आणि त्यांची महत्ता तर वेगळीच होती. जी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडते. रामायण आणि महाभारतातील सर्व नायकांमध्ये एक साम्य असे आहे की, ते सर्व दिव्यपुरुष होते. श्रीरामांचा जन्म पुत्र कामेष्ठी यज्ञापासून झाला होता. तसेच महाभारतातील पांडव देवांचा प्रसाद मानले जातात. त्यांच्या जन्माविषयीचे गूढ आहेच. तसेच श्रीराम आणि श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार आहेत.

रामायण आणि महाभारतातील नायिका

वाल्मिकी रामायणातील नायिका सीता आहे. तर, महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील नायिका द्रौपदी आहे. या दोघींमधील सर्वांत मोठे साम्य असे की, या दोघींना लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे आणि दुसरे म्हणजे की, या दोघींनी आपल्या आईच्या पोटी जन्म घेतला नाही. देवी सीता भूमिकन्या आहे, तर द्रौपदी यज्ञातून प्रकट झालेली होती. जनक राजाला शेतात सीता सापडली होती. दोघीही अत्यंत स्वाभिमानी असल्याचे अनेक उदाहरणांमधून दिसून येते.

रामायण आणि महाभारतातील विवाह

रामायण आणि महाभारत या दोन्हींमधील विवाह स्वयंवर पद्धतीने झाले. रामायणात प्रभू श्रीरामांना सीतेशी विवाह करण्यासाठी धनुष्यावर प्रत्यंच्या चढवायची होती आणि असे करताना धनुष्य भंग पावले. तर महाभारतात अर्जुनाला द्रौपदीशी विवाह करण्यासाठी धनुष्यावर बाण लावून माशाचा डोळा भेदायचा होता. महाभारतामध्ये पांडव लाक्षागृहामधून सुटल्यावर जंगलात भटकंती करताना द्रौपदीचे स्वयंवर झाले, तर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या मदतीसाठी गेले असताना सीता स्वयंवर आयोजित करण्यात आले होते.

वनवास

रामायण काळात प्रभू श्रीराम यांना कैकेयी आणि मंथरामुळे 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता, तर महाभारतात काळात पांडवांना द्यूतक्रीडेत पराभूत झाल्यानंतर 13 वर्षांचा वनवास आणि एका वर्षाचा अज्ञातवास सोसावा लागला होता. एक फरक म्हणजे रावण वधानंतर 14 वर्षांचा कार्यकाळ संपवून श्रीराम अयोध्येत परतले. तर 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतर महाभारत युद्ध झाले. मात्र, रामायण आणि महाभारतातील नायकांना वनवास भोगावा लागला होता.

रामायण आणि महाभारत युद्धाचे कारण

रामायण आणि महाभारत या दोन्ही काळांमध्ये नायिकेमुळेच युद्ध झाल्याचे दिसून येते. रामायणामध्ये देवी सीतेला रावणाने हरण करून नेल्याने राम आणि रावणाचे युद्ध झाले. तसेच महाभारतामध्ये द्रौपदीच्या अपमानाच्या बदला घेण्यासाठी सर्व पांडव वचनबद्ध होते. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कौरवांशी युद्ध केले. रामायण आणि महाभारत युद्धाचे आणखी एक कारण आणि साम्य आहे. ते म्हणजे, रामायणातील युद्ध सीताहरणानंतर झाले आणि महाभारतातील युद्ध द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर झाले.

देवतांचे अवतार आणि मुले

रामायणात श्रीविष्णूंनी सातवा रामावतार घेतला. त्यासह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अनुक्रमे शेषनाग, सुदर्शन चक्र आणि शंख यांचे अवतार होते. रामायणात बरेच जण देवतांची मुले होती. मारुती पवनपुत्र, जाम्बवन्त अग्निपुत्र, वानरराज बाली देवराज इंद्रपुत्र होते. महाभारतात श्रीविष्णूंनी आठवा कृष्णावतार घेतला. तर, बलरामांना शेषनागाचा अवतार मानले जाते. दुसरे म्हणजे अर्जुन इंद्रपुत्र, भीम पवनपुत्र, युधिष्ठिर धर्मराज पुत्र होते. पवनपुत्र मारुती आणि पवनपुत्र भीम हे दोघेही गदा युद्धात कुशल होते.

संवाद

रामायण आणि महाभारतात दोन लोकांचे धर्माबद्दलचे गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. रामायणातील शिव आणि पार्वतीचे संवाद, ऋषी विश्वामित्र आणि राजा दशरथ यांच्यातील संवाद, भरत आणि कैकेयीचे संवाद, लक्ष्मण आणि परशुरामाचे संवाद, अंगद आणि बालीचे संवाद, जाम्बवंत आणि हनुमानाचे संवाद, मंदोदरी आणि रावणाचे संवाद, रावण आणि बिभीषणाचे संवाद, अंगद आणि रावणाचे संवाद, रावण आणि लक्ष्मणाचे संवाद. त्याचप्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद, धृतराष्ट्र आणि संजयचे संवाद, धृतराष्ट्र आणि विदुराचे संवाद, यक्ष आणि युधिष्ठिर संवाद, भीष्म आणि युधिष्ठिर संवाद सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत.

अन्य साम्ये

रावण वध झाल्यावर अयोध्येमध्ये श्रीरामांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा धर्माचे राज्य स्थापन झाले आणि रामराज्य आले. दुसरीकडे कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यावर धर्माचे राज्य स्थापन झाले आणि युधिष्ठिर राजा झाला. दोन्ही महाकाव्यांत एक साम्य असे ही होते की, सर्व भावंडांमध्ये आपसात प्रेमळ नाते होत आणि सर्व भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेचे पालन करीत असे. रामायणात आणि महाभारतात या दोघांमध्ये वनवास भोगताना सीता आणि द्रौपदीहरण झाले. रावणाने सीतेचे हरण केले होते. तसेच द्रौपदीचे जयद्रथाने हरण केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या