आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. या तीन दोषांमुळेच आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. यापैकी एका जरी दोषाचे प्रमाण वाढले तर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रास सुरू होतात. या तीन दोषांपासून आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आयुर्वेदात षट्कर्म नावाची क्रिया सांगण्यात आली आहे. या षट्कर्म क्रियेद्वारे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या त्रासापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. षट्कर्मामध्ये नेती, कपालभांती, धौती, नवली, बस्ती आणि त्राटक या क्रियांचा समावेश आहे. या क्रिया कशा करायच्या याचे तज्ज्ञ योगगुरूकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे.
धौती या क्रियेमध्ये तोंडाचा चोचीसारखा आकार बनवून आत हवा घेतली जाते. ज्याप्रमाणे पक्षी चोचीने पाणी पितो त्या प्रमाणे आपण या क्रियेद्वारे हवा प्यायची आहे. हवा शरीरात आल्यावर पोटाला चारीबाजूने हलवले जाते. असे केल्याने पोटातील आतडी मजबूत होतात. पोटाचे विकार या क्रियेमुळे दूर होतात.
नवली ही क्रिया पाहाटे रिकाम्या पोटी करावी लागते. आपले दोन्ही पाय थोडे लांबवून उभे राहावे. गुडघे थोडे वाकवून आपले हात मांडीवर ठेवावेत, असे केल्यानंतर श्वास पूर्णपणे बाहेर सोडावा आणि पोट आतल्या बाजूला ओढावे. या क्रियेत पोटातील स्नायूंना व्यायाम मिळतो. या क्रियेनंतर पोट डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे हलविले जाते. नवली क्रियेमुळे पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतात आणि आपली पचनशक्ती चांगली होते.
कपालभाती या क्रियेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेच्या तक्रारी दूर होतात. कपालभाती करण्यासाठी आपल्याला सिद्धासन अथवा पद्मासनात बसावे लागते. सिद्धासना/ पद्मासनात बसल्यानंतर श्वास आत घेऊन तो एका झटक्यात बाहेर सोडणे अपेक्षित असते. असे करताना आपले पोट पहिल्यांदा बाहेरच्या दिशेला जाते आणि नंतर आतल्या दिशेला ओढले जाते. कपालभाती ही क्रिया अनेक वेळा केली जाते. असे केल्याने शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि शरीरातील आतल्या भागाला प्राणवायूचा म्हणजेच ऑक्सिजनचा पुरवठा होता. कपालभाती नियमित केल्याने कफच्या तक्रारी दूर होतात.