मुंबईतील तब्बल 2269 शाळांमधील सुरक्षेसह स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी एका फाउंडेशनतर्फे ‘स्वच्छाग्रह’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची संस्कृती निर्माण करण्यासह मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी या उपक्रमात मार्गदर्शन केले जाते. तसेच वैयक्तिक स्वच्छता व शौचाबाबतच्या सवयी यासंबंधीदेखील सांगितले जाते. ‘स्वच्छाग्रह’ उपक्रम सर्वच शाळांमध्ये, तोही बिनखर्चिक राबवणं खूप गरजेचं आहे व त्यासाठी ‘वर्गस्वच्छता व विकास समिती’ उपक्रमाबाबत चार शब्द..
चंद्रकांत भंडारी,
मो. 9890476538
(शिक्षण समन्वयक, शालेय विभाग के.सी.ई. सोसायटी, जळगाव.)
शिक्षकांसह समस्त पालक बंधू-भगिनींनो, या लेखाद्वारे मी (शिक्षक या नात्याने) एक बिनखर्चिक पण स्वच्छतेबाबत उपक्रम आपल्यासमोर ठेवतोय. उपक्रमाचं नाव आहे. ‘वर्गस्वच्छता व विकास समिती’ या उपक्रमाची व योजनेची ठळक उद्दिष्टे आहेत.
1) वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःमधील विविध कौशल्यं व्यक्त करण्यात उत्तेजन, संधी व मार्गदर्शन देऊन प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं. याचबरोबर
2) विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, प्रेम, सौंदर्यदृष्टी, संघभावना, सहकार्य, नेतृत्त्व इत्यादी गुण रुजविण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न करणं. असो. वर्गावर्गातील व एकूणच शाळेसह संपूर्ण परिसरातील कचरा कसा साफ होईल आणि शाळेतील एकूण एक विद्यार्थ्यांना त्यासंबंधी कृतीतून कसं ज्ञान होईल यासाठी असलेला हा उपक्रम नेमका कसा असतो हे खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल.
आता या वर्गविकास समितीचं काम कसं चालतं ते पाहू या. तर, ज्या विद्यार्थ्यांचा हजेरी क्रमांक 1, 11, 21, 21, 31, 41, 51 किंवा 61 वगैरे असतो. ते सर्व विद्यार्थी समिती क्रमांक 1 चे सभासद असतात. ते 1, 11, 21, 31 या तारखांना वर्गाची स्वच्छता, सजावट वगैरे कामं (हाती झाडू, सुपले, बादली घेऊन) करतात. यावेळी सजावटीसाठी त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू, चित्रं, नकाशे, प्रतिकृती, लेख, कविता, कात्रणं, रंगीत भित्तीपत्रक वगैरे साहित्य ते वापरतात. तशी व्यवस्था प्रत्येक वर्गात भिंतीलगत कापडं वगैरे लावत केलेली असते.
याप्रमाणे पुढे समिती क्रमांक 2, 3, 4.. ती जबाबदारी क्रमाक्रमाने उचलतात. प्रत्येक समितीला व पर्यायाने प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्यातून किमान तीनवेळा असं काम करण्याची संधी मिळते. वर्गविकास समितीचे विद्यार्थी याचबरोबर शाळेचा परिसर स्वच्छ ठेवतात. असो.
शाळा हे जर विद्येचं मंदिर तर तिथे सर्वांना लहानपणापासून शारदेची आराधना करुन विविध जीवनावश्यक कौशल्य आत्मसात करता आली पाहिजेत
. म्हणूनच असे हे उपक्रम (त्यांना बायकी वगैरे न म्हणता) नेहमी शाळेत केले पाहिजेत. त्याचबरोबर संडास-बाथरुम वापरण्याचे साधे नियमही शिकवत ते दररोज कसे वापरायचे, हे सोदाहरण सांगितले पाहिजे. शाळेच्या कामकाजात पालक-शिक्षकांचा विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवत शाळा ही शिक्षणाह समाजाभिमुख केली पाहिजे.