Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकाकडी करेल उन्हाळ्यावर मात

काकडी करेल उन्हाळ्यावर मात

उन्हाळा सुरू झाला की शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेशनही होते. तसेच पोटाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळी लागण्यासारखे त्रासही जाणवतात. या सर्वांवर आपण एक सोपा नैसर्गिक उपाय करू शकतो तो म्हणजे काकडीचे सेवन करणे. काकडीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत जसे कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडियम, मॅग्नेशिअम आणि विविध जीवनसत्त्वही असतात. म्हणूनच काकडीचे सेवन आरोग्यासाठी नक्कीच वरदान ठरते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला नैसर्गिकपणे पाणी मिळते. त्यासाठी काकडी रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करता येतो.

पाण्याची कमतरता दूर-
उन्हाळ्यात घाम येतो, तहान लागते. शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते. अर्थात फक्त पाणी पिऊन शरीराची पाण्याची आणि आवश्यक पोषक घटकांची गरज पूर्ण करता येत नाही. त्यासाठीच आहारात काकडीचा समावेश करावा. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. काकडीचे सेवन केल्याने शरीराला ओलावा किंवा पाणी मिळते. उत्तम पचन- उन्हाळ्यात वातावरणातील उष्म्यामुळे लोकांना जुलाब, बद्धकोष्ठता, पित्त होणे किंवा छातीत जळजळ होणे आदी त्रास होतात. काकडीचे सेवन केल्याने पचन संबंधी समस्या भेडसावत नाहीत. म्हणूनच सलाडमध्ये काकडीचा आवर्जून समावेश करावा. तसेच कोशिंबीर करूनही काकडीचे सेवन करू शकता.

- Advertisement -

वजन कमी होण्यास प्रभावी-
वाढत्या वजनाची समस्या असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काकडीचे सेवन जरूर करावे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतेच परंतू तंतूमय घटकही पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहाते. त्यामुळे आहाराचे अतिसेवन टाळणे शक्य होते. काकडीमध्ये कॅलरीही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

मेंदू राहातो शांत –
उन्हाळ्यात व्यक्तीला तणाव जाणवत असेल किंवा शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असेल तरीही व्यक्तीला तणाव जाणवतो. काकडीचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची पातळी कायम राहाते आणि त्यामुळे मेंदूही शांत राहातो. काकडीच्या सेवनाने व्यक्ती व्यक्तीचे डोके शांत राहिल्याने एकूणच मेंदू शांत राहातो. थोडक्यात उन्हाळ्याशी मुकाबला करण्यासाठी नैसर्गिक थंडावा आणि पोषण देणाऱ्या काकडीचा वापर करून शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या