धुळ्याकडून नंदुरबारकडे विदेशी दारू घेवून जाणार्या ट्रकला समोरून येणार्या वाहनाने हुलकावणी दिल्याने भरधाव ट्रक चिमठाणेनजीक पुलावर उलटला. आज दुपारी झालेल्या या अपघातानंतर ट्रकमधील विदेशी दारूचे बॉक्ससह इतर साहित्य रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह रस्त्यावरून जाणार्या वाहनधारकांनी दारूचे बॉक्स, बाटल्यांसह काचेचे ग्लास, वाट्या असा लाखोंचा माल चोरून नेल्या. दारूच्या बाटल्या घेण्यासाठी अनेकांची गर्दी केली. होती. दरम्यान अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे दोन ते तीन कि.मी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
धुळ्याकडून एमएच 04 सीजी 6033 या क्रमांकाचा ट्रक विदेशी दारूचा माल घेवून नंदुरबारच्या दिशेन जात होता. त्यादरम्यान आज दि. 20 रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास चिमठाणेनजीक पुलावर ट्रकला समोरून येणार्या वाहनाने हुलकवणी दिली. त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक पुलावर उलटला. त्यामुळे ट्रकमधील विदेशी दारूचे बॉक्स रस्त्यावर आणि नाल्यात विखुरले गेले.
त्यानंतर परिसरातील नागरिकांसह रस्त्याने जाणार्या अनेक वाहन धारकांनी गर्दी करत दारूचे बॉक्स चोरून नेले. ट्रकमध्ये सुमारे 50 ते 60 लाख रुपयांची ऑफिसर चॉईस दारूचे बॉक्स व काचेचे ग्लास, वाट्या असा माल होता. दरम्यान अनेक बॉक्समधील बाटल्या फुटून लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच वाहनाचे देखील मोठेे नुकसान झाले आहे. रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचे काच व बॉक्स पडलेले होते.
अपघातात ट्रक चालक गंभीर झाला असून त्याला चिमठाणे गावातील नागरिकांनी मदतीचा हात देत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान ट्रकच्या सहचालकाने काहींच्या मदतीने उर्वरीत बॉक्स एकाबाजुला सुरक्षीत ठेवले होते.
वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा
ट्रक भर रस्त्यावरच उलटला होता. त्यात दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. त्यामुळे चिमठाणे- दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. चिमठाणे गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनाधारकांना त्रास सहन करावा लागला. चिमठाणे पोलीस ठाण्याचे ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. के्रनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
नेहमीच अपघात- चिमठाणे गावाजवळ नेहमीच अपघात होत असतात. पुलाची रुंदी कमी असल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येते. या रस्त्याची अवस्था देखील खराब झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.