Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंचे औरंगाबादमधील भाषण म्हणजे मागील भाषणाचे 'रिपीटेशन'

राज ठाकरेंचे औरंगाबादमधील भाषण म्हणजे मागील भाषणाचे ‘रिपीटेशन’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज ठाकरेंचे औरंगाबादमधील भाषण म्हणजे मागील भाषणाचेच त्यांनी इथे रिपीटेशन केलेले दिसून आले. काहीही वेगळे ते इथे बोलले नाहीत. अल्टीमेटम दिला आहे खरा पण ही हुकुमशाही नाही. कायद्याचे राज्य आहे, घटनेने घालून दिलेले नियम पाळावेच लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले…

- Advertisement -

अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पुरस्कार सोहळ्यास त्यांनी हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मागच्या सभेत जे भाषण राज ठाकरे यांनी केले तेच रिपीट झाले आहे. पवार साहेबांनी यावर सकाळीच प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांनी कधीच जातीचे पतीचे राजकारण केले नाही. त्याबाबत रामदास आठवले, राजू शेट्टी हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी ते वेळोवेळी बोलले आहेत.

कारण नसताना पवार साहेबांचे नाव घ्यायचे आणि प्रसिद्धी मिळवून घ्यायची सध्या असे झाले आहे. ते महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते म्हणून काहीजण विनाकारण नको ते बोलतात.

राज्यात कायद्याचे राज्य आहे. इथे अल्टीमेटमला थारा नाही कायद्यापुढे सर्व समान आहेत. हुकुमशाही चालणार नाही कायद्याचे पालन करावेच लागणार आहे. हे पालन राज्यातील सर्व नेत्यांना नागरिकांना करावे लागेल.

भोंगे उत्तरप्रदेशात बंद झाल्याचे आपण ऐकले आहे. तिथले केवळ मशिदीवरचेच नाही तर अयोध्यासह अनेक मंदिरातील भोंगेदेखील उतरवले आहेत. कायद्याचे पालन करायचे असेल तर सर्वच भोंगे उतरावे लागतील असे यापूर्वी गृहमंत्र्यांनी मांडले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. या नियमांचे पालन झाले की नाही ते तिथल्या पोलीस आयुक्तांनी तपासावे. पालन केले असेल तर चांगलेच आहे नसेल तर त्यांनी कारवाई करावी.

राज यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप विरोधी भाषणे होते. नंतरच्या काळात भाजप प्रेम वाढले त्यातून ते आता राष्ट्रवादी, कॉंग्रेस महाविकास आघाडी, शिवसेनेवर टीका करत आहेत. कार्यकर्त्यांनी नियम मोडले तर कार्यकर्त्यांवर केसेस होतील.

लोकांना चिथावणीखोर भाषणे देऊन भडकावणे सोपे असते मात्र जातीय सलोखा टिकला नाही तर हे महाराष्ट्राला परवडणारे नाही असे मत याप्रसंगी पवार यांनी मांडले.

राज्यासह देशात भारनियमन, कोळशाचा तुटवडा, महागाई, रोजगार असे अनेक प्रश्न असताना भलतेच अल्टिमेटम देणे चुकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार याप्रसंगी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या