Saturday, April 27, 2024
Homeनगरअकोलेतील वादाचे जिल्हा परिषदेला धक्के !

अकोलेतील वादाचे जिल्हा परिषदेला धक्के !

नगर (प्रतिनिधी)– अकोले तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये तीन ग्रामसेवक व बीडीओ यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे़ या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी जिल्हा पदाधिकारी आणि प्रशासन त्यांची पाठराखण करीत आहेत़ या ग्रामसेवक, बीडिओंवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी दिला. दरम्यान, अकोले तालुक्यातील राजकारण आणि अन्य बाबी या वादाच्या केंद्रबिंदू असल्याचे दराडे यांनी मान्य केले असून त्याचे धक्के आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापर्यंत पोहचले आहेत.

शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दराडे यांनी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता़ मात्र, त्यांना सभेत अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील आणि प्रशासनाने पूर्ण म्हणणे मांडू दिले नाही, असा दराडे यांचा आक्षेप आहे. तसेच अधिकार्‍यांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नव्हती़ याबाबत त्यांनी शनिवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

दराडे म्हणाल्या, जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़

बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब रणशिंगे यांनी आंबेवंगण ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर 18 लाख 48 हजार तर शेणित ग्रामपंचायतीच्या खात्यातून 75 लाख 69 हजार रुपये परस्पर काढल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ रणशिंगे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व अपहाराची रक्कम पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावी म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत़

शासनाने रणशिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ मात्र, त्यांच्या अद्याप वसुली केलेली नाही़ त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी असल्याचे दराडे म्हणाल्या़
ग्रामसेवक रवींद्र ताजणे यांनी कोतूळ, पळसुंदे, आंबितखिंड या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन शासकीय रकमेची वसुली करावी, अशी मागणी दराडे यांनी केली़

राजूर ग्रामपंचायतीतही 99 लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे़ मात्र, तेथील ग्रामसेवकावरही अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही़ या सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी आणि बिडीओंवर कारवाई करावी, अशी मागणी दराडे यांनी केली आहे. राजूर ग्रामपंचायतींच्या अनियमिता प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या