Wednesday, April 24, 2024
Homeनगरअभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी...

अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यंदाचे मानकरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (2019) सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी केली.

फौंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात मूळ नगरचे असणार्‍या अमरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्कारांचे वितरण केले जाते. अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून अनासपुरे यांना रु. 51000, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी पासून फौंडेशनने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणार्‍या दोन कर्तबगार अधिकार्‍यांचा देखील गौरव करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गायकवाड आणि सोळंकी या दोन सनदी अधिकार्‍यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आजवर या पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अनासपुरे यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कुणाचाही वरदहस्त नसताना त्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

नाम फौंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांचे आधारवड म्हणून उभे राहिले. अनासपुरेंची ही सामाजिक संवेदनशीलता दखलपात्र आहे. त्यामुळेच त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. अनासपुरे यांच्यासोबतच राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये रोल मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेले विशाल सोळंकी यांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्य काही दिवसात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून पुरस्कारर्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या