मालेगाव | प्रतिनिधी
शहरात करोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असे असतानाही मालेगावातील रस्त्यावरील अनावश्यक गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तात्पुरत्या स्वरुपात मालेगावी नियुक्ती करण्यात आली आहे.
कायदा-सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. कडासने यांनी यापूर्वी मालेगावी कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा शहरात जनसंपर्क दांडगा असल्याचे लक्षात घेत ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
मालेगावात मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाल्यानंनंतरदेखील मालेगावातील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पोलीस यंत्रणा २४ तास कर्तव्य बजावत आहे. तरीदेखील नागरिक ऐकण्याच्या पलीकडे गेले आहेत.
दरम्यान, आज सक्षम अधिकारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुनील कडासने यांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. एकीकडे रस्त्यावरील गर्दी आटोक्यात आल्याचे कुठेही चिन्ह दिसत नसताना संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर धावून जाण्याचे काही ठिकाणी प्रकार घडले आहेत.
दुसरीकडे 70 अधिकारी व पोलीस बाधित झाले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या सोबत आणखी एक सक्षम अधिकारी याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था विभागाने दिल्याने मालेगावी शांतता अबाधित राखण्याला मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.