Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रबोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलणार? शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...

बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलणार? शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी महत्तवाचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

१५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयासंदर्भात वेट ॲंड वॉचची भूमिका असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतोय. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत.

बच्चू कडू काय म्हणाले होते?

मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत केल्या आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.

मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात.तसेच, राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना कडू यांनी या बैठकीत केल्या.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. तर प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर लेखी परीक्षा ही ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या