जळगाव - Jalgaon :
जिल्ह्यात तीन दिवसापूर्वी अचानक झालेल्या वादळी वार्यासह गारपीटीमुळे सहा तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री पून्हा विजांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आता पून्हा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.जिल्ह्यात शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेला आहे.
तीन दिवसापूर्वी जिल्हाभरात वादळी वार्यासह गारपीट झाली.या गारपीटीमुळे ज्वारी, मका, गहु ही पिके अक्षरश: झोपली. तसेच बाजरी, हरभरा, कांदा, तीळ, मुग, फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आधीच शेतकर्यांच्या मालाला भाव नाही. अशा परिस्थीतीत निसर्गानेही शेतकर्याच्या पोटावर मारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे.
मंगळवारी रात्री पून्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, विजांचा मोठया प्रमाणात गडगडाट होत होता. त्यामुळे जळगाव शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. दिवसागणिक रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला साथीच्या आजारात वाढ होण्याची शक्यता आहे.