दिल्ली | Delhi
आज शिक्षक दिनानिमित्त देशातील ४७ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअली पार पडला.
देशातील ४७ शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. यामध्ये १८ महिला शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनत, समर्पण आणि निष्ठा यांचे कौतुक करत पुरस्कार विजेत्या शिक्षकांना राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोलताना म्हणाले,”करोनाच्या संकटामुळे देशातील बहुतांश शाळा-कॉलेजेस बंद आहेत. अशावेळी शिक्षणाचे कार्य चालू ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांसाठी देखील सोपे नव्हते. परंतु, त्यांनी कमी वेळेत डिजिटल माध्यमाची ओळख घेतली आणि आता विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत. शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणास प्रोत्साहित करण्यासाठी पालकांशी संवाद साधण्याचीही गरज आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेत देखील मुले आनंदाने आणि स्वारस्याने शिकण्यास प्रेरित होतील. नव्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकांना तयार करण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे. यासाठी नव्या शिक्षकांची निवड करताना त्यांच्यातील हुशारी बरोबर आशावादी गुणधर्माचाही विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. उत्तम इमारत, महागडी उपकरणे किंवा सुविधांमुळे चांगली शाळा बनत नाही तर शिक्षकांची निष्ठा आणि समर्पण उत्तम शाळा घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. शिक्षक खरे राष्ट्रनिर्माता आहेत.” असे त्यांनी म्हंटले आहे.