नाशिक । Nashik
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेला भेटीसाठी वेळ देत वर्षांनुवर्ष विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसिलदार व नायब तहसिलदार यांनी सोमवारपासून (दि.८) पुकारण्यात येणारा बेमुदत संप येत्या २३ मार्चपर्यंत मागे घेतला आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. सोमवारी सर्व तहसिल कार्यालयात कामकाज सुरळितपणे सुरु होते.
वाळू आणि खाण माफियांकडून सर्रासपणे अवैध गौण खनिजाचे उत्खनन होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचे शासन आदेश अाहे, पण कारवाई करणार्या अधिकार्यांवर जीवघेणे हल्ले होत असताना वाळू माफीयांवर मात्र कुठलीही कारवाई केली जात नाही. शासनाच्या या भूमीकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने ८ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता.
यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार यांच्यावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाला होता.या घटनेतील आरोपींवर मात्र कारवाईसाठी विलंब झाला. वाळू माफीया यांच्याकडून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वारंवार जिवघेणे हल्ले होतात. संबधितांविरूध्द कारवाई न झाल्याने त्याची मुजोरी वाढली आहे.
यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत. याकरीता अधिकार्यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली होती. पण त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. नायब तहसिलदारांचा ग्रेड पे ४ हजार ६०० रूपये करण्यात यावा.
तहसिलदारांची अद्याप प्रसिध्द न झालेली सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी. अनेक अधिकार्यांकडे शासकीय वाहने उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांना तात्काळ वाहन उपलब्ध करून देण्यात यावे. अशा विविध मागण्या संघटनेने महसूल मंत्र्यांकडे केल्या आहेत. मात्र मागण्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात असल्याने संघटनेने संपाचा इशारा दिला होता.
तहसीलदार संपावर गेल्यास वसूलीच्या कामकाजावर तीव्र परिणाम होण्याची शक्यता होती.मात्र महसूल मंत्र्या्नी संघटनेच्या पदाधिकार्यांना भेटिस वेळ देत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने संप मागे घेतला.