जम्मू-काश्मीर मधील ‘उरी’ येथे लष्कराच्या छावणीवर प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून, 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताकडून अतिरेकी गटांवर हल्ले करण्यात आले. भारत सरकारच्या या पावलामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला होता. यातून भारत सरकार आणि भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पाकिस्तानलादाखवून दिले होते की, हा आजचा भारत आहे, ज्याला उत्तर कसे द्यावे हे माहित आहेच, त्याचबरोबर बदला कसा घ्यावा हेदेखील माहित आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये उरीच्या सैन्याच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतापला होता. देशात दहशतवादी घुसून आमच्या सैनिकांवर हल्ला कसा करू शकतात, अशी चर्चा माध्यमांतून सुरू होती. विरोधी पक्षदेखील सरकारला घेराव घालण्यात गुंतले होते, परंतु दुसरीकडे सैन्य विशेष कारवाईची तयारी करत होते. भारताने निर्धार केला होता की, आता माघार नाही. 2016 सप्टेंबरचे शेवटचे दिवस चालू होते आणि त्याच वेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना असे काही प्रत्युत्तर दिले की संपूर्ण पाकिस्तान बघतच राहिला.
27-28 सप्टेंबर 2016 च्या मध्यरात्री, भारतीय सैन्याच्या विशेष दलाच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला आणि अनेक दहशतवादी लाँचिंग पॅड्स एक-एक करून नष्ट केले. या हल्ल्यात भारतीय सैन्याने पाक दहशतवाद्यांचे सहा लाँचपॅड नष्ट केले आणि या कारवाईत सुमारे 50 दहशतवादी ठार झाले. या हल्ल्याच्या दोन वर्षानंतर भारत सरकारने 2018 मध्ये सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्यास सुरवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सर्जिकल स्ट्राईकची पूर्ण जबाबदारी घेतली होती. सर्जिकल स्ट्राईकची संपूर्ण रूपरेषा भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तयार करण्यात आली होती. ती अंमलात आणण्याची जबाबदारी वेगवेगळ्या सक्षम संघांना सोपविण्यात आली होती.
भारतीय सैन्य व हवाई दलाने संयुक्तपणे या हल्ल्यात भाग घेतला होता, तर कोणत्याही विशेष आपत्कालीन परिस्थितीसाठी नौदलालाही सतर्क ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी भारतीय लष्कराने ठरवलेल्या रणनीतीनुसार हल्ला केला आणि सकाळी सर्व सैन्य आपापल्या ठिकाणी परत आले. भारताचा हा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे, त्यावर्षी 18 सप्टेंबर रोजी उरी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सैन्याच्या तळावरील छावणीवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याला उत्तर होते.