नाशिक | प्रतिनिधी | Nashik
करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह वेगळाच दिसून आला. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर काल लाडक्या बाप्पाचा साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला…
संपूर्ण शहर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात दुमदुमले होते. गुरुवारी (दि. ०८) नाशिक शहरात विक्रमी पाऊस झाल्यामुळे काल गोदावरी नदीकाठावर पूरपरिस्थिती होती. या पुराच्या पाण्यात अनेकांनी गणपती मूर्तींचे विसर्जन केले.
आज पूर ओसरला आणि नदीपात्रात विसर्जन केलेल्या मूर्ती आता गोदाकाठावर आल्या असल्याचे चित्र आहे. मनपाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र काहींनी गणेश मूर्ती नदीपात्रातच मूर्ती विसर्जित केल्याने गोदाघाटावर अनेक मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहेत.
आज सकाळी पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील यांनी गोदावरील मूर्ती संकलित केल्या आहेत. आज सायंकाळीदेखील चंद्रकिशोर पाटील मूर्ती संकलन करण्यासाठी गोदाघाट परिसरात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या (NMC) वतीने मूर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला. रात्री 9 वाजेपर्यंत एक लाख ७७ हजारांहून अधिक मूर्ती संकलित झाल्या आहेत.