Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांना मुख्याधिकार्‍याचे कवच, अन् संचालकांकडून घोटाळ्यांना खतपाणी

कर्मचार्‍यांना मुख्याधिकार्‍याचे कवच, अन् संचालकांकडून घोटाळ्यांना खतपाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत गेल्या पाच महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक हजर नसल्याने खातेदारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्जत शाखेतील खातेदारांनी एकत्र येत सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार अर्ज केला आहे.

- Advertisement -

मुख्यकार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ बँकेत केवळ स्वहित डोळ्यासमोर ठेवून बँकेत कारभार करत असल्याने या संचालकांना पदावरून हटवून प्रशासक नेमण्याची मागणी सभासद तथा निवृत्त कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, विनायक गोस्वामी, विक्रमसिंह कळमकर, संपत शिरसाठ यांनी केली आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत संजय गांधी निराधार योजनेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांनी अपहार केला आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची बदली जामखेड येथे करण्यात आली आहे.

कर्जत शाखेत पारनेर येथून रमेश मासाळ यांना शाखा व्यवस्थापक नेमण्यात आले. मासाळ यांनी शाखा व्यवस्थापक पद स्वीकारले. मात्र, फक्त एकच दिवस हजेरी लावली. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि काही संचालकांच्या संगनमताने मासाळ यांना कर्जतला फक्त कागदोपत्री दाखवले जात असून पगार कर्जतला काढला जात आहे. उपस्थिती मात्र पारनेरला आहे. असाच प्रकार श्रीगोंदा शाखेत गेली तीन, चार वर्षांपासून सुरू आहे. श्रीगोंदा उपव्यवस्थापक पदावरील कर्मचारी पारनेरला काम करत असून पगार श्रीगोंदा शाखेत उपस्थिती मात्र पारनेरला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या