कोपरगावात कमान युध्द पेटण्याची शक्यता

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगावात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मेन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील बेकायदेशीर सुरू असलेल्या कमानीचे काम त्वरित थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटणकर यांनी पालिकेला लेखी निवेदन देऊन केली आहे.

पाटणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहरातील जुना नगर मनमाड हायवे प्रमुख रस्ता स्वामी समर्थ मंदिर ते येवला नाका असा आहे. या रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेकायदेशीर व कोणतीही तांत्रिक मंजुरी न घेता आर.सी.सी मध्ये काम सुरू असून या रस्त्यावर सर्व प्रकारची अवजड वाहने ये जा करतात. या बांधकामाला कुठलीही तांत्रिक मंजुरी न घेता रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा मोठे आरसीसी पिलर उभे केलेले आहेत. रस्त्याची रुंदी साधारण ६० फूट आहे. त्यामुळे तांत्रिक मंजुरी आवश्यक असून यामुळे मोठा अपघात होऊन मनुष्य हानी होऊ शकते. तसेच ये जा करणाऱ्या वाहनांवर देखील ही कमान पडू शकते. त्यामुळे या बेकायदेशीर कमानीचे काम त्वरित थांबविण्याची मागणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे. तसेच हे काम न थांबवल्यास याविषयी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही पाटणकर यांनी सांगितले आहे.

कोपरगाव मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर महापुरुषांच्या कमानींची मागणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विघ्नेश्वर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार, गांधी चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वार, धारणगाव रोड वर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार, हेडगेवार चौक बस स्थानक येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे प्रवेशद्वार आदी कमानींची मागणी करण्यात आली आहे.

सदर कमानीला कुठल्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नाही. तसेच कमानीचा कोणत्याही नकाशाला अद्याप मान्यता नसून हे काम बेकायदेशीर असून आम्ही याबाबत त्वरित सुरू असलेले काम थांबविण्यासाठी नोटीस काढलेली आहे. त्वरित हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शांताराम गोसावी, मुख्याधिकारी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *