नाशिक | ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचे निधन झाले. सोलापुरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रकृत्ती अस्वास्थ्यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपर्णाताई या चांगल्या वक्त्या होत्या तसेच परखडपणे मते मांडण्यात माहीर होत्या.
ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले. बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.
अपर्णा ताईंनी अनेक जोडपे विभक्त होण्यापासून वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी अनेक घर पुन्हा नांदायला भाग पाडली होती. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. या संस्कारात आई किती महत्वाची असते ते अपर्णाताईंनी अनेक व्याख्यानातून उलगडले होते.
अपर्णाताई यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियात ताईच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. अनेकांनी डीपी ठेवले, स्टेट्सवर ताईंचा फोटो ठेऊन आठवणी शेअर केल्या.