श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा तालुक्यासह राज्यभरातील शेतकरी ओला दुष्काळ, नुकसान भरपाईचा अभाव, वीज बिलांची सक्तीची वसुली, कारखान्यांचे ऊस दर, अनुदानासाठी होणारी पिळवणूक असे पिडले असून अशा सर्व शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने शासनास जागे करण्यासाठी शेतकरी संघटनेने राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत अनोखे आंदोलन केले.
शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी. ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान 3 हजार 100 रुपये द्यावा. पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकर्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी. जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करण्यात यावे.या सर्व मागण्यांसाठी हे अनोखे आंदोलन आले.
राजेंद्र म्हस्के म्हणाले, शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. दरवेळी आंदोलने करावी लागतात. मोर्चा, आंदोलने, उपोषणे करून देखीलही प्रशासनाला घाम फुटत नाही. श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे सरकार व निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकारी यांचे डोके ठिकाण्यावर आणून,त्यांना देवा खंडेरायाने योग्य सद्बुद्धी द्यावी व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालावा लागला.
या अनोख्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कुलथे, गटविकास अधिकारी जगताप, महावितरणचे सर्व अधिकारी हे आंदोलन स्थळी उपस्थित राहिले. ट्रान्सफार्मर न सोडता वसुली करू, पंचायत समितीशी निगडित प्रश्नांसंदर्भात लवकरच आढावा बैठक घेऊ, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..तर गाढव मोर्चा काढणार
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर संबंधित कार्यालयात गाढवं सोडून आंदोलन करणार, असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला.