संभाजी भिडे विरोधात संगमनेरात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने भिडे विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

संगमनेर बसस्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन झाले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, सौ. पद्माताई थोरात, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, संतोष हासे, संपतराव डोंगरे, गणेश मादास, दत्तू कोकणे, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे, अनिकेत घुले, आदींसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

याप्रसंगी बाबा ओहोळ म्हणाले, राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे हे काही बेताल वक्तव्य करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. अशा या माणसाला तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, एका बाजूला मणिपूर जळते आहे. तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रातही शांतता भंग करण्यासाठी भिडे सारख्या व्यक्ती बेताल वक्तव्य करत आहेत. महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ऐवजी काही विचारसरणीचे लोक देश भावना निर्माण करत आहेत. अशांना जरब बसवण्यासाठी तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मिलिंद कानवडे म्हणाले की, भाजपा व आरएसएस विचारसरणीच्या लोकांना राष्ट्रपुरुषांबद्दल आदर आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी भिडेंना पाठीशी न घालता तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. सुरेश थोरात म्हणाले, संभाजी भिडे यांनी साईबाबा विरुद्ध बेताल वक्तव्य केले आहे. विद्यमान पालकमंत्री हे शिर्डी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून पालकमंत्री व खासदारांनी तातडीने भिडे विरुद्ध निषेध करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली पाहिजे. साईबाबांविरुद्ध बेताल वक्तव्य होत असताना त्यांनी गप्प राहणे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली

यावेळी सोमेश्वर दिवटे अनिकेत घुले आदींनी निषेध व्यक्त केला, याप्रसंगी के.के. थोरात, संजय कोल्हे, उबेद शेख विष्णूपंत रहाटळ, विजय उदावंत, विजय राहणे, सुभाष सांगळे, भास्कर शर्माळे, गणपतराव सांगळे, अंबादास आडेप, आनंद वर्पे, जयराम ढेरगे, भाऊसाहेब शिंदे, मिनानाथ वर्पे, माणिक यादव, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे आदिसह विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख – डॉ. तांबे

राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख झाली आहे. लोकशाहीला ताकद देणार्‍या पुरोगामी विचारांचे असणार्‍या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम केले असून पुढील पिढ्यांना विचार दिला आहे, त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्तींकडून होणार्‍या या अवमान कारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *