अहमदनगर (प्रतिनिधी) –
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या वेतनवाढीचा विषय अखेर मार्गी लागला असून 198 कर्मचार्यांना
वेतन वाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबत कर्मचारी न्यायालयातही गेले होते. त्यात कर्मचार्यांच्या बाजूने निकाल लागला.
राज्य शासनाने 2006 पासून सहावा वेतन आयोग लागू केला. परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल 2009 पासून मिळाला. दरम्यान हा वेतन आयोग लागू करताना अतिउत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांना एक किंवा दोन आगाऊ वेतनवाढी देण्याच्या तरतुदीवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जानेवारी 2006 ते मार्च 2009 या कालावधीतील ज्या कर्मचार्यांना आगाऊ वेतनवाढी मंजूर झाल्या त्यांना सहाव्या वेतन आयोगात त्याचा लाभ
मिळाला नाही. त्यामुळे काही कर्मचार्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली. जुलै 2019 मध्ये याबाबत कर्मचार्यांचे बाजूने निर्णय झाला व आगावू वेतनवाढ कर्मचार्यांना देण्याबाबत न्यायालयाने जिल्हा परिषदेला आदेश दिले. त्यानुसार आता या कर्मचार्यांना ही रक्कम मिळणार आहे. विविध विभागातील सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कक्ष अधिकारी अशा वर्ग 3 च्या 198 कर्मचार्यांना वेतनवाढीची ही रक्कम देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले आहेत.
…………..
जिल्हा परिषदेच्या अतिउत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्याच्या वेतनवाढीच्या या विषयाबाबत कर्मचारी युनियनने पाठपुरावा केला. त्याला आता यश आले असून 198 कर्मचार्यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय आणखी बरेच कर्मचारी यासाठी पात्र असून त्यांचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी युनियन प्रयत्न करणार आहे. कर्मचार्यांच्या हितासाठी युनियन प्रयत्न करत राहणार आहे.
– विकास साळुंके,
जिल्हाध्यक्ष जि. प. कर्मचारी युनियन.