राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
पावसाचे पाणी साचल्यामुळे राहुरी शहरात डासांचे प्रमाण वाढले असून मलेरिया, गोचीड ताप तसेच दूषित पाण्यामुळे काविळीचे रुग्ण वाढत आहेत.
तरी राहुरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करावी, अशी मागणी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनी केली आहे.
याबाबत विस्तृत माहिती देताना त्यांनी सांगितले, अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. तसेच अनेक मोकळे प्लॉट तसेच गटारीच्या ठिकाणी गवताची वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याने गटारीमध्ये घाण गुंतली असून त्यातही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले आहे.
या सर्वांमुळे डासाचे प्रमाण वाढलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. आरोग्य विभागाने व स्वच्छता विभागाने गटारींची सफाई करून सर्व गाळ उचलून घ्यावा तसेच शहरातील सार्वजनिक शौचालय व लघुशंका ठिकाणांची अग्निशामकने फवारणी करून स्वच्छता करावी.
करोनाचा कोणताही ताप व इतर आजार झाल्यास करोनाची तपासणी केल्याशिवाय वैद्यकीय व्यावसायिक पुढील उपचार करीत नाही. त्यामुळे इतर आजारांच्या उपचारांवरही मर्यादा आली आहे.
नगरपरिषदेने इतर आजार न वाढण्याची खबरदारी घेताना त्वरित सफाई व डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करून नागरिकांचे जीवन सुसह्य करावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.