कोतुळ | वार्ताहर
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पर्यटकांच्या गाडीला जलसमाधी मिळाली आहे. याबाबत
सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर भागातील उद्योजक समीर राजूरकर व गुरू सत्यराज शेखर हे पर्यटक आपल्या कारमधून पुणे हुन अकोले तालुक्यातील कळसुबाई येथे पर्यटनाला आले होते. शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पर्यटक रस्ता चुकल्याने ते कोतुळ-अकोले रस्त्यावरून जात होते.
रस्त्यावरील पूल धरणाच्या पाण्यात बुडालेला असल्यांने पुलावरून कार जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चालक सतीश घुले यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला असून दोघे उद्योजक यांना पोहता येत असल्याने ते सुखरूप किनारी पोहचले. पुलावरून पाणी असताना पाटबंधारे व बांधकाम खात्याने पुरेशे दिशादर्शक फलक न लावल्याने ही घटना घडली. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.