Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरअखेर निघोजला पुन्हा दारूबंदी !

अखेर निघोजला पुन्हा दारूबंदी !

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील निघोज येथे सुरू झालेली दारूची दुकाने पुन्हा एकदा बंद करण्याचे आदेश राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त के. बी. उमाप यांनी दिले.

- Advertisement -

निघोजला ऑगस्ट 2016 ला लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेतून महिलांनी दारूबंदीचा लढा जिंकला होता. त्यासाठी त्यांनी आठ महिने आंदोलन चालवले होते. मतदानातून उभी बाटली येथे कायमस्वरूपी आडवी करण्यात आली होती. पुढे दोन वर्षांनी गावातील दारू विक्रेत्यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना हाताशी धरून संगनमताने बोगस ठरावाचा उपयोग करून दारू दुकाने चालू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले.

उत्पादन शुल्क विभागाने हे प्रस्ताव तातडीने पडताळून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांचे समोर ठेवले. त्यावर याप्रकरणी गृहखात्याचा अहवाल मागवण्यात आला. पोलीस खात्याने दारूबंदी हटवू नये, येथील कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा अहवाल दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या अहवालाकडे दुर्लक्ष करून दारू विक्रेत्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत नाही, अशी टिप्पणी लिहून त्यावर सही केली.

पुढे जिल्हाधिकार्‍यांच्या या टिप्पणी सोईस्कर अर्थ काढून उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांनी निघोजची दारूबंदी उठवल्याची घोषणा केली. मतदान प्रक्रियेने झालेली दारुबंदी ग्रामसभेच्या ठरावाने उठवता येत नसल्याचा आक्षेप येथील दारूबंदी समिती व लोकजागृती सामाजिक संस्थेने घेतला. शिवाय ग्रामसभा ठराव बोगस असून दारूबंदी हटवल्याचे जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र आदेश का नाही, असा सवाल करून याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, सर्व अधिकार्‍यांनी या मागणीला फेटाळून लावले.

त्यानंतर याप्रकरणी अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. सुनावणीवेळी न्यायालयात अधिकार्‍यांचा सर्व बनाव न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने ही प्रक्रीया कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत तपास करून निर्णय घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले. त्याआदेशानुसार याचिकाकर्ते, दारूविक्रेते व अधिकारी यांची बाजू तपासण्यात आली व जिल्हाधिकारी यांचा दारूबंदी उठवल्याचा निर्णय रद्द केल्याचा आदेश देण्यात आला.

निघोजला दारूबंदीसाठी येथील महिलांना आठ महिने आंदोलन करावे लागले, तर चार वेळा उच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवावा लागला आहे. अखेर त्यांनी हा लढा पुन्हा एकदा जिंकला आहे. येथील दारूबंदी हटवण्यासाठी गावचे सर्व राजकीय नेते एकत्र झालेले होते. दारूबंदी केल्यामुळे गावची फार मोठी हानी झाली आहे.

बाजारपेठ मंदावल्यामुळे गावची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे जबाब त्यांनी दिले होते व पुढे गावातील प्रतिष्ठीतांचे हेच जबाब व बोगस ठराव यांचा वापर करून दारूबंदी उठवली होती.आता पुन्हा एकदा महिलांनी हा लढा जिंकला आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मळगंगा मातेला साडी चोळी देवून आम्ही केलेला नवस फेडणार असल्याचे राधाबाई पानमंद, मनिषा घोगरे, शांताबाई भुकन, पुष्पाबाई वराळ यांनी सांगितले.

निघोजची दारूबंदी हटवण्यामागे बोगस ठराव घेणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, बनावट प्रस्ताव दाखल करणारे दारू विक्रेते,जिल्हाधिकार्‍यांच्या टिपण नोटचा सोयीचा अर्थ लावून दिशाभूल करणारे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक, अधीक्षक व दारूबंदी हटवल्याचा स्वतंत्र आदेश न काढता दारूविक्रेत्यांच्या प्रस्तावांवर संभ्रम निर्माण करणारी टिपण नोट ठेवून बेकायदेशीरपणे दारूबंदी उठवणारे तत्कालिन जिल्हाधिकारी यांची या प्रकरणात चौकशी होऊन यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लवकरच न्यायालयालडे करत आहोत.

– कांताबाई लंके, सचिव, लोकजागृती सामाजिक संस्था, निघोज.

- Advertisment -

ताज्या बातम्या