बळसाणे – Dhule – वार्ताहर :
विहिरीतून पाणी काढत असतांना पत्नीचा तोल गेल्याचे पाहताच पतीनेही पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.
परंतु पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी बळसाणे (ता. साक्री) येथे घडली. याबाबत निजामपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) व अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) असे मयत नवदाम्पत्याचे नाव आहे. रब्ई हंगाम सुरू असल्याने दोघे दि. 5 रोजी दुपारी गावातील स्वतःच्या शेताची काम करत होते.
त्यादरम्यान अंजूबाई या पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीजवळ आल्या. विहीरीतून पाणी काढत असतांना त्या पाय घसरून विहिरीत पडल्या. हे दिसताच पत्नीला वाचविण्यासाठी लक्ष्मण याने देखील विहिरीत उडी मारली. परंतु या घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिस दाखल झाले. तसेच सरपंच दरबारसिंग राजपुत व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. शितल यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.
याबाबत देवीदास अभिमन सुर्यवंशी (रा. जैताणे) यांच्या माहितीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एस.एच.वसावे करीत आहेत. दरम्यान दि. 6 रोजी दुपारी साडेबारा वाजता बळसाणे येथे दोघावंर अंत्यसंस्कार करण्यात आले