जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
आगामी काळात जळगाव जिल्ह्यात सर्व नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. ह्यासाठी बूथस्तरापर्यंत व जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकर्यांपर्यंत बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र प्रकल्पा मार्फत शेतकर्यांपर्यंत पोहचवायचे आहेत. तसेच आगामी जिल्हापरिषद ही भाजपा स्वबळावर जिंकू, असा निर्धार भाजपा नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.
गुरुवारी भारतीय जनता पार्टीची बैठक वसंत स्मृती भाजपा कार्यालयात झाली. या बैठकीस भाजपा नेते आ.गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा ना.रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अॅड.किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पी.सी.पाटील,जि.प.सदस्य मधुकर काटे यांच्या भाजपच्या सर्व आघाडीचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीला स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली. आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की, या योजनेतून जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या गावात एका फोनवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उपलब्ध होणार आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे शेतकर्यांसाठी चालते फिरते मदत केंद्रच होते. म्हणून त्यांना समर्पित अशी योजनेची सुरुवात करण्यात आली.
सूत्रसंचलन के.बी.साळुंखे यांनी व प्रस्तावना जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी केले. संघटनात्मक आढावा सचिन पानपाटील यांनी घेतला. आभार संतोष खोरखेडे यांनी मानले. या बैठकीत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.