मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबतची मागणी करणारे पत्रही राज्यपालांना दिले…
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषद सभागृहात नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घटनात्मक पेच सोडवावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवा अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान, उपसभापतींनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून न्याय देऊ शकत नाही, अशी विनंती आम्ही राज्यपालांना राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे, अशी मागणी केल्याचे दानवे यांनी सांगितले.