Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी दुर्घटना! रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १०० हून अधिक लोक अडकल्याची भीती,...

मोठी दुर्घटना! रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १०० हून अधिक लोक अडकल्याची भीती, पाच जणांचा मृत्यू

रायगड | Raigad

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव व मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे…

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी गाव आहे. हे गाव कर्जत तालुक्यात येते. गुरूवारी पहाटे (20 जुलै) लोक गाढ झोपेत पावसामुळे असतानाच गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांकडून तातडीने बचाव व मदत कार्य सुरू केले.

आतापर्यंत 75 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 जणांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावाला भेट दिली आहे. परिस्थितीची पाहणी करत आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “जी आपातकालीन यंत्रणा आहे, मग त्यात एसडीआरएफ आहे. एनडीआरएफ आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपतकालीन यंत्रणा अलर्ट आहेत. जिथे जिथे गरज असेल, तेथील लोकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय, त्रास, जीवितहानी होणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे आदी नेतेमंडळीही घटनास्थळी दाखल झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या