Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधकथ्थकविश्व पोरके झाले

कथ्थकविश्व पोरके झाले

डॉ. नंदकिशोर कपोते

तब्बेतीच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या अवस्थेत असताना पंडितजी म्हणाले होते, ‘मेरे लिए प्रार्थना करो’. ते ऐकून मी म्हणालो, ‘आप जल्दी अच्छे हो जाएंगे और पुना आएंगे’ यावर ते हसले होते. ते हास्य अजूनही माझ्या कानात आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी परतत असता ते म्हणाले होते, ‘जब तक तुम्हारे पैरों में घुंगरु है, तबतक मैं तुम्हारे साथ हूं’! आता हाच माझ्या जगण्याचा मंत्र आहे.

- Advertisement -

पं. बिरजू महाराज यांचे निधन ही मनाला चटका लावून गेलेली घटना आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनचा आमचा स्नेह असल्यामुळे त्यांच्याबरोबर व्यतीत केलेला एक-एक क्षण आज मला आठवत आहे. गुरुजींचा पट्टशिष्य म्हणवून घेणे ही माझ्यासाठी नेहमीच भूषणास्पद बाब होती आणि ती कायमच राहणार आहे. उत्तर प्रदेशमधली कथ्थक नृत्यशैली ही एक नैसर्गिक अर्थात सर्वांगसुंदर नृत्त, नृत्य, नाट्य यांनी परिपूर्ण अशी शैली आपले खास वेगळेपण टिकवून आहे. नृत्त, नृत्य, नाट्य, अर्थात पदन्यास (लय-ताल), तोडे-तुकडे, गतनिकास, गत भाव अभिनय अशा सर्व शृंगाराने नटलेले, बहरलेले हे कथ्थक नृत्य… असे हे नृत्य समोर येते त्यावेळी सर्वप्रथम नजरेसमोर येतात ते लय आणि अभिनयाचे बादशहा, पद्मविभूषण कथ्थक सम्राट पं. बिरजू महाराज! आता ते आपल्याला सोडून गेले असले तरी या विश्वाशी असणारे त्यांचे नाते आणि त्यांचे योगदान नेहमीच अतूट राहणार आहे.

पं. बिरजू महाराज यांनी कथ्थक विश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले. कथ्थक म्हणजे बिरजू महाराज आणि बिरजू महाराज म्हणजे कथ्थक हे समीकरण कायमचे रूढ झाले आहे. कथ्थक नृत्याची चार घराणी आहेत. लखनौ घराणा, जयपूर घराणा, बनारस घराणा आणि रायगड घराणा. पं. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे. पं. बिरजू महाराजांच्या अथक परिश्रमामुळेच लखनौ घराणे उंच शिखरावर पोहोचले. लखनौ घराण्याचे मूळ प्रवर्तक स्व.पं. ईश्वरी प्रसाद मिश्र. या घराण्याच्या नऊ पिढ्या झाल्या.

बिरजू महाराज हे सातव्या पिढीतले होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी वसंत पंचमीच्या दिवशी लखनौ इथे झाला. वडील स्व. अच्छन महाराजजी यांच्याकडून त्यांना नृत्याचे शिक्षण मिळाले. बिरजू महाराज अवघे साडेसात वर्षांचे असताना अच्छन महाराजजींनी त्यांना गंडाबंध शिष्य केले. बिरजू महाराज नऊ वर्षांचे असताना अच्छन महाराजनींचे देहावसान झाले. नंतर त्यांना पुढे आणण्यात सर्वात मोठा वाटा त्यांच्या आई, अम्माजींचा राहिला. अम्माजींनी त्यांना बिंदादीन महाराजांच्या ठुमर्‍या शिकवल्या. बिरजू महाराजांना काका पं. शंभू महाराज आणि पं. लच्छू महाराज यांच्याकडूनही नृत्याचे मार्गदर्शन लाभले. केवळ साडेसात-आठ वर्षांचे असताना पं.बिरजू महाराजांनी दिल्ली येथील ज्युबिली टॉकीजमध्ये नृत्याचा जाहीर कार्यक्रम करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते.

स्व. पं. अच्छन महाराजजींची शिष्या स्व. डॉ. कपिला वात्स्यायन यांनी बिरजू महाराजांना लखनौहून दिल्लीला आणले आणि केवळ 14 वर्षांचे असताना बिरजू महाराज संगीत भारती, दिल्ली इथे नृत्य शिकवू लागले. ते तेथे साडेचार वर्षे होते. त्यानंतर महाराजजींना ‘भारतीय कला केंद्र’ इथे आमंत्रित केले गेले आणि तिथे महाराजजी नृत्य शिकवू लागले. काही काळानंतर संगीत नाटक अकादमीच्या वतीने कथ्थक केंद्राची स्थापना झाली आणि बिरजू महाराज तिथे मुख्य गुरू म्हणून नियुक्त झाले. तिथे बॅले विभागाचेही ते संचालक होते. 1998 मध्ये पं. बिरजू महाराज कथ्थक केंद्रातून निवृत्त झाले आणि दिल्लीमध्ये स्वतःची ‘कलाश्रम’ नावाची कथ्थक नृत्य संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कथ्थक नृत्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य केले.

मी महाराजजींना प्रथम भेटलो 1974 मध्ये. त्यावेळी मी पुण्याच्या ‘कलाछाया’ संस्थेत नृत्य शिकत होतो. तिथे एका कार्यक्रमासाठी पं. बिरजू महाराजजी आले होते. एका झाडाखाली कट्ट्यावर अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारे पं. बिरजू महाराज बसलेले मी पाहिले. तेव्हा मी जवळ गेलो आणि त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यांनी माझे नाव विचारले. हीच महाराजजींशी माझी पहिली भेट. त्याच रात्री बालगंधर्व रंगमंदिरात महाराजजींचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या आधी संस्थेच्या वतीने मी महाराजजींचा रंगमंचावर नारळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर आयुष्यात प्रथमच मी महाराजजींचे सर्वांगसुंदर नृत्य पहिले आणि त्याच वेळी मनाशी ठरवले की मी महाराजजींकडेच नृत्य शिकणार!

पुढे मी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आणि दिल्लीला कथ्थक केंद्र (संगीत नाटक अकादमीचा विभाग) सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारमध्ये पं. बिरजू महाराजांकडे कथ्थक नृत्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी गेलो. गुरू-शिष्य परंपरेनुसार मी महाराजजींकडे दहा वर्षे शिक्षण घेतले. त्याकाळी गुरू शिष्याची परीक्षा घेत असत. शिष्य योग्य पात्रतेचा आहे का, हे बघत असत. तेव्हाच्या त्या पद्धतीनुसार सुरुवातीला काही दिवस मला महाराजजींनी काहीच शिकवले नाही. परंतु ते माझ्याकडे बारकाईने लक्ष देत असत. मी महाराजजींची सर्व कामे करत असे. असेच एकदा रात्री मी महाराजजींचेे पाय दाबत होतो. त्यानंतर महाराजजी झोपले असे समजून मीही झोपायला जायला उठलो. तेवढ्यात महाराजजी जागे झाले आणि म्हणाले, ‘नंदू, खडे हो जाओ’. तेव्हा त्यांनी मला आमद (कथ्थक नृत्याचा एक प्रकार) शिकवला. अशा प्रकारे रात्री एक वाजता माझा महाराजजींकडे कथ्थक नृत्याचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर महाराजजींनी मला भरभरून शिकवले.

शिक्षणाचा हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या काळात अधिकच बहरला होता. बहुतांश कलाकारांना लॉकडाऊनचा काळ त्रासदायक ठरला असला तरी याच काळात मला त्यांनी ऑनलाईन शिकवले. 29 मे 2020 पासून त्यांनी माझा क्लास घेणे सुरू केले. वयाच्या या टप्प्यावर असताना ऑनलाईन शिकवण्याचे तंत्र आत्मसात करून त्यांनी मला नृत्याचे धडे देणे हे फार भाग्याचे होते. खरे तर ही बाबच मला स्वप्नवत वाटत होती. आमची ऑनलाईन शिकवणी त्यांच्या निधनाआधी पंधरा दिवसांपर्यंत सुरू होती. दर रविवारी आमचा ऑनलाईन क्लास होत असे. या वयातही त्यांची शिष्यांना शिकवण्याची विलक्षण उर्मी होती. इतकेच नव्हे तर शेवटच्या दिवशीही नेहमीप्रमाणे मी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या निधनापूर्वीच्या दोन तास आधी हा फोन झाला होता. फोनवर आमचे छान बोलणे झाले होते. तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या अवस्थेत असताना ते मला म्हणाले होते, ‘नंदू, मेरे लिए प्रार्थना करो’. ते ऐकून मी म्हणालो, ‘आप जल्दी अच्छे हो जाएंगे और पुना आएंगे’ यावर ते हसले होते. दुसर्‍या दिवशी याच वेळी मी त्यांना फोन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने ती वेळ आली नाही. त्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी येऊन थडकली. त्यावेळी त्यांचे एक वाक्य मला आठवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडून पुण्याला येताना मी भावूक झालो होतो. त्यांना सोडून येताना मन कातर झाले होते. माझी ती अवस्था पाहून ते म्हणाले होते, ‘जब तक तुम्हारे पैरों में घुंगरू है, तब तक मैं तुम्हारे साथ हूं’! आता हाच माझ्या जगण्याचा मंत्र आहे. ते नेहमीच आपल्याबरोबर असतील. महाराजजींना भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या