मुंबई | Mumbai
भारतीय संघाने Blind Cricket World Cup 2022 जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. भारताच्या दृष्टिहीनांच्या संघाने तिसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला आहे.
बाराबती स्टेडियमवर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने बांगलादेशला ४ बाद १६६ धावांवर रोखले. बांगलादेशचा कर्णधार आशिकुर रहमान (७५) आणि मोहम्मद आरिफ (३३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. आशिकूरने नंतर तंझिलसह ६१ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर टी दुर्गा राव (७३) आणि नकुल बरनायक (३६) यांनी ८.३ षटकात ९५ धावा केल्या. भारताने १३.१ षटकात ३ विकेट गमावत १६७ धावा केल्या.
भारतीय सलामीवीर टी दुर्गा राव आणि नकुल बदनाईक यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि ८.३ षटकात ९५ धावा उभारल्या. २४ चेंडूत ३६ धावा केल्यानंतर नकुल पहिला विकेट म्हणून बाद झाला. दुर्गा रावने वेगवान धावसंख्या सुरू ठेवली आणि १२ व्या षटकात बाद झाल्यावर भारत लक्ष्यापासून फक्त १५ धावा दूर होता. त्याने ४३ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७३ धावा केल्या. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी १३.१ षटकांत सामना सहज भारताच्या नावे केला.
यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यासामन्यात पाकिस्तानने प्रथम खेळताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. भारताने ९ गडी राखून विजय मिळवला होता.