Thursday, April 25, 2024
Homeनगरइर्शाळवाडी दुर्घटनाच्या पार्श्वभूमीवर अकोलेतील दुर्गम आदिवासी वाड्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करा

इर्शाळवाडी दुर्घटनाच्या पार्श्वभूमीवर अकोलेतील दुर्गम आदिवासी वाड्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करा

अकोले । प्रतिनिधी

ईर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायक घटना असून अशी घटना अकोले तालुक्यात घडू नये यासाठी तालुक्यातील सर्व दुर्गम वाड्या वस्त्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करावे. आवश्यकता असल्यास तातडीने उपाययोजना करून संभाव्य घटना टाळण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व समशेरपूरचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी केली आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यात अनेक दुर्गम वाड्या वस्त्या आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पक्के रस्ते नसल्याने पायी चालत जावे लागते. पावसाळ्यात अशा वाड्या वस्त्यांवर घटना घडल्यास तेथे मदत पोहचवीणेही अशक्य होईल अशा ठिकाणी आजही आदिवासी बांधव राहतात. तालुका प्रशासनाने हे वास्तव लक्षात घेऊन अशा दुर्गम वाड्या वस्त्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करण्याची व दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी श्रमिकांचे सुरक्षित ठिकाणी योग्य पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे.

भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदऱ्यात!

तालुक्यात सध्या जिल्हा उपरुग्णालय आणण्याची चर्चा सुरु आहे. असे झाले तर त्याचे स्वागतच आहे. मात्र या बरोबरच तालुक्यात आदिवासी भागातील आज अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य तपासण्याची आवश्यकता आहे. अकोल्याच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्तीला असलेले डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहतात का? या आरोग्य केंद्रांमध्ये औषधे उपलब्ध आहेत का? हे प्रथम तपासण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील दुर्गम भागात सर्पदंशाची औषधे व उपचार व्यवस्था नसल्याने आदिवासी बांधवाना सर्पदंश झाल्यास जीव तरी गमवावा लागतो किंवा महागड्या उपचारासाठी आयुष्यभर कर्जबाजारी तरी व्हावे लागते. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण आदिवासी भागात वाढत असल्याने या सर्व भागांमध्ये डॉक्टर्स उपलब्ध राहतील व सर्पदंशासह इतर उपचारांच्या व्यवस्था ग्रामीण भागात श्रमिकांना मिळतील यासाठी प्रशासनाने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

PM Awas Yojana : ‘मोदी आवास’साठी जिल्ह्यातून 20 हजार ओबीसी लाभार्थी पात्र

इगतपुरी तालुक्यात रस्ता नसल्याने व गाव पातळीवर प्रसूतीची सुविधा नसल्याने वनिता भगत या २३ वर्षीय गरोदर भगिनीचा झोळीत वाहून नेत असताना मृत्यू झाला. अकोले तालुक्यातही असे प्रसंग उदभवू शकतात. तहसीलदार अकोले यांनी ही सर्व परिस्थिती पाहता, आरोग्य विभाग, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील संबंधित सर्व विभागांची एकत्र बैठक घेऊन तालुक्यात कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी डी.वाय.एफ.आय.च्या वतीने जिल्हाध्यक्ष एकनाथ मेंगाळ, गोरख आगिवले, वामन मधे, सुरेश गीऱ्हे, गणपत आगिवले, अनिल किरवे, नाथा बहुरले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या