Saturday, May 4, 2024
Homeनगरआरडगाव येथे अवैध दारु धंद्यांवर महिलांचा हल्लाबोल; विक्रेते पसार

आरडगाव येथे अवैध दारु धंद्यांवर महिलांचा हल्लाबोल; विक्रेते पसार

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैध दारू धंद्याचा गल्लोगल्ली सुळसुळाट झाला असून आरडगाव येथील महिलांनी गावात या अवैध धंद्यावर हल्लाबोल करत ‘फिल्डींग’ लावून दारू विक्री करणार्‍यांकडून दारू हिसकावून घेऊन ती ताब्यात घेतली आहे. या रणरागिनींचा रूद्रावतार पाहून अवैध दारुविक्रेत्यांची पळता भुई थोडी झाली होती.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैध धंदेवाल्यांनी कहर केला असून दारूमुळे अनेक गोरगरीब महीलांचे संसार उद्ध्वस्त होवून संसाराची राख रांगोळी झाली आहेत. तरूण मुलीचे लग्न होत नाही. तरूण मुले व्यसनाधिन होत आहे. ऊन्हातान्हात कमवलेले पैसे संध्याकाळी हिसकावून घेवून दारू पिऊन येतात. हे सर्व धंदे बंद होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष अनिता जगधने यांनी पुढाकार घेऊन कष्टकरी पिडीत महिलांना घेवून सरपंच सुरेखा म्हसे व ग्रामसेवक यांच्यासमोर कथन करून लगेच ग्रामपंचायतीचा दारूबंदी ठराव घेवून सरपंचासह राहुरी पोलीस स्टेशन गाठले.

संबंधित पोलीस अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. परंतु निवेदन देवूनही पोलीस अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ऊलट दारूधंदे चालूच होते हे पाहून अनिता जगधने यांनी मंगळवारी सकाळपासून सर्व महिलांना घेवून दारू अड्ड्यांवर दारूड्यावर नजरा ठेवून चौका चौकात महिला उभ्या केल्या होत्या. यावेळी ससाणे नामक व्यक्ती ओढ्यात काट्यात दारू विकत असल्याचे कळाले सर्व महिलांनी ओढ्याकडे मोर्चा वळवला. ही माहिती ससाणेला व दारूड्यांना कळाली त्यांनी दारूचा बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून काट्यातूनच पळ काढला. यावेळी महिलाही हातात दंडूके घेवून त्यांच्या मागे पळत असल्याने रणरागिनींचा रूद्रावतार पाहून दारू धंदेवाल्यांची व दारूड्यांची पळताभुई थोडी झाली. काही धंदेवाले कड्याकुलपे लावून पळून गेली.

सदर दारूचा बॉक्स पकडल्या नंतर महिलांनी पोलीस पाटील जाधव व रविंद्र म्हसे यांना बोलावून पोलीसांना बोलवून घेण्यास सांगितले. महीलांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीसांचीही भंबेरी उडाली शेवटी अनिता जगधने यांनी ठणकावून सांगितले की जर पोलिसांनी अवैध दारू बंद केली नाही व संबंधितावर कारवाई केली नाहीतर याच दारूच्या बाटल्या पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या दालनात घेवून बसणार असून जोपर्यंत बिट हवालदारचे निलंबन होत नाही तोपर्यंत तेथून उठणार नाही. असे ठणकावून सांगितले.

यावेळी वैशाली आव्हाड, नंदा माळी, कमल पवार, सिंधू बर्डे, उषा जाधव, सुरेखा थोरात, मिरा थोरात, पुष्पा आव्हाड, शांताबाई जाधव, द्वारकाबाई जाधव, मंगल जगधने, मनिषा जगधने, कुसुम जगधने आदी महिला उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या