संगमनेर (शहर प्रतिनिधी)- हॉस्पिटल बंद ठेवण्याचा आदेश असतांनाही सुरु ठेवल्याने शहरातील हॉस्पिटल औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सिल करण्यात आले.
डॉ. अमोल कर्पे यांचे साईनाथ हॉस्पिटल गुरूवारी दुपारी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सिल करण्यात आले.
साईनाथ रुग्णालयाबाबत तक्रारी गेल्यामुळे हे रुग्णालय यापूर्वी बंद करण्यात आले होते. असे असतांनाही या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरुच होते. या रुग्णालयात करोनाबाधीत रुग्णांवरही उपचार करण्यात येत होते. या संदर्भात तक्रारदारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात तक्रार केली. या तक्रारीबाबत सुनावणी झाली.
न्यायालयाने संबंधीत खात्याच्या अधिकार्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर काल संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया, डॉ. जर्हाड यांच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली. सदर रुग्णालय सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पथकासोबत पोलीस फाटाही तैनात करण्यात आला होता.
अधिकार्यांच्या पथकाने रुग्णालयाची पूर्ण तपासणी केली. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी करोना बाधीत रुग्णांवरही उपचार करण्यात येत होते. यासाठी रुग्णालयाच्या वरच्या दोन मजल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती असे या पथकाच्या निदर्शनास आले. यानंतर पथकाने रुग्णालयाचे वरचे दोन्ही मजले सिल केले.
दरम्यान या रुग्णालयावर वेळोवेळी कारवाई करुनही हे रुग्णालय संबंधीत डॉक्टर पुन्हा सुरु कसे ठेवतात? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. रुग्ण सेवा व्यतिरीक्तही रुग्णालयामध्ये बकरी संशोधन केंद्रही सुरु असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. रुग्णालय चालकांनी करोनाच्या काळामध्ये करोना सेटर मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तेथे अधिकृत करोना सेंटर सुरु झाले नव्हते.